Tuesday, October 15, 2013

"खरा तो एकचि धर्म… जगाला प्रेम अर्पावे"

"खरा तो एकचि धर्म… जगाला प्रेम अर्पावे"
निसर्गचक्रानुसार "दिवस" येतात-जातात. त्यातले काही आनंदाचे तर काही दुःखाचे असतात. काही दिवस तर आयुष्यात नुसते यायचे म्हणून येउन जातात, पण एखाद-दुसरा दिवस मात्र आपल्याला खूप काही देऊन जातो.माझ्या दृष्टीने कालचा "गांधी जयंती"चा दिवस अगदी तसाच होता. 
निमित्त होते जीवन आधार संस्थेच्या "संविता आश्रम" या नवीन उपक्रमाचे उद्घाटन.…आमचे मित्र संदीप परब प्रमुख असलेल्याया संस्थेने तीन वर्षापूर्वी अणाव,ता. कुडाळ,सिंधुदुर्ग येथे "आनंद आश्रम" हा निराधार वृद्धांसाठीचा आश्रम सुरु केला असून तिथे सुमारे तीस निराधार वृद्ध सेवा घेत आहेत. त्यानंतर रस्त्यावर निराधार बनून फिरणाऱ्या मनोरुग्णांसाठी हा "संविता आश्रम" सुरु होत आहे.
या निमित्ताने इथे उपस्थित असणारी सर्वच मंडळी ही "समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ते कोणत्यातरी रुपात परत केले पाहिजे" अश्या प्रकारची भावना मनात असणारी होती.आणि एकाच सभामंडपात एवढ्या मोठ्या संख्येने जमलेली अशी मंडळी पाहून उपस्थित प्रत्येकालाच सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने फार आशावादी व्हायला झाले.
यात ज्यांचा तरुण मुलगा देशासाठी शहीद झाला ते केरबा माने,सैनिकांच्या आणि पोलिसांच्या टोपीमध्ये आपल्या वडिलांचा चेहरा शोधणारी कुंडलिकची छोटी करिष्मा, शहीद मनीष कदम यांचे विरपिता. जेष्ठ नागरीकांसाठी काम करणाऱ्या फेसकॉमचे पदाधिकारी,सामाजिक कार्यात सढळहस्त असणारे रणजीत देसाई,पत्रकारितेच्या माध्यमातून दात्यांना वंचीतांपर्यंत पोहचवणारे शेखर सामंत,आश्रमाला वैदकीय सुविधा देणारे डॉ. विद्याधर तायशेटे,डॉ.कौत्सुभ लेले,या कामाला पोलिसी सहकार्य देणारे पोलिस निरीक्षक पवार,आश्रमाला विनामूल्य जागा देणारे चोपडेकर, सावंत, परब,तसेच जिल्ह्यातले अनेक इंजिनिअर,डॉक्टर,वकील,सामाजिक कार्यकर्ते,सामान्य नागरिक,विद्यार्थी आणि सर्वात महत्वाची मंडळी म्हणजे संदीप परब यांना साथ देणारी त्याची संपूर्ण टीम याप्रसंगी उपस्थित होती. सर्वांच्याच मनात समाजाप्रती काही ना काही काम करण्यासाठीची भावना दिसून येत होती,व्यक्त होत होती.आणि जर ही चळवळ अशीच सुसाट वेगाने चालत राहिली तर साने गुरुजींच्या "खरा तो एकचि धर्म… जगाला प्रेम अर्पावे" प्रार्थनेतला शब्द न शब्द आचरणात आल्याशिवाय राहणार नाही.अशी अशा ठेवायला हरकत नाही.

No comments:

Post a Comment