Tuesday, October 15, 2013

ENGINEERS DAY 2013

"अमंत्रं अक्षरं नास्ति……
नास्ति मूलं अनौषधीम
अयोग्य: पुरुषो नास्ति …
योजकस्तत्र दुर्लभ॥" …
(ही संस्था अभियांत्रिकी योजक घडविते.)

हे सुभाषित आमच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात दर्शनी भागावर "फ्रेम" होतं.अर्थात त्याकाळी खरोखरच अभियांत्रिकी योजकांची दुर्लभता होती. पण काळ बदलला आणि महाराष्ट्रात अभियांत्रिकी कॉलेजेसच्या अतिरेकाने "अभियंता"नावाचं वारेमाप पिक आलं,आणि "उत्पादन जास्त -दर कमी" हे व्यावहारिक सूत्र इथेही लागू पडलं,परिणामी अभियंत्यांचा "भाव" बराच गडगडला.याचाच परिणाम असा झाला की,अलीकडच्या २/३ वर्षात तर राज्यात अभियांत्रिकीच्या किमान २०/२५ टक्के जागा या शिल्लक राहू लागल्यात. आपला पाल्य अभियंता म्हणून पाहण्याचं पालकांचं स्वप्न काही गैर नाही परंतु विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता आणि शिक्षण देणाऱ्या कॉलेजचा दर्जा यामुळे अलीकडच्या काळात शिकून बाहेर पडलेल्या अभियंता मित्रांमध्ये सुभाषिताला अपेक्षित असा "योजक" अभावानेच आढळतो.मित्रानो,ही बाब खेदाची असली तरी त्रिवार सत्य आहे.
आपण सर विश्वेश्र्वरैय्या यांच्या स्मृतींना वंदन करून दरवर्षी त्यांच्या जन्मदिनी "अभियंता दिन"साजरा करत असतो.त्यामुळे त्यांच्या ख्यातीला,त्यांच्या लौकिकाला साजेसं काम आपल्या हातून करण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रत्येक अभियंत्याने करायला हवा,तरच सरांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिल्यासारखी होईल. अन्यथा इतर जयंत्या- पुण्यतीथ्या सारखे यातलेही गांभीर्य निघून जाईल.
माझ्या सर्व अभियंता मित्रांना "अभियंता दिनाच्या" खास शुभेच्छा …!
 —

No comments:

Post a Comment