Thursday, August 14, 2014

"मेस"……

"मेस"…… 


१९८८ ला आम्ही "शासकीय तंत्रनिकेतन,कोल्हापूर"ला प्रवेश घेतला. सुदैवाने हॉस्टेलही मिळाले आणि आम्ही हॉस्टेलच्या मेसचे मेंबर झालो.त्यावेळपर्यंत घरातला,नात्यातला की ओळखीचा कोणीच माणूस "मेस" या विषयातला अनुभवी नव्हता,त्यामुळे मेसबद्दल कमालीचे कुतूहल होते.पहिल्याच दिवशी पैसे भरताना मेसचे नियम सांगण्यात आले,त्यात जेवणाची वेळ,खाडे होणाऱ्या दिवसांची संख्या,गेस्टचा जादा चार्ज आणि "फिस्ट" बद्दलची माहिती होती.पूर्वसूचना देऊन केलेले तीन खाडे एकूण महिना रकमेतून वजावटीसाठी ग्राह्य धरले जाणार होते,तसेच पंधरवड्यातून एका रविवारी "फिस्ट" या सदरात दुपारी "स्पेशल जेवण" आणि त्याच संध्याकाळी मेसला "सक्तीची सुट्टी" असणार होती.
मेस सुरु झाली.पहिल्यांदाच जेवणाच्या हौलमध्ये गेलो आणि कोबीच्या भाजीचा उग्र वास नाकात भरला.किंबहुना कोबीच्या भाजीचा इतका भयानक वास येऊ शकतो हे त्यावेळी प्रथमच समजलं.पुढे त्याची सवय झाली कारण कोबीची भाजी वरचेवर ताटात असायची.भाजीला पर्याय म्हणून वरणात चपाती बुडवावी तर त्याने चपाती नुसती ओलीच व्हायची,ती काय मिठाच्या पाण्यात बुडवली असती तरी झाली असती.या व्यतिरिक्त न वेचलेल्या तांदळाचा कच्चा भात आणि सरसकट कच्च्या चपात्यांचीही "पचनसंस्थे"ला सवय होऊन गेली.त्याला कारणही तसेच होते,ते म्हणजे "मनीऑर्डर"ने येणारे नेमके पैसे.महिना मेसचे "एकशेऐंशी रुपये" पेड केल्यावर हाती शिल्लक राहिलेल्या पैश्यातून रोजचा चहा आणि कधीतरी "शामचा वडापाव" एवढंच कसंबसं "म्यानेज" व्हायचं.साधारणपणे बहुसंख्य हॉस्टेलवासीयांची हीच तऱ्हा होती.फारच कंटाळा आला तर एखाद्या मित्राच्या एसटीवरून येणाऱ्या घरच्या डब्यात भागीदारी करायची.पण ते फारच क्वचित घडत असे,कारण त्या मित्राला त्या एका डब्यात दोन वेळेचे जेवण आणि दुसऱ्या दिवशीचा नाश्ता करावा लागत असे. 
दहाबारा दिवसांनी कधीतरी तो पहिल्या "फिस्ट"चा रविवार उजाडला, आणि "स्पेशल मेनू" काय आणि कसा असेल याचा विचार करताकरता दुपार झाली.ताटात चपाती भातासोबत एक आमटीची वाटी होती ज्यात उकडलेलं एक अंड घातलेलं होतं.आमटीच्या पातळपणाचा "गुणधर्म" हा रोजच्या पातळ वरणालाही लाजवणारा होता.मग कोणीतरी "सिनिअर"ने "आयडिया" दिली आणि सर्वांनी अंड्याचा पिवळा भाग कुस्करून आमटीचा "थिकनेस" वाढवला,आणि रोजच्यापेक्षा एक चपाती जादा हाणली.असेच एखाद्या रविवारी "शाकाहारी फिस्ट" म्हणून थोडंस रंगीत गोड दुध मिळायचे ज्याला मेसचे मामा "बासुंदी" म्हणायचे.दिवस संपत होते आणि ह्या सगळ्या गोष्टी "अंगवळणी" खरंतर "पचनी" पडत होत्या. 
दरम्यान कधीतरी कुणाला वरणात "झुरळ" आणि कुणाच्यातरी भातात "अळ्या" सापडल्या. त्यामुळे इतर ठिकाणी होतं तसं "मेस आंदोलन"ही करण्यात आलं.पण या आंदोलनाने "जेवणाचा दर्जा" सुधारण्याच्या ऐवजी आम्हां "आंदोलनकर्त्यांचा दर्जा" मात्र रेक्टर आणि प्राचार्यांच्या नजरेत घसरला.नंतर या मेसचा नाद सोडला आणि गावातली "मेस" सुरु केली.तिथेही एक बदलली,दुसरी लावली,तिसरी सोडली मग चौथी .... "सिलसिला" सुरूच राहिला.
सरतेशेवटी एक लक्षात आले की सगळ्या मेस मालकांची "शाळा" एकच असावी.पुढे वाढत गेलेला "अभ्यास" आणि "एटीकेटी" सारख्या नवनवीन त्रासांनी त्रस्त झाल्याने गावात जेवणासाठी जायला वेळ पुरेना,परिणामी उदरभरणासाठी पुन्हा हॉस्टेलचा "मामा"च... तीन वर्ष पूर्ण झाली.शिव्याशाप दिलेल्या मेसच्या मामालाच शेवटचा "साष्टांग नमस्कार" करून ब्याग उचलली.....ते थेट गावाकडे व्हाया राधानगरी..........
आता आमच्या घराशेजारीच "इंजीनिअरिंग कॉलेज" सुरु झालंय.बरेचजण सुचवतात की "खाजगी हॉस्टेल" आणि "मेस" सुरु कर...बऱ्याचदा विचारसुद्धा येतो मनात,पण पुन्हा ते मुलांचे "शिव्याशाप"आठवतात आणि विचार आपोआप बदलतो.......

No comments:

Post a Comment