Tuesday, October 1, 2013

" गरज जेष्ठ नागरिकांच्या सन्मानाची"……

" गरज जेष्ठ नागरिकांच्या सन्मानाची"…… 
कुठल्यातरी प्रांतात तिथल्या प्रथेनुसार लग्नासाठी वराकडची मंडळी वधूच्या गावी जात.वधूच्या गावाच्या सीमेवर त्यांचे भव्य स्वागत होत असे. त्या नंतर वधुकडची मंडळी वराला जवळजवळ आपल्या ताब्यातच घेत असत आणि सोबत आलेल्या वऱ्हाडी मंडळीना वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून हैराण करून सोडत. अश्याच एका लग्नासाठी "वर" निघाला असता त्याच्यासोबत वऱ्हाडी म्हणून फक्त तरुण मंडळीनी जायचे ठरवले. वयस्कर माणसे आपल्याला मनाप्रमाणे मौजमस्ती करू देत नसल्याने त्यांनी सगळ्याच जेष्ठ मंडळीना निरनिराळी कारणे सांगून न येण्याची विनंती केली. जाणत्या माणसाना नक्की माहित होते की,वधूकडची मंडळी ह्या तरुण मंडळीना सळो की पळो करून सोडतील आणि या लग्न सोहळयात विनाकारण वाद होतील.पण त्यांचा नाविलाज होता. 
वरासहित सगळी युवा फौज समानसुमान बांधून जायला निघाली. सोबत कुणीही जाणती माणसे नसल्याने अर्थातच सर्वांची मजामस्ती जोशात सुरु होती. इकडे गावाच्या सीमेवर वधूकडील मंडळीनी त्यांच्या जोरदार स्वागताची तयारी केली होती. सर्वच पाहुणेमंडळी तरुणतुर्क दिसल्याने वधूकडील मंडळींचा त्यांची गंमत करण्याचा हुरूप आणखीनच दुणावला. झालं,वराकडील मंडळीवर स्वागतालाच पहिला बॉम्ब पडला.
"तुमची एकूण पन्नास मंडळी आहेत आणि तुमच्यासाठी हे खास पन्नास बकरे आहेत. या सर्वांचं मटण करून खायचं आणि मगच सीमेच्या आत यायचं"........."काही लागलं सवरलं तर आम्ही आहोतच सेवेला"
या एकाच अटीवर तरुण मंडळी बरीच चक्रावून गेली. प्रत्येकाने खूप विचार करून पाहीला पण प्रत्येकी एक बकरा खायचा म्हणजे कसं शक्य आहे.असली कसली विचित्र अट.हे अशक्य आहे वैगरे वैगरे सुरु झालं. समोरचा वधूपक्ष मात्र आपल्या भूमिकेवर ठाम होता.बराच वेळ गेला, तोडगा तर निघाला नाहीच, उलट भांडणाला सुरवात झाली. वाद विकोपाला गेले आणि वराकडील मंडळी वरासहीत परतीला लागली.
तेवढ्यात एक साठीपार व्यक्ती पुढे आली जी वराकडील होती आणि गुपचूप सामानाच्या पेटाऱ्यातून लपून आली होती. त्यांनी वधूपक्षाचा पन्नास बकऱ्याचे जेवण जेवण्याचा प्रस्ताव मान्य केला. ती व्यक्ती म्हणाली
"आमची पन्नास मंडळी आहेत,आम्हाला पन्नास बकरे द्या,आम्ही रोज एक बकरा कापून सर्वांसाठी जेवण करू. पन्नास संपले कि सीमेच्या आत प्रवेश करू,तोपर्यंत बसा आमच्या सेवेसाठी काही लागलं सवरलं बघायला या इथेच"
वधुकडच्या मंडळीना हा तोडगा पुरता तोंडघशी पाडणारा होता त्यामुळे अर्थातच तिढा सुटला,लग्न झाले. आणि जुन्या-जाणत्या,अनुभवी माणसांची समाजरचनेत खूप गरज असते हे ही अधोरेखित झाले.
आज ही कधीतरी आजीकडून ऐकलेली गोष्ट आठवण्याचे कारण म्हणजे आजचा "जेष्ठ नागरिक दिन".
मित्रहो आपल्याला अश्या बऱ्याच बाबीत या अनुभव संपन्न जुन्याजाणत्यांची फार गरज आहे.आजच्या लहान मुलांना त्यांच्या संस्काराची गरज आहे,त्यांच्या आशीर्वादाची गरज आहे, त्यामुळे त्यांचा यथोचित आदर सन्मान होणे हि काळाची गरज आहे. चला तर मग स्वतःच्या घरापासूनच सुरवात करूया जेष्ठांना सुखी-आनंदी ठेवण्याची,त्यांची काळजी घेण्याची ……. 


No comments:

Post a Comment