Thursday, October 24, 2013

"जित्याची खोड… मेल्यानंतरही जात नाही "

"जित्याची खोड… मेल्यानंतरही जात नाही "
काही माणसे हि जगाला फक्त त्रास देण्यासाठीच जन्माला येतात की काय?अशी बऱ्याचदा शंका येते,आणि बहुतेकदा ती खरीही असते.अलीकडच्या काळात तर ही शंका खरी करून देण्यासाठी देशातल्या तमाम राजकारणी मंडळीत स्पर्धा लागलेली दिसते.खरतरं अश्यांना  माणसे का म्हणावीत असा प्रश्न कदाचित सर्वानाच पडत असावा…आधुनिक "दानव"च ते…. त्यामुळे एकदा का अश्या दानवांनी "नरकाचं तिकीट" फाडलं की मगच पिडीताना खऱ्या अर्थाने जगण्याचा मार्ग मोकळा होतो,अर्थात तेही पुढे "वारसा"चालणार नसेल तरच…. 
याही पुढे जाऊन कधीतरी एक गोष्ट ऐकली होती ती अशी …. 
एका गावात एक जमीनदार राहत असतो. त्या गावासहित आजूबाजूच्या गावातही  त्याचा फार दरारा असतो,आणि एखाद्या दानवाला लाजवेल अश्या प्रकारचा क्रूरपणा त्याच्या ठायी ठायी भरलेला असतो. अत्यंत सज्जन आणि परोपकारी दांपत्याच्या पोटी जन्माला आल्याने सुरवातीच्या काळात लोकांनी त्याचा उन्मतपणा दृष्टीआड केला. पण पुढे जाऊन त्या भागातल्या तमाम जनतेला त्याने जगणे नकोसे करून टाकले. मी म्हणेन ती पूर्वदिशा. त्याला आवडेल ती जमीन,आवडेल ती इस्टेट,आवडेल ती बाई,आणि बरंच काही जे त्याच्या मनात येईल ते तो कोणालाही न जुमानता ताब्यात घेई.
अजिबातच  नाही असा नाही,काही जणांनी त्याला विरोध करायचा प्रयत्न केला पण बिचाऱ्यांची बायकापोरे वाऱ्यावर पडली.गावात इतरही जमीनदार होते पण आपल्याला शह देऊ शकतील अश्यांना त्याने वेळच्या वेळी ठेचून काढलं. या साऱ्या दहशतीमुळे  मनात नसताना सुद्धा भीतीने सारी जनता त्याचा जयजयकर करत असे,आणि मनातल्या मनात प्रचंड शिव्याशाप देत असे. 
होता होता बरीच वर्ष संपली,जमीनदाराला म्हातारपण आलं,हळूहळू त्याची जरब कमी व्हायला लागली,त्याच्या जुलमी स्वभावामुळे त्याच्यापासून बायकापोरे सुद्धा दुरावली.त्याच्या अवती भवतीचे त्याच्या जीवावर माजलेले गुंड पुंड सुद्धा आता लोकांच्या भीतीने म्हाताऱ्याला अंतर देऊ लागले. एकट्या पडलेल्या जमीनदाराने सरतेशेवटी लोकांसमोर शरणांगती पत्करली.झालं ते झालं पण यानंतर तरी त्रासातून आपली सुटका झाली म्हणून गावकऱ्यानी त्याला मोठ्या मनाने माफही केलं.
इकडे म्हातारा नाना विकारांच्या साथीने पुरता खंगत चालला होता.एक दिवस त्याने पुऱ्या गावाला एकत्र बोलावले आणि म्हणाला "गावकरी मंडळी खरतरं मी आयुष्यभर तुमच्यावर अनन्वित अत्याचार केलेले आहेत तरीही तुम्ही मला माफ केलात त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे.
आता माझी एकच शेवटची इच्छा पुरी करा,ती म्हणजे मी तुम्हाला दिलेल्या त्रासाबद्दल प्रायश्चित्त म्हणून तुम्ही मला शिक्षा द्या,जेणेकरून मला सुखाने मरता येईल" भोळे भाबडे गावकरी म्हणाले, तुम्हाला झालेला पश्चाताप हीच तुमची शिक्षा आहे. मात्र म्हातारा शिक्षेवर ठाम राहिला,त्याने गावातील सर्व पुरुष मंडळीनी मला मरेपर्यंत दांड्यांनी मारावे आणि माझी या पापातून सुटका करावी यासाठी कमालीचा आग्रह धरला.हो नाही होता होता एके दिवशी हा मारण्या-मरणाचा कार्यक्रम पार पडला 
दुसऱ्या दिवशी गावात पोलिस आले आणि सर्व पुरुषमंडळीना अटक करून घेऊन गेले ते दोन पाच वर्षांच्या शिक्षेसाठीच.
कारण जुलमी म्हाताऱ्याने मरणाआधीच पोलिसांच्या नावे घरात "चिठ्ठी" ठेवली होती.ज्यात मृत्यूचे कारण नमूद होते. 
त्यामुळे मूळ म्हण बदलून आता म्हणावं लागेल 
"जित्याची खोड … मेल्यानंतरही जात नाही"

No comments:

Post a Comment