Thursday, August 14, 2014

"वर्तमानपत्र"......

"वर्तमानपत्र"......


काही माणसांची सुशिक्षित असूनही "वर्तमानपत्र" या विषयाशी इतकी "दुष्मनी" का असते देवच जाणो.ताजा नवा कोरा पेपर कसा हाताळावा,कसा वाचवा हे अश्यांना कळतच नाही.काल सकाळी रत्नागिरी स्टेशनवर दोन "मराठी" वर्तमानपत्रे घेऊन "कोकणकन्या" गाडीत चढलो.एव्हाना गाडीतले प्रवाशी झोपेत होते म्हणून लाईट न लावताच "हेडलाईन" वरून नजर फिरवली तेवढ्यानेच "हेड" दुखू लागलं म्हणून बर्थवर आडवा झालो.
थोड्या वेळातच उजेड झाला आणि माझ्या वर्तमानपत्रांची भ्रमंती सुरु झाली.बघताबघता दोन पेपरची सगळी पाने सुटी होऊन जवळपास सात आठ जणांचे वाचन सुरु झाले.प्रत्येक जण आपापल्या सोयीने हव्या तश्या एक दोन घड्या घालून,चुरगाळून पेपर वाचत होता.माझी खरंतर सटकत होती,तरीही मी संयम ठेवला.(मला घडी विस्कटून किवा चुरगाळून पेपर वाचायला आवडत नाही आणि तश्या तऱ्हेने वाचणारी माणसे सुद्धा)
नंतर कधीतरी माझ्याकडून पेपर नेणाऱ्याने सगळ्या पानांची एकत्रितपणे "सुरळी" करून आणून दिली.त्या वर्तमानपत्रांची अवस्था पाहून सकाळचा पेपर वाचायचा मूडच गेला.त्या सर्वांची व्यवस्थित घडी करण्याचा प्रयत्न करत मी "तरुण भारत" आणि "प्रहार" असे दोन वेगवेगळे पेपर करण्यात यशस्वी झालो.आणि त्याचवेळी प्रहारची "किलबिल" पुरवणी त्यात नसल्याचे लक्षात आले.
कणकवली गेल्यावर पलीकडच्या बर्थखाली लक्ष गेले तर तिथे चुरगळलेली "किलबिल" पुरवणी दिसली.गाडीतून उतरताना तिथल्या इसमाने बहुदा बर्थखालची आपली ब्याग आणि बूट पुसून घेतले होते त्या कागदांनी....कागद म्हणण्याचा उद्देश हाच की त्याच्या दृष्टीने तो रद्दीतला कागदच होता......
वर्तमानपत्र हाताळण्याच्या आणि वाचण्याच्या बाबतीत असे खूप ठिकाणी होते.
अवघ्या दोनचार रुपयात जगाच्या कानाकोपऱ्यातली इत्यंभूत माहिती देणारे वर्तमानपत्र एक दिवस तरी व्यवस्थित सांभाळायला काय हरकत आहे ? दुसऱ्या दिवशी ते रद्दीत जाणारच असते.आणि ही गोष्ट बऱ्याच सो कॉल्ड सुशिक्षिताना समजत नाही तेव्हा फार राग येतो........
त्यांचा नव्हे तर त्यांना सुशिक्षित म्हणणाऱ्यांचा.......

"मेस"……

"मेस"…… 


१९८८ ला आम्ही "शासकीय तंत्रनिकेतन,कोल्हापूर"ला प्रवेश घेतला. सुदैवाने हॉस्टेलही मिळाले आणि आम्ही हॉस्टेलच्या मेसचे मेंबर झालो.त्यावेळपर्यंत घरातला,नात्यातला की ओळखीचा कोणीच माणूस "मेस" या विषयातला अनुभवी नव्हता,त्यामुळे मेसबद्दल कमालीचे कुतूहल होते.पहिल्याच दिवशी पैसे भरताना मेसचे नियम सांगण्यात आले,त्यात जेवणाची वेळ,खाडे होणाऱ्या दिवसांची संख्या,गेस्टचा जादा चार्ज आणि "फिस्ट" बद्दलची माहिती होती.पूर्वसूचना देऊन केलेले तीन खाडे एकूण महिना रकमेतून वजावटीसाठी ग्राह्य धरले जाणार होते,तसेच पंधरवड्यातून एका रविवारी "फिस्ट" या सदरात दुपारी "स्पेशल जेवण" आणि त्याच संध्याकाळी मेसला "सक्तीची सुट्टी" असणार होती.
मेस सुरु झाली.पहिल्यांदाच जेवणाच्या हौलमध्ये गेलो आणि कोबीच्या भाजीचा उग्र वास नाकात भरला.किंबहुना कोबीच्या भाजीचा इतका भयानक वास येऊ शकतो हे त्यावेळी प्रथमच समजलं.पुढे त्याची सवय झाली कारण कोबीची भाजी वरचेवर ताटात असायची.भाजीला पर्याय म्हणून वरणात चपाती बुडवावी तर त्याने चपाती नुसती ओलीच व्हायची,ती काय मिठाच्या पाण्यात बुडवली असती तरी झाली असती.या व्यतिरिक्त न वेचलेल्या तांदळाचा कच्चा भात आणि सरसकट कच्च्या चपात्यांचीही "पचनसंस्थे"ला सवय होऊन गेली.त्याला कारणही तसेच होते,ते म्हणजे "मनीऑर्डर"ने येणारे नेमके पैसे.महिना मेसचे "एकशेऐंशी रुपये" पेड केल्यावर हाती शिल्लक राहिलेल्या पैश्यातून रोजचा चहा आणि कधीतरी "शामचा वडापाव" एवढंच कसंबसं "म्यानेज" व्हायचं.साधारणपणे बहुसंख्य हॉस्टेलवासीयांची हीच तऱ्हा होती.फारच कंटाळा आला तर एखाद्या मित्राच्या एसटीवरून येणाऱ्या घरच्या डब्यात भागीदारी करायची.पण ते फारच क्वचित घडत असे,कारण त्या मित्राला त्या एका डब्यात दोन वेळेचे जेवण आणि दुसऱ्या दिवशीचा नाश्ता करावा लागत असे. 
दहाबारा दिवसांनी कधीतरी तो पहिल्या "फिस्ट"चा रविवार उजाडला, आणि "स्पेशल मेनू" काय आणि कसा असेल याचा विचार करताकरता दुपार झाली.ताटात चपाती भातासोबत एक आमटीची वाटी होती ज्यात उकडलेलं एक अंड घातलेलं होतं.आमटीच्या पातळपणाचा "गुणधर्म" हा रोजच्या पातळ वरणालाही लाजवणारा होता.मग कोणीतरी "सिनिअर"ने "आयडिया" दिली आणि सर्वांनी अंड्याचा पिवळा भाग कुस्करून आमटीचा "थिकनेस" वाढवला,आणि रोजच्यापेक्षा एक चपाती जादा हाणली.असेच एखाद्या रविवारी "शाकाहारी फिस्ट" म्हणून थोडंस रंगीत गोड दुध मिळायचे ज्याला मेसचे मामा "बासुंदी" म्हणायचे.दिवस संपत होते आणि ह्या सगळ्या गोष्टी "अंगवळणी" खरंतर "पचनी" पडत होत्या. 
दरम्यान कधीतरी कुणाला वरणात "झुरळ" आणि कुणाच्यातरी भातात "अळ्या" सापडल्या. त्यामुळे इतर ठिकाणी होतं तसं "मेस आंदोलन"ही करण्यात आलं.पण या आंदोलनाने "जेवणाचा दर्जा" सुधारण्याच्या ऐवजी आम्हां "आंदोलनकर्त्यांचा दर्जा" मात्र रेक्टर आणि प्राचार्यांच्या नजरेत घसरला.नंतर या मेसचा नाद सोडला आणि गावातली "मेस" सुरु केली.तिथेही एक बदलली,दुसरी लावली,तिसरी सोडली मग चौथी .... "सिलसिला" सुरूच राहिला.
सरतेशेवटी एक लक्षात आले की सगळ्या मेस मालकांची "शाळा" एकच असावी.पुढे वाढत गेलेला "अभ्यास" आणि "एटीकेटी" सारख्या नवनवीन त्रासांनी त्रस्त झाल्याने गावात जेवणासाठी जायला वेळ पुरेना,परिणामी उदरभरणासाठी पुन्हा हॉस्टेलचा "मामा"च... तीन वर्ष पूर्ण झाली.शिव्याशाप दिलेल्या मेसच्या मामालाच शेवटचा "साष्टांग नमस्कार" करून ब्याग उचलली.....ते थेट गावाकडे व्हाया राधानगरी..........
आता आमच्या घराशेजारीच "इंजीनिअरिंग कॉलेज" सुरु झालंय.बरेचजण सुचवतात की "खाजगी हॉस्टेल" आणि "मेस" सुरु कर...बऱ्याचदा विचारसुद्धा येतो मनात,पण पुन्हा ते मुलांचे "शिव्याशाप"आठवतात आणि विचार आपोआप बदलतो.......

"बाबल्याचो सत्कार".....

"बाबल्याचो सत्कार".....


दोन वर्षापूर्वी आमच्या ग्रामपंचायतीला "तंटामुक्ती"चा विशेष पुरस्कार मिळाला.पुरस्काराच्या तीन लाख रकमेच्या विनियोगावरून गावातल्या सत्ताधारी आणि विरोधी अश्या दोन पक्षात इतके "तंटे" उदभवले होते की त्यांचे निवारण झाल्यावर खरंतर सरकारने गावला आणखी एक पुरस्कार द्यायला हवा होता.कोणतेही इतर विकासकाम न करता सदरच्या निधीतून फक्त विविध "सत्कार समारंभ" करण्याच्या अटीवर आमच्या एका ग्रामसभेने "तंटामुक्ती समितीला" निधी खर्चाची परवानगी दिली होती,परिणामी तेव्हापासून गावात "सत्कार सोहळे"सुरु झाले.त्यामुळे आतापर्यंत या ना त्या निमित्ताने गावातील सुमारे नव्वद टक्के नागरिक "शाल श्रीफळ"योजनेचे लाभार्थी झाले आहेत.आता सत्कारापासून वंचित असलेली दहा टक्के जनता लवकरात लवकर "सत्कारमूर्ती"व्हावीत व या झंझटीतून आपली लवकर मोकळीक व्हावी यासाठी आमचे तंटामुक्ती अध्यक्ष प्रयत्नशील आहेत आणि सत्कारासाठी वेगवेगळे फंडे शोधत आहेत.
या "सत्कारवंचित" यादीत आज सकाळपर्यंत आमचा "बाबल्या"सुद्धा होता.अनेकांचे विनाकारण झालेले सत्कार बाबल्याने याच देही याच डोळी न चुकता अनुभवलेले होते.सर्वांसमक्ष आपल्याही गळ्यात पंचायतीची शाल पडावी अशी त्याचीही इच्छा होती.आणि तंटामुक्ती अध्यक्षांच्या कल्पकतेने आज ती फलद्रूप झाली.
आज तेरा ऑगस्ट "जागतिक डावखुरा दिन" ....या दिवसाचे औचित्त साधून ग्रामपंचायतीने गावातील सर्व डावखुऱ्या मंडळींच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता.बारा जणांच्या सत्कारमूर्ती यादीत "बाबल्या"चे नाव पहिल्या क्रमांकावर होते.
बाबल्या तसा "कट्टर डावखुरा" होता,कारण जेवण्यापासून सगळीच कामे तो डाव्या हातानेच करायचा.आयुष्यात पहिल्यांदाच त्याच्या घरी ग्रामपंचायतीच्या सही शिक्क्याने "सन्मानाचे निमंत्रण"घेऊन स्वतः ग्रामसेवक भाऊ गेले होते.त्यामुळे तो भलताच खूष होता.बऱ्याचदा चेष्टेचा ठरणारा डावा हात इतकी मोठी संधी देईल याची त्याला खरंतर कल्पनाच नव्हती.
बारा सत्कारमूर्तीमधून सातजणचं उपस्थित होते.बाकीचे बहुदा "उभयकर"असल्याने त्यांनी सत्काराकडे पाठ फिरवली असावी असे समजून नियोजित वेळेनुसार कार्यक्रम सुरु झाला.नेहमीपेक्षा आजची कार्यक्रमाची उपस्थिती फारच चांगली होती,कारण यापाठी बाबल्याची मोठी मेहनत होती,त्यामुळे डावखुऱ्या मंडळींचा प्रतिनिधी म्हणून त्याला व्यासपीठावर स्थान मिळाले.डाव्या हाताचे महत्व अधोरेखित करण्यासाठी आजचे दिपप्रज्वलन सर्वांनी डाव्या हातानेच केले.कार्यक्रम सुरु झाला.सर्वप्रथम सर्व डावखुऱ्या व्यक्तींचे शाल श्रीफळ देऊन सत्कार आणि फोटोसेशन झाले मग एकेक करून वक्ते माईकचा ताबा घेऊ लागले.
ज्यांचा उजवा मेंदू जास्त सक्रीय असतो अशी माणसे डावखुरी असतात असे कोणीतरी म्हणताच बाबल्याने डोक्याच्या उजव्या बाजूवरुन अभिमानाने हात फिरवला.कुणीतरी डावखुऱ्या व्यक्तीविषयीचे समज गैरसमज यावर तत्वज्ञान पाजळले.तर कुणीतरी त्याची जागतिक आकडेवारी जाहीर केली.जगात दहा टक्के लोक डावखुरे आहेत हे ऐकून बाबल्याबरोबरच इतरांनाही आपण "अल्पसंख्यांक"नसल्याचा साक्षात्कार झाला.सरते शेवटी अध्यक्षीय भाषणात सरपंचानी जगातल्या अनेक प्रसिद्ध डावखुऱ्या व्यक्तींची नावे सांगितली,पैकी अमेरिकेचे बराक ओबामा,आपला अमिताभ आणि सौरभ गांगुली यांची नावे सोडून इतर नावे कोणालाच समजली नाहीत कारण अध्यक्षांकडून त्या अवघड इग्लिश नावांचे उच्चार आणि नावे-आडनावे एकमेकात बेमालूमपणे मिक्स झाली होती.फक्त अमेरिकेचे बरेच अध्यक्ष हे डावखुरे होते हे समजल्यावर आपण इंडियात जन्मलो ही (आईबाबांची) मोठी चूक झाल्याचे बाबल्याने अनेकांजवळ बोलून दाखवले.आभाराच्या भाषणाने कार्यक्रम संपला.डाव्या हाताने प्लेट मधला चिवडा खाताखाता बाबल्याने हळूच अध्यक्षांना विचारले,
"अध्यक्षानु...आता "पायाळू"लोकांचो सत्कार कधी?....नाय ..माझे दोनव झील "पायाळू"आसत म्हणान इचारलयं"..
आणि तंटामुक्ती अध्यक्षांना सत्कारासाठीचा "नवीन" विषय मिळाला.....

Sunday, August 10, 2014

"वटपौर्णिमा"



वटपौर्णीमेचं वाण,
आज वडाला मोठा मान,
सात जन्म सोबतीची देवादिकांना आण, 
दिवसभराच्या उपवासाचा सावित्रींवर ताण,
किमानपक्षी याची तरी तमाम सत्यवानानी ठेवावी जाण.......




"जुळून "आलेला सह"योग".....

"जुळून "आलेला सह"योग".....

खेड्यातल्या कोणत्यातरी कोपऱ्यात बापडा"गरजवंत"दडलेला असतो आणि दूर शहरात कुठेतरी एखादा "दाता"असतो,ज्याचे 'दातृत्व"या दडलेल्या "याचका"पर्यंत पोहोचविण्यासाठी एक सक्षम आणि विश्वासू यंत्रणा कार्यान्वित असावी लागते. आणि आज आनंदाने म्हणावे लागेल की सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी "भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान"च्या रूपाने अशी यंत्रणा "जिवंत"आहे.
पुणे येथील "सेवा सहयोग"ही संस्था दरवर्षी गरीब शालेय विद्यार्थ्यांना हजारो दप्तरांचे वाटप करते."भगीरथ"च्या माध्यमातून यावर्षी जिल्ह्यात सुमारे चारशे दप्तरांचे वितरण करण्यात आले.
आमच्या प्राथमिक शाळेसाठी हा सह"योग"जुळून आला तो "भगीरथ"च्या प्रसाद देवधर यांच्यामुळे .जिल्हा माहिती अधिकारी श्रीम.संध्या गरवारे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आज हा कार्यक्रम संपन्न झाला.
आमच्या दृष्टीने तासभरात हा कार्यक्रम संपला पण दप्तर मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रेरणा देणारी ही "सामाजिक बांधिलकी" त्यांच्या चिमुकल्या पाठीवर पुढे कित्येक दिवस मिरवणार आहे.

"पावस"

मेल्या पावसाक यंदा,
झालाहा तरी काय ?……
दुसरा नक्षत्र संपत इला तरी,
बांडूक आजून आरडाक नाय…
चढणेक मासे चढाक नाय….
कोके सुद्धा उमळाक नाय…. 
मेल्या पावसाक यंदा,
झाला हा तरी काय ?……
छत्री खयं उघडाक नाय …
कांबळी,इरली भिजाक नाय…
भाताच्या लावणेक पाणी नाय….
मेल्या पावसाक यंदा,
झाला हा तरी काय ?…
गुदस्तासारखो यंदा कुडकुडो नाय.....
झापाखालचा तलाग कोणी मारूक नाय .....
कुळदाच्या निस्त्याकाक आजून चवच नाय...
मिरगाचे कुर्ले खय नाटीक नाय....
मेल्या पावसाक यंदा,
झालाहा तरी काय ?...

"सौभाग्य" व "ती"

"सौभाग्य" व "ती"
परवा कामानिमित्त पुण्याला निघालो होतो.अर्थात सकाळची वेळ होती.घरापासून साधारण दहा किलोमीटर अंतर कापले असेन आणि ओसरगावच्या विठ्ठल मंदिराजवळ पोहोचलो.मंदिराच्या थोडसं म्हणजे चार पावलं पुढे गेलो आणि एक विलक्षण दृश्य नजरेस पडलं......
हायवेच्या कडेला डावीकडच्या फुटपाथवर एक मनोरुग्ण स्त्री बसली होती.साधारणता चाळीशीची असावी.तिच्या समोर एक गाठोडं होते आणि एका हातात स्टीलची छोटीशी प्लेट होती,जी तिने आरशासारखी चेहऱ्यासमोर धरली होती.ती काय करते हे पाहण्यासाठी मी गाडीचा वेग कमी केला आणि फोटो घेण्यासाठी म्हणून मोबाईल हातात घेतला तेवढ्यात तिने उजव्या हाताने गाठोड्यातून कुंकू घेतलं आणि कपाळावर लावलं.प्रयत्न करूनही हे दृश्य मला टिपता आले नाही.लगेच तीही गाठोडं उचलून मार्गस्थ झाली
अत्यंत भावनिक असे ते दृश्य होते.माझ्या उजव्या बाजूला म्हणजे पूर्वेला पिवळसर लाल रंगातून सुर्यनारायण आगमन करत होते आणि त्याच्याच साक्षीने डाव्या बाजूला ही दुसरं कसलंच भान नसलेली स्त्री अगदी बेभान होऊन आपलं सौभाग्य मस्तकावर कोरत होती.मनाच्या याही अवस्थेत हा नेमाचा दिनक्रम कुठला हे मलासुद्धा समजेना.
गाडीने वेग घेतला तसा असंख्य विचारांनी सुद्धा....
नक्की हे सौभाग्य तिच्या दृष्टीने काय असावं ? आजची तिची स्थिती ही त्या सौभाग्याच्या संदर्भाने आहे की कसे? ज्याच्या नावाने हे सौभाग्य ल्यावे अशी मनोकामना असताना त्याने नाकारलं म्हणून की ज्याने स्वीकारलं त्याने अर्धवट सोडलं म्हणून?की आणखी काही......
कुठल्याच तर्कापर्यंत पोचता येईना....
सारेच अतर्क्य .......

"टिफीन"......

"टिफीन"......
शाळेत किवा कामावर टिफीन घेऊन जाणे,या गोष्टीबद्दल मला फार आकर्षण आणि कुतूहल आहे.याचं कारण असं की असं सुख मला कधीच मिळालं नाही.(अर्थात ज्यांना ही संधी मिळाली आहे,ते याला "सुख" म्हणतात की "भोग"म्हणत असावेत हे त्यांचे त्यांनाच माहित)
आमची शाळा दुपारची होती त्यामुळे जेवण आटोपून शाळेत जात असू नंतर कॉलेज जीवनातही मेसचा "खुराक" हा सकाळी दहालाच मिळायचा आणि दुपारची भूक श्यामचा वडापाव शमवायचा.पुढे कुठेतरी एखादी नोकरी मिळेल आणि बायकोच्या हातचा "डबा"मिरवत "दहा ते पाच" करता येईल या आशेवर होतो पण तेही नशिबात नव्हतं.
स्वतःचा व्यवसाय सुरु झाला आणि मग जेवणाच्या वेळा आणि ठिकाणे या दोन्ही गोष्टी अनिश्चित झाल्या.त्यामुळे कधी घरी येऊन जेवण आटोपून डुलकी मारायची संधीसुद्धा मिळते तर कधी चार चार दिवस पोटापाण्याची सोय हॉटेलवालेच करतात.
परिणामी रोज "टिफीन"सोबत न्यायची संधी अजून तरी मिळाली नाही.पुढेही शक्यता कमीच आहे.
ही डब्याची हौस भागवायची म्हणून मग मी आमच्या कोकण रेल्वेप्रवासात फारशी गरज नसतानाही (कोकणकन्या गाडीत चांगला मेन्यू असतो)"टिफीन"घेऊन जातो.अश्या प्रकारे डब्यातल्या नेमक्या चपाती-भाजीची सवय नसल्याने कधी भाजी लवकर संपते आणि चपाती उरते तर कधी उलटही होते,पण चारचौघात घरचा डबा उघडून खाण्याची हौस मात्र नक्की फिटते.....

"आठवणी छत्रीच्या."....

"आठवणी छत्रीच्या."....
मला वाटतं प्रत्येकाचं छत्रीशी एक विशिष्ट असं नातं असतं.त्यात करून कोकणातल्या माणसाचं तर खासमखास.....
लहानपणी छत्रीविषयी असलेलं कुतूहल पुढे शाळेच्या दिवसापासून मैत्रीत परावर्तीत होतं,त्यामुळे छत्रीच्या अश्या काही खास आठवणी प्रत्येकाजवळ असतात.
आमच्या लहानपणी नवीन छत्री वापरण्याचा योग काही आला नाही.कोणीतरी चाकरमान्याने दिलेली जुनी छत्री पुढे बरीच वर्षे ठिगळ लावून आम्ही आपलीशी केली होती अर्थात तेव्हाच्या छत्र्या हुकासारख्या विशिष्ट अश्या लांब दांड्याच्या असायच्या,त्यातली एखादी सरळ तीरांची तर एखादी कमळाचा आकार होणाऱ्या तीरांची असायची. तिला कॉटनसारखे दिसणारे जाड कापड असल्याने ठिगळ लावणे सोपे असायचे.बालसुलभ वयामध्ये छत्रीच्या माध्यमातून जितके म्हणून उपद्व्याप
करता येतील तितके आम्हीसुद्धा केले.मग त्यात एकमेकाच्या छत्रीवर छत्रीचे तीर मारून भोकं पाडणे,वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला छत्री धरणे आणि त्याची डिश करणे,छत्रीच्या दांड्यात दप्तर अडकवणे इत्यादी,या सर्वाचा अंतिम परिणाम अर्थातच छत्री मोडण्यात व्हायचा.मग अश्या जुन्या मोडलेल्या अनेक छत्र्यांचे अवयव जोडून वडीलधारी मंडळी पुन्हा एका नव्या छत्रीला जीवदान द्यायचे.कपड्यावर ऑईल पेंटने नाव घालून साहजिकच तिची मालकी पुन्हा आमच्याकडे यायची,दरम्यान याला पर्याय म्हणून एकदा रेनकोट वापरण्याचा प्रयत्नसुद्धा अनुभवला,पण पहिल्याच दिवशी शाळेच्या व्हरांड्यातल्या दांडीवरून रेनकोट ओढताना त्याच शीर धडावेगळ झालं आणि पुन्हा तीच छत्री हातात आली.
पुढे कधीतरी छोट्या दांड्याची फोल्डींगची छत्री आली,आणि कपड्यावर नाव रंगवायचची स्टाईल जावून दांड्यावर (मुठीवर) नावाचे स्टीकर चिटकवायची स्टाईल आली.अश्या छत्रीत कुणालातरी एका सरीपुरता आधार दिल्याची तर कुणीतरी तो आधार सन्मानाने नाकारल्याची आठवण जवळपास सगळ्यांकडेच असेलच,आमच्याकडेही आहे.त्याच बरोबर कुणासाठी तरी आपल्या नसलेल्या स्टौपवर गडबडीत उतरताना अश्या छत्र्या एसटीच्या कॅरिअरवर विसरण्याच्या आठवणीही आहेत.पावसाळा संपल्यावर छत्रीच्या दांड्याला तेल लावून माळ्यावर ठेवण्याची पद्धत आमच्या कोकणात आहे.अश्या छत्रीने पुढच्या वर्षी नव्याकोऱ्या शर्टाचा केलेला सत्यानाश सुद्धा आठवणीतून जात नाही.यापलीकडे जावून कोणी परिचिताने नेलेली छत्री पुन्हा परत न दिल्याचे अनुभवही आठवणीच्या कप्प्यात आहेत.

"बदललेली भूमिका"........

"बदललेली भूमिका"........
गेले आठ दिवस आमच्या घरात बरीच लगबग सुरु आहे.ती अजून पुढचे पाच सहा दिवस चालेल.सणवार नसूनही घरात रोज वेगवेगळ्या आवडीच्या पदार्धांची रेलचेल त्याबरोबरच सामानाची आवराआवर करणे हेही सुरु आहे.
निमित्त आहे आमचे चिरंजीव पुण्याला अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी निघालेत.
ही गडबड पाहून पंचवीस सव्वीस वर्षापूर्वी आम्ही कोल्हापूरला हॉस्टेलवर राहायला निघालो होतो ते दिवस आठवले.आत्ताच्या आणि तेव्हाच्या तयारीमध्ये थोडासा फरक नक्कीच आहे परंतु दोन्हीवेळच्या भावना अगदी सेम टू सेम आहेत.
आता मुलाने अमेरिकन टुरिझम ची ब्याग भरली आहे,आमची तेव्हा पत्र्याची ट्रंक होती,फुलाफुलाची....आता शूज,स्यांडल,स्लीपर असा सेट सोबत आहे तर आमच्याकडे "पायल"ब्रांड स्लीपरच होती.आताच्या पाचसहा रेडीमेड ड्रेसच्या जागी आमच्या टेलरने जमेल तसे शिवलेले प्युअर टेरीकॉटचे दोन नॉन म्याचींग ड्रेस होते.कॉटवरची सतरंजी हीच आमचा मऊशार बेड होता.तेव्हा सोबत आईने दिलेले चण्याचे लाडू,आणि गावठी पोहे यांचा डबा आता बेसन लाडू आणि चिवड्याने भरला आहे.घरी ख्यालीखुशाली कळवायला आम्ही दहाबारा पोस्टकार्ड सोबत घेतली होती त्याची आता गरज आणि सवयचं राहिली नसल्याने मोबाईल पुरेसा आहे.हातखर्चा साठीची तेव्हाची चिल्लर आता एटीएम मधून थेट निघणार आहे.बाकी छोट्यामोठ्या वस्तू त्याच आहेत फक्त ब्रांड बदलले आहेत.
हे झालं सामानाच्या बाबतीत पण आई आज्जीचा जीव तसाच आहे अगदी काळजीतला,जो प्रत्येक घरात असतो.यात एक मात्र विशेष करून जाणवलं अश्यावेळी सगळीकडे असंच म्हणतात की "आता आई,बहिण आणि आजीला करमणार नाही,आठवण येईल वैगरे वैगरे" यात बाबाचं नाव कुठेच येत नाही.पंचवीस सव्वीस वर्षापूर्वी याची तीव्रता जाणवली नव्हती,पण आता मात्र बदललेल्या भूमिकेतून प्रकर्षाने जाणवतेय ...

"ऋणानुबंध"......

"ऋणानुबंध"......
आयुष्यात एकूण दोन ठिकाणी थोडी थोडी नोकरी केली.त्यातले नोकरीचे पहिले ठिकाण होते "डिंभे धरण".इंजिनीअर झाल्या झाल्या डिंभे धरणावर साईट इंजिनीअर म्हणून जॉईन झालो ते साल होतं ब्याण्णव.नवभारत बिल्डर्स कोल्हापूर यांची ती फार मोठी साईट होती.उण्यापुऱ्या वर्षभराच्या तिथल्या वास्तव्याच्या खूप आठवणी अजून ताज्या आहेत.त्यातल्याच अनेक आठवणी कालच्या "माळीण"दुर्घटनेमुळे ताज्या झाल्या.डिंभे धरणाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या माळीण सारख्या तिथल्या अनेक गावांनी तेव्हा आपलं गाव सोडलं नव्हतं.धरण कामाच्या अनुषंगाने तिथे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या होत्या.त्यामुळे कोणी सुपरवायझर,कोणी ड्राईव्हर तर अनेक पुरुष आणि महिला मंडळी मजुरीच्या कामासाठी येत होती.पुनर्वसनाच्या कामापैकी रस्ते आणि मोऱ्या यांचे बांधकाम सुरु असताना माझ्या साईटवर तिथली स्थानिक मंडळी मोठ्या संख्येने होती.सर्वचजण खूप प्रेमळ आणि प्रामाणिक माणसे होती.एकदोनदा परतीची गाडी चुकल्याने त्या वस्तीत राहण्याचा योग आला.तेव्हा आंब्याचा सिझन होता त्यामुळे रात्री साहेबांसाठी खास आमरस पुरीचा बेत आमच्या कामगार मंडळीनी आखला होता तो आज पुन्हा आठवला.एरव्ही तिथे खाण्यापिण्याची सोय नसल्याने प्रसंगी कामगार मंडळींची भाजी भाकरीसुद्धा खाल्ली होती,तिथल्या एकदोन कामगार मुलींच्या लग्नात मला मिळालेली टौवेल टोपी आज पुन्हा आठवली.अश्या गुणी माणसांवर काळाचा घाला आला हे ऐकून फारच अस्वस्थ व्हायला झाले.आज आपल्यात नसलेल्या माळीण गावच्या सर्व ज्ञात अज्ञात मंडळीना भावपूर्ण श्रद्धांजली....

"मैत्रीदिन"

"प्रिय मैत्रीणीस"........
मित्र"यादी" तशी फार मोठी आहे.साधारण आठवतंय तिथून म्हणजे गेल्या पस्तीस वर्षात ज्यांच्याशी मैत्री झाली ती आजपर्यंत "जपली" आणि "फुलवली" सुद्धा....
ह्या मैत्रीच्या "ओघात" आणि "नादात" बऱ्याचदा माझ्या एका "खास मैत्रिणी"कडे दुर्लक्ष झाल्याचेही कधीकधी जाणवलं.पण नाविलाज होता...अर्थात तिचा मोठेपणा हा की, "ती"सुद्धा कधी आमच्या घराबाहेरच्या "मैत्री"आड आली नाही,त्यामुळे आजच्या मैत्रीदिनी या खास मैत्रिणीस खास शुभेच्छा.....!




"बाबल्याचो श्रावण"……

"बाबल्याचो श्रावण"…… 


"संकल्प करणे" आणि "संकल्प सोडणे" ह्या दोन बाबी जरी एकच असल्या तरी श्रावणाच्या बाबतीत मात्र या दोन विरुद्ध बाबी आहेत. बरेचजण "श्रावण"पाळण्याचा "संकल्प करतात" आणि आपल्या सोयीनुसार संधी शोधून एखाद्या कडव्या वारी तो "संकल्प सोडतात"
आमचा "बाबल्या"सुद्धा या बऱ्याच जणांपैकी एक. 
"यंदा श्रावण पाळतलयचं"असा दृढ निश्चय तो दरवर्षी करतो,पण अजूनतरी त्याचा संकल्प सिद्धीस गेलेला कोणाच्या ऐकिवात नाही. संपूर्ण श्रावण महिना मांसाहार करायला मिळणार नाही या सबबीवर आधीचे अख्खे दोन महिने तो शाकाहारी जेवणाला स्पर्श सुद्धा करत नाही.यंदाही आधीचे दोन महिने त्याने कोंबड्या बकऱ्यावरच घालवले. यावर्षीचा श्रावण सुरु झाला पण इथल्या काहींच्या पद्धतीने रविवारचा पहिला दिवस त्याने "धोंड दिवस" म्हणून पुन्हा मांसाहारावर ताव मारला. आणि सोमवारपासून त्याचा अधिकृत श्रावण सुरु झाला,मंगळवार नंतरचा बुधवारही बाबल्या शाकाहारी राहिला त्यामुळे त्याच्या संकल्पाच्या चर्चा आमच्या नाक्यावर सुरु झाल्या.बाबल्याचा पाळलेला श्रावण आता किती मोठा होतो हे औत्सुक्य मात्र जास्त दिवस टिकलं नाही. नागपंचमीला मुंबईवरून आलेल्या एका चाकरमान्यासोबत शनिवारी गुपचूप एका धाब्यावर बाबल्या चिकन तंदुरी सोडवत होता. आणि नेमका हाच सीन बाबल्याच्या एका सो कॉल्ड मित्राने पाहिला.ज्याचे वर्षभर दारू मटक्यासारखे अनेक काळे धंदे चालतात पण तो दरवर्षी श्रावणात न चुकता कडक उपवास,पारायणे,शिर्डीवारी वैगरे करतो.बाबल्याची खेचण्याच्या उद्देशाने तो म्हणाला.
"काय मेल्या बाबल्या,तुका श्रावण बिवण काय हा की नाय… काय सगळाच सोडलस"….
आता बाबल्याचा श्रावण तर सुटलाच होता पण चारचौघात मित्राची अब्रू काढण्याची संधी त्याला सोडायची नव्हती,तो हजरजबाबीपणे उत्तरला…
"श्रावण बिवण तुमच्या सारख्या असुरांका…. पूर्वीच्या काळी असुर सुदा असाच करीत,थोडे दिवस कडक जपतप,उपासतपास करीत आणि एकदा काय देव पावलो की जगाक नाडूक,उच्छाद मांडूक मोकळे…. तेतलेच तुम्ही"….

"आश्वासक".....

भारतीय जनता पार्टी,सिंधुदुर्गचा सुमारे पंधरा वर्षाचा प्रवास,त्यातले चढउतार जवळून पाहाताना गेल्या सोमवारचा दिवस फार आनंददायी असा भासला.त्यादिवशीच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत जिल्ह्यातल्या सुमारे पाचपन्नास सक्रीय कार्यकर्त्यांचा पक्षात झालेला प्रवेशसोहळा पदाधिकारी आणि जुनेजाणते कार्यकर्ते यांचा उत्साह वाढवणारा असा होता.मोदी साहेबांच्या रूपाने भारताला एक न भूतो न भविष्याती असा पंतप्रधान मिळाल्यावर देशातील तमाम नागरिकांमध्ये एक चैत्तन्य पसरले असून त्यांच्या इतकी वर्षे दबलेल्या आणि मेलेल्या अपेक्षा वाढलेल्या आहेत.आणि एक कार्यकर्ता म्हणून नक्की हा विश्वास आहे की देश,राज्य आणि जिल्हा पातळीवरील सर्व भाजप कार्यकर्ते आता राजकारणापलीकडे जाऊन शाश्वत असे काम उभे करतील.
याचाच एक भाग म्हणून आमचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी कालच्या बैठकीत विविध विषयातल्या तज्ञांना खास मार्गदर्शनासाठी आमंत्रित केले होते.त्यात जिल्ह्यात ग्रामविकासाचे चांगले काम उभे करणारे डॉ.प्रसाद देवधर,कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव,मच्छिमार कृती समितीचे विकी तोरस्कर,सोशल मिडिया मार्गदर्शक खानोलकर या मंडळीनी कार्यकर्त्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.
सध्याच्या भाजप टीममधील बरेचसे पदाधिकारी हे युवामोर्चाच्या "अतुल टीम" मधील असून पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर आणि आमदार प्रमोद जठार,माजी आमदार अजितराव गोगटे आणि इतर जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जोमाने कार्यरत आहेत.आशा करू की यापुढे असेच पक्षप्रवेश घडत राहतील आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यातील संघटन हे जिल्ह्यातल्या इतर पक्षांना केवळ संख्यात्मक दुष्ट्या नव्हे तर गुणात्मक दुष्ट्या सुद्धा "ओव्हरटेक"करून पुढे जाईल......

"राखी"

आज whatsApp वर आमच्या "सावंत" ब्रांडच्या "राखी"चे जोरदार "प्रमोशन" सुरु होते.

"वर्तमानपत्र"......

"वर्तमानपत्र"......

काही माणसांची सुशिक्षित असूनही "वर्तमानपत्र" या विषयाशी इतकी "दुष्मनी" का असते देवच जाणो.ताजा नवा कोरा पेपर कसा हाताळावा,कसा वाचवा हे अश्यांना कळतच नाही.काल सकाळी रत्नागिरी स्टेशनवर दोन "मराठी" वर्तमानपत्रे घेऊन "कोकणकन्या" गाडीत चढलो.एव्हाना गाडीतले प्रवाशी झोपेत होते म्हणून लाईट न लावताच "हेडलाईन" वरून नजर फिरवली तेवढ्यानेच "हेड" दुखू लागलं म्हणून बर्थवर आडवा झालो.
थोड्या वेळातच उजेड झाला आणि माझ्या वर्तमानपत्रांची भ्रमंती सुरु झाली.बघताबघता दोन पेपरची सगळी पाने सुटी होऊन जवळपास सात आठ जणांचे वाचन सुरु झाले.प्रत्येक जण आपापल्या सोयीने हव्या तश्या एक दोन घड्या घालून,चुरगाळून पेपर वाचत होता.माझी खरंतर सटकत होती,तरीही मी संयम ठेवला.(मला घडी विस्कटून किवा चुरगाळून पेपर वाचायला आवडत नाही आणि तश्या तऱ्हेने वाचणारी माणसे सुद्धा)
नंतर कधीतरी माझ्याकडून पेपर नेणाऱ्याने सगळ्या पानांची एकत्रितपणे "सुरळी" करून आणून दिली.त्या वर्तमानपत्रांची अवस्था पाहून सकाळचा पेपर वाचायचा मूडच गेला.त्या सर्वांची व्यवस्थित घडी करण्याचा प्रयत्न करत मी "तरुण भारत" आणि "प्रहार" असे दोन वेगवेगळे पेपर करण्यात यशस्वी झालो.आणि त्याचवेळी प्रहारची "किलबिल" पुरवणी त्यात नसल्याचे लक्षात आले.
कणकवली गेल्यावर पलीकडच्या बर्थखाली लक्ष गेले तर तिथे चुरगळलेली "किलबिल" पुरवणी दिसली.गाडीतून उतरताना तिथल्या इसमाने बहुदा बर्थखालची आपली ब्याग आणि बूट पुसून घेतले होते त्या कागदांनी....कागद म्हणण्याचा उद्देश हाच की त्याच्या दृष्टीने तो रद्दीतला कागदच होता......
वर्तमानपत्र हाताळण्याच्या आणि वाचण्याच्या बाबतीत असे खूप ठिकाणी होते.
अवघ्या दोनचार रुपयात जगाच्या कानाकोपऱ्यातली इत्यंभूत माहिती देणारे वर्तमानपत्र एक दिवस तरी व्यवस्थित सांभाळायला काय हरकत आहे ? दुसऱ्या दिवशी ते रद्दीत जाणारच असते.आणि ही गोष्ट बऱ्याच सो कॉल्ड सुशिक्षिताना समजत नाही तेव्हा फार राग येतो........
त्यांचा नव्हे तर त्यांना सुशिक्षित म्हणणाऱ्यांचा.......