Sunday, October 27, 2013

"चकल्या विस्कटल्या आणि गृहिणबाई फिस्कटल्या"

"चकल्या विस्कटल्या आणि गृहिणबाई फिस्कटल्या"
दिवाळीचा फराळ कधी तोंडात पडेल तेव्हा पडेल पण त्याच्या तयारी निमित्त सध्या इतकी कामे आणि कटकटी मागे लागतात की "फराळ नको …. गुऱ्हाळ आवर" असे म्हणायची वेळ येते. बहुदा सगळ्यांनाच या गोष्टीचा कमी अधिक अनुभव असण्याची शक्यता आहे (नसल्यास मात्र स्वतःला भाग्यवान समजावे ).
दरवर्षी वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने बनवण्याची गृहिणीना भारी हौस असते. मग असे प्रयोग करताना त्यातला एखादा पदार्थ चुकून बिघडला तर मात्र कोणाचीच खैर नसते. सुरवात नेहमीच "रेसिपी" देणाऱ्या बाईंपासून असते आणि शेवट अर्थातच नवरोबावर असतो.(निवडक साहित्य आणले नाही अश्या आशयाने).
बहुतेक ठिकाणी प्रतिवार्षिक काही ना काही बिनसतचं… कधी लाडवातला रवा/बेसन कच्चे असते तर कधी करंजीतल्या सारणा"ची गोडी कमी/जास्त होते.चहा सोबत चांगला लागावा अशी अपेक्षा असलेला "चिवडा" जरा जास्तीचा तिखट होतो आणि "चकना"म्हणूनच जास्त वावरतो.साधी शंकरपाळी सुद्धा कधी कधी दातांचा टणकपणा तपासण्याचे हत्यार बनून समोर येते."चकलीबाई" सर्वगुणसंपन्न असणे हा तसा नशिबाचाच भाग म्हणावा लागेल.
आज आमच्या घरीही चकल्यानी हिला चकवलं.फराळाच्या "नमनालाच कढईभर तेल" वाया गेलं. त्यामुळे एखाद्या पारंपारिक मतदारसंघात डीपौझिट जप्त झाल्यावरही उमेदवाराला वाटणार नाही इतकं वाईट सौ. ना वाटलं. …
हे सगळं अनुभवल्यानंतर आमच्या कोकणातली पूर्वीची दिवाळी आणि दिवाळीतला एकमेव फराळ आठवला. …… "पोहे"…… नवीन कापणीतले वालयचे भात भिजवायचे आणि गिरणीवरून लाल पोहे कुटून आणायचे…. चहातले पोहे,गोडे पोहे आणि कांदा पोहे …. खा की खा…. पदार्थ बिघडण्याची शक्यताच नाहीच चुकून कधी बिघडलं तर पोटचं …
 

Thursday, October 24, 2013

"जित्याची खोड… मेल्यानंतरही जात नाही "

"जित्याची खोड… मेल्यानंतरही जात नाही "
काही माणसे हि जगाला फक्त त्रास देण्यासाठीच जन्माला येतात की काय?अशी बऱ्याचदा शंका येते,आणि बहुतेकदा ती खरीही असते.अलीकडच्या काळात तर ही शंका खरी करून देण्यासाठी देशातल्या तमाम राजकारणी मंडळीत स्पर्धा लागलेली दिसते.खरतरं अश्यांना  माणसे का म्हणावीत असा प्रश्न कदाचित सर्वानाच पडत असावा…आधुनिक "दानव"च ते…. त्यामुळे एकदा का अश्या दानवांनी "नरकाचं तिकीट" फाडलं की मगच पिडीताना खऱ्या अर्थाने जगण्याचा मार्ग मोकळा होतो,अर्थात तेही पुढे "वारसा"चालणार नसेल तरच…. 
याही पुढे जाऊन कधीतरी एक गोष्ट ऐकली होती ती अशी …. 
एका गावात एक जमीनदार राहत असतो. त्या गावासहित आजूबाजूच्या गावातही  त्याचा फार दरारा असतो,आणि एखाद्या दानवाला लाजवेल अश्या प्रकारचा क्रूरपणा त्याच्या ठायी ठायी भरलेला असतो. अत्यंत सज्जन आणि परोपकारी दांपत्याच्या पोटी जन्माला आल्याने सुरवातीच्या काळात लोकांनी त्याचा उन्मतपणा दृष्टीआड केला. पण पुढे जाऊन त्या भागातल्या तमाम जनतेला त्याने जगणे नकोसे करून टाकले. मी म्हणेन ती पूर्वदिशा. त्याला आवडेल ती जमीन,आवडेल ती इस्टेट,आवडेल ती बाई,आणि बरंच काही जे त्याच्या मनात येईल ते तो कोणालाही न जुमानता ताब्यात घेई.
अजिबातच  नाही असा नाही,काही जणांनी त्याला विरोध करायचा प्रयत्न केला पण बिचाऱ्यांची बायकापोरे वाऱ्यावर पडली.गावात इतरही जमीनदार होते पण आपल्याला शह देऊ शकतील अश्यांना त्याने वेळच्या वेळी ठेचून काढलं. या साऱ्या दहशतीमुळे  मनात नसताना सुद्धा भीतीने सारी जनता त्याचा जयजयकर करत असे,आणि मनातल्या मनात प्रचंड शिव्याशाप देत असे. 
होता होता बरीच वर्ष संपली,जमीनदाराला म्हातारपण आलं,हळूहळू त्याची जरब कमी व्हायला लागली,त्याच्या जुलमी स्वभावामुळे त्याच्यापासून बायकापोरे सुद्धा दुरावली.त्याच्या अवती भवतीचे त्याच्या जीवावर माजलेले गुंड पुंड सुद्धा आता लोकांच्या भीतीने म्हाताऱ्याला अंतर देऊ लागले. एकट्या पडलेल्या जमीनदाराने सरतेशेवटी लोकांसमोर शरणांगती पत्करली.झालं ते झालं पण यानंतर तरी त्रासातून आपली सुटका झाली म्हणून गावकऱ्यानी त्याला मोठ्या मनाने माफही केलं.
इकडे म्हातारा नाना विकारांच्या साथीने पुरता खंगत चालला होता.एक दिवस त्याने पुऱ्या गावाला एकत्र बोलावले आणि म्हणाला "गावकरी मंडळी खरतरं मी आयुष्यभर तुमच्यावर अनन्वित अत्याचार केलेले आहेत तरीही तुम्ही मला माफ केलात त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे.
आता माझी एकच शेवटची इच्छा पुरी करा,ती म्हणजे मी तुम्हाला दिलेल्या त्रासाबद्दल प्रायश्चित्त म्हणून तुम्ही मला शिक्षा द्या,जेणेकरून मला सुखाने मरता येईल" भोळे भाबडे गावकरी म्हणाले, तुम्हाला झालेला पश्चाताप हीच तुमची शिक्षा आहे. मात्र म्हातारा शिक्षेवर ठाम राहिला,त्याने गावातील सर्व पुरुष मंडळीनी मला मरेपर्यंत दांड्यांनी मारावे आणि माझी या पापातून सुटका करावी यासाठी कमालीचा आग्रह धरला.हो नाही होता होता एके दिवशी हा मारण्या-मरणाचा कार्यक्रम पार पडला 
दुसऱ्या दिवशी गावात पोलिस आले आणि सर्व पुरुषमंडळीना अटक करून घेऊन गेले ते दोन पाच वर्षांच्या शिक्षेसाठीच.
कारण जुलमी म्हाताऱ्याने मरणाआधीच पोलिसांच्या नावे घरात "चिठ्ठी" ठेवली होती.ज्यात मृत्यूचे कारण नमूद होते. 
त्यामुळे मूळ म्हण बदलून आता म्हणावं लागेल 
"जित्याची खोड … मेल्यानंतरही जात नाही"

Wednesday, October 23, 2013

"श्रमप्रतिष्ठा"……

"श्रमप्रतिष्ठा"……
अलीकडे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात वावर असल्याने बऱ्याचदा विद्यार्थी आणि युवकांसाठी "श्रमप्रतिष्ठा" या विषयावर बोलावे लागते.आमच्यावेळी हा भाषणाचा विषय नसेल कदाचित पण आमच्या जडण घडणीत मात्र श्रमप्रतीष्ठेचा मोठा वाटा आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय निर्मितीच्या कामाने नुकताच(1992) वेग घेतला होता.ओरोस येथे मोठ्यामोठ्या प्रशासकीय इमारती आणि इतर विकासकामांची अनेक बांधकामे सुरु झाली होती. दरम्यान "आम्ही" सुद्धा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका घेऊन आमच्या गावी परतलो होतो.त्याकाळात सिव्हिल इंजिनीअर ना फारसे चांगले दिवस नव्हते.शासकीय भरती प्रकिया पूर्णपणे ठप्प होती. पुण्या-मुंबईत खाजगी काम करण्यापेक्षा घरची "पेज"खाऊन इथेच काम शोधणे हितावह वाटत होते कारण मुख्यालयातील कामांच्या रूपाने संधी तर समोरच होती.
मी वर "आम्ही" असा उल्लेख केला तो (भोसले-सावंत असल्याने) स्वतःला आदरार्थी संबोधन म्हणून नव्हे तर "आम्ही" म्हणजे माझा मित्र "संतोष कदम" व मी असा होता. इथे आल्यावर आम्ही दोघानीही ओरोसला वेगवेगळ्या फर्म मध्ये कामाची कामाची सुरवात केली. या कामाचे विकासक "सिडको"म्हणजे एक आगळं वेगळं कुटुंबच होतं.नवी मुंबई आणि इतर प्रांतातून आलेले मोठमोठे ठेकेदार आणि इंजिनीअर मंडळी खूपच मिळून मिसळून वागणारी होती. आम्ही वयाने लहान,त्यात इथले "भूमिपुत्र" आणि हरहुन्नरी असल्याने आमचा संचार  सर्वत्र आणि सर्वमान्य असायचा.
स्वतः कंत्राटदार व्हायची फार इच्छा होती ती "वसंत धडके" या एका सज्जन कार्यकारी अभियंत्याने अगदी सहजपणे पूर्ण केली.त्यांच्याच पुढाकाराने पहिलं-वहिलं काम मिळालं तेही रस्त्याच. खूप आनंद झाला. संतोष कदम व मी एकत्रपणे ते सुरु केले. आमच्याकडे तेव्हा कामासाठीची साधन सामुग्री किवा आर्थिक तरतूद तशी काहीच नव्हती.पण सगळ्यांशी यारी-दोस्ती छान होती, त्यामुळे सहकार्याची खात्री होती. आमच्या पहिल्याच कामाचे स्वरूप होते मातीचा भराव करून एक मोरी (सी डी वर्क) बांधायची आणि रस्ता खडीकरण करायचे. नवीन घमेली,टिकाव फावड्यांची खरेदी झाली.मुहूर्ताचा नारळ फुटला.त्याच दिवशी भरावाचे काम सुरु करायचे ठरले. संध्याकाळच्या वेळी कुठल्याश्या दुसऱ्या कामावर खोदकाम चालू होते, त्या ठिकाणची माती भाड्याच्या डंपरने आणण्याची बोलणी झाली.माती फुकट आणि वर मशीनने भरून मिळणार होती फक्त डंपर अनलोड केल्यावर हवारी (मातीचा ढीग पसरणे) साठी कामगारांची गरज होती ते सुद्धा सांगितले. थोडक्यात सगळी "जोडणी"पूर्ण झाली होती.
स्वतःचे पहिले काम असल्याने ती संध्याकाळ एका वेगळ्या उत्सुकतेची होती.जोडणीप्रमाणे माती भरून डंपर आला पण हवारीसाठी सांगितलेल्या कामगारांचा अजून पत्ता नव्हता,त्यांच्या शोधार्थ त्यांच्या झोपड्यावर गेलो तर ते काम करणं तर सोडा पण उभे रहाण्याच्या अवस्थेतही नव्हते. थोडेसे नाराज होऊन परत आलो.
चंदू नावाचा डंपर ड्रायव्हर तसा आमचा मित्रच होता त्याला म्हणालो,चंदू,तू निघ… तू दुसरी मातीची ट्रीप आणेपर्यंत आमची हवारी  झालेली असेल. चंदूने त्याच्या एकशे नव्याण्णवचा गेअर टाकला आणि सुसाट निघाला,इकडे आम्ही दोघांनीही शर्ट उतरवले, हातात फावडी घेऊन मातीची हवारी सुरु केली. एक ट्रीप . दुसरी ट्रीप…पुढच्या अनेक ट्रीपा. मध्येच केव्हातरी चंदुला दया आली, त्याने आमच्यासाठी दोन बीअर आणि स्वतःसाठी एक कि दोन चपट्या आणल्या (तेव्हा कधीतरी बीअर चालायची). पहिल्या कामाचे सेलेब्रेशन तिथेच पार पडले. रात्र पुढे सरकत होती तसा आमचा माती भरावही पुढे सरकत होता. त्या रात्री उण्यापुऱ्या दोन तीन तासांचीच  झोप मिळाली,पण तरीही जागरण झालेले न जाणवण्या इतपत ती गाढ होती. सकाळी उठून रात्री आपण केलेले काम पाहण्याचा त्यावेळचा जो आनंद होता तो मलातरी शब्दबद्ध करता येणे शक्य नाही. पुढच्या काळात असेच कधीतरी भरदुपारी तापलेले पाईप गाडीतून उतरणे,बांधकामावर स्वतः पाणी मारणे अश्या अनेक गोष्टींची मजा घेत घेत इथपर्यंत पोहोचलो ते श्रमप्रतिष्ठेनेच……

Tuesday, October 22, 2013

"आम्ही जातो अमुच्या गावा" ….

                                                          "आम्ही जातो अमुच्या गावा" …. 
प्रिय लोकहो, 
पंधरा दिवसाचा पाहुणचार फार आवडला. वार्षिक सेवा चाकरी नेहमीप्रमाणेच उत्तम. एखाद्याच्या घरी चुकून (अपचनाच्या त्रासामुळे) आमच्या बांधवांकडून पिंड शिवला गेला नसेल तर सांभाळून घ्या. बाकी पूर्वजांचा कोप वैगरे म्हणाल तर तसं काही नसतं, काळजी नसावी.पण अगदीच प्रायश्चित्त घ्यायचे असेल तर पुढे वर्षभर उपाशी पोटी असलेल्या कोणालाही जेऊ खाऊ घाला. धन्यवाद ! पुन्हा भेटू … 
आपला 
काक प्रतिनिधी 

Monday, October 21, 2013

"स्वप्न"….

"स्वप्न"…. 
कालच्या उन्नावच्या घटनेने 
बदलला आमचाही परिपाठ… 
आता झोपायची ठरलीय वेळ,
रात्री आठ ते सकाळी आठ…

19/10/2013

"तारीफ पे तारीफ"…

"तारीफ पे तारीफ"…

मिळत नाही जोपर्यंत "खंडपीठाची" ग्वाही….
तोपर्यंत अंगात आमच्या "काळा कोट"नाही….
आता एकदा सर्वांनी, सरसावली बाही….
त्यावर पुन्हा फिरून,अजिबात माघार नाही …
पर्याय "सर्किट बेंच"चा,मान्य होता तोही…
कोर्टाकडून अजून,त्यालाही अनुकुलता नाही…
"एकी"शिवाय कधीही,आवाज घुमत नाही…
विचार होईल "मागणी"चा,यात दुमत नाही…

("कोल्हापूर खंडपीठ" मागणीसाठी वकिलांनी पुकारलेल्या संपाला पन्नास दिवस पूर्ण झालेत. पक्षकारांचेच जास्त हित असणाऱ्या या मागणीसाठी सुमारे १५००० वकीलांनी दाखवलेली एकजुट नक्कीच दाद देण्याजोगी आहे.)

18/10/2013

"मी माझा" ...... ..

"मी माझा" ...... ...
साल १९९५.... चंद्रशेखर गोखले सरांचं "मी माझा" हाती पडलं.....
अधाश्यासारखं पुन्हा पुन्हा वाचलं,त्यामुळे संभाषणात चारोळ्यांचा वापर सर्रास होऊ लागला. 
दरम्यान आमचा 'प्रेम अध्याय" पण चालू झाला होता ...
मग काय ...प्रत्येक "प्रेमपत्रात" प्रसंगानुरूप किमान २/३ चारोळ्या असायच्याच..
आताची बायको अन त्यावेळची प्रेयसी भलतीच खुश त्या चारोळ्यांवर ...… 
मात्र लग्न होईपर्यंत तिनेही कधी विचारलं नाही आणि मीही स्वतःहून कधी सांगितलं नाही की "चारोळ्या" सरांच्या आहेत असं....
लग्नानंतर कधीतरी बिंग फुटलं…. ..
पण तोपर्यंत "मी माझा" न राहता "मी तिचा" झालो होतो...

Tuesday, October 15, 2013

मान्सून म्याडनेस ......


" मान्सून म्याडनेस "  ......
हल्ली बऱ्याच शाळांमध्ये "मान्सून म्याडनेस डे" खास साजरा करतात, 
उद्या माझ्या मुलीच्या शाळेतही आहे,आज तिची जोरात तयारी चालू होती.
त्यावरून आमचा त्या काळचा खराखुरा "म्याडनेस"आठवला ...
त्याला खास दिवस नव्हता.....खास अशी व...ेळ नव्हती...
संधी मिळाली कि पावसाचा,चिखलाचा,झाडा-झुडूपांचा,गुरा-ढोरांच्या वासाचा आणि सहवासाचा यथेच्छ आनंद घ्यायचा........ 
एकमेकाच्या मुळातच ठिगळ लावलेल्या छत्र्या आणि मोडायच्या ...त्याकाळची एकमेकाची ब्र्यान्डेड दप्तरे पुस्तकांसाहित भिजवायची..... 
मग घरी आल्यावर काहीतरी निमित्ताने शेताकडे मोर्चा वळवायचा ......हट्टाने जोत (औत) धरायचे......खोऱ्याने वावरायचे.....तरव्याच्या पेन्ड्यांशी अंगाला खाज येइस्तोवर खेळायचे..... 
पावसात भिजायचे....चिखलात लोळायचे ....मोठ्या सरीला आईच्या "ईरल्यात" किवा बाबांच्या "कांबळ्यात"(घोंगडी) शिरायचे.......
किमान चड्ड्या असल्या तरी बिनधास्त भिजवायाच्या......न्हाणीघरातल्या "उतवावर"(घोंगडी वाळवन्या साठीचे साधन) सुकवायच्या.....त्याचा धुरकट वास घेत .........
पुन्हा दुसऱ्या दिवशीच्या "म्याडनेस" ला तयार................!

ENGINEERS DAY 2013

"अमंत्रं अक्षरं नास्ति……
नास्ति मूलं अनौषधीम
अयोग्य: पुरुषो नास्ति …
योजकस्तत्र दुर्लभ॥" …
(ही संस्था अभियांत्रिकी योजक घडविते.)

हे सुभाषित आमच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात दर्शनी भागावर "फ्रेम" होतं.अर्थात त्याकाळी खरोखरच अभियांत्रिकी योजकांची दुर्लभता होती. पण काळ बदलला आणि महाराष्ट्रात अभियांत्रिकी कॉलेजेसच्या अतिरेकाने "अभियंता"नावाचं वारेमाप पिक आलं,आणि "उत्पादन जास्त -दर कमी" हे व्यावहारिक सूत्र इथेही लागू पडलं,परिणामी अभियंत्यांचा "भाव" बराच गडगडला.याचाच परिणाम असा झाला की,अलीकडच्या २/३ वर्षात तर राज्यात अभियांत्रिकीच्या किमान २०/२५ टक्के जागा या शिल्लक राहू लागल्यात. आपला पाल्य अभियंता म्हणून पाहण्याचं पालकांचं स्वप्न काही गैर नाही परंतु विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता आणि शिक्षण देणाऱ्या कॉलेजचा दर्जा यामुळे अलीकडच्या काळात शिकून बाहेर पडलेल्या अभियंता मित्रांमध्ये सुभाषिताला अपेक्षित असा "योजक" अभावानेच आढळतो.मित्रानो,ही बाब खेदाची असली तरी त्रिवार सत्य आहे.
आपण सर विश्वेश्र्वरैय्या यांच्या स्मृतींना वंदन करून दरवर्षी त्यांच्या जन्मदिनी "अभियंता दिन"साजरा करत असतो.त्यामुळे त्यांच्या ख्यातीला,त्यांच्या लौकिकाला साजेसं काम आपल्या हातून करण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रत्येक अभियंत्याने करायला हवा,तरच सरांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिल्यासारखी होईल. अन्यथा इतर जयंत्या- पुण्यतीथ्या सारखे यातलेही गांभीर्य निघून जाईल.
माझ्या सर्व अभियंता मित्रांना "अभियंता दिनाच्या" खास शुभेच्छा …!
 —

"खरा तो एकचि धर्म… जगाला प्रेम अर्पावे"

"खरा तो एकचि धर्म… जगाला प्रेम अर्पावे"
निसर्गचक्रानुसार "दिवस" येतात-जातात. त्यातले काही आनंदाचे तर काही दुःखाचे असतात. काही दिवस तर आयुष्यात नुसते यायचे म्हणून येउन जातात, पण एखाद-दुसरा दिवस मात्र आपल्याला खूप काही देऊन जातो.माझ्या दृष्टीने कालचा "गांधी जयंती"चा दिवस अगदी तसाच होता. 
निमित्त होते जीवन आधार संस्थेच्या "संविता आश्रम" या नवीन उपक्रमाचे उद्घाटन.…आमचे मित्र संदीप परब प्रमुख असलेल्याया संस्थेने तीन वर्षापूर्वी अणाव,ता. कुडाळ,सिंधुदुर्ग येथे "आनंद आश्रम" हा निराधार वृद्धांसाठीचा आश्रम सुरु केला असून तिथे सुमारे तीस निराधार वृद्ध सेवा घेत आहेत. त्यानंतर रस्त्यावर निराधार बनून फिरणाऱ्या मनोरुग्णांसाठी हा "संविता आश्रम" सुरु होत आहे.
या निमित्ताने इथे उपस्थित असणारी सर्वच मंडळी ही "समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ते कोणत्यातरी रुपात परत केले पाहिजे" अश्या प्रकारची भावना मनात असणारी होती.आणि एकाच सभामंडपात एवढ्या मोठ्या संख्येने जमलेली अशी मंडळी पाहून उपस्थित प्रत्येकालाच सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने फार आशावादी व्हायला झाले.
यात ज्यांचा तरुण मुलगा देशासाठी शहीद झाला ते केरबा माने,सैनिकांच्या आणि पोलिसांच्या टोपीमध्ये आपल्या वडिलांचा चेहरा शोधणारी कुंडलिकची छोटी करिष्मा, शहीद मनीष कदम यांचे विरपिता. जेष्ठ नागरीकांसाठी काम करणाऱ्या फेसकॉमचे पदाधिकारी,सामाजिक कार्यात सढळहस्त असणारे रणजीत देसाई,पत्रकारितेच्या माध्यमातून दात्यांना वंचीतांपर्यंत पोहचवणारे शेखर सामंत,आश्रमाला वैदकीय सुविधा देणारे डॉ. विद्याधर तायशेटे,डॉ.कौत्सुभ लेले,या कामाला पोलिसी सहकार्य देणारे पोलिस निरीक्षक पवार,आश्रमाला विनामूल्य जागा देणारे चोपडेकर, सावंत, परब,तसेच जिल्ह्यातले अनेक इंजिनिअर,डॉक्टर,वकील,सामाजिक कार्यकर्ते,सामान्य नागरिक,विद्यार्थी आणि सर्वात महत्वाची मंडळी म्हणजे संदीप परब यांना साथ देणारी त्याची संपूर्ण टीम याप्रसंगी उपस्थित होती. सर्वांच्याच मनात समाजाप्रती काही ना काही काम करण्यासाठीची भावना दिसून येत होती,व्यक्त होत होती.आणि जर ही चळवळ अशीच सुसाट वेगाने चालत राहिली तर साने गुरुजींच्या "खरा तो एकचि धर्म… जगाला प्रेम अर्पावे" प्रार्थनेतला शब्द न शब्द आचरणात आल्याशिवाय राहणार नाही.अशी अशा ठेवायला हरकत नाही.

"आपट्याचे" पान….

रडून रडून दमले बिचारे,
एक "आपट्याचे" पान….
म्हणे,एका दिवसापुरताच का ?
आम्हांला "सोन्याचा" मान … 
झाडावरच हसत खेळत,
आमचे चालले होते छान…
लुटण्याच्या नादात तुम्ही,
अख्खं झाडच केलं निष्प्राण….

रांगता रांगता .....

रांगता रांगता कधी "रांगेत" आलो ते कळलंच नाही.
पालकांच्या आग्रहात्सव बालवाडी प्रवेशाची रांग, 
शिक्षकांच्या भीतीने लावलेली शाळेतली रांग,
मग"तिच्या"साठीची कॉलेजातली रांग,
फायली सांभाळत नोकरीसाठी रांग… 

पुढे संसारासाठीची रेशनची रांग,
याचक बनून उभे राहिलो ती देवासमोरची रांग,
मनात नसतानाही उभी राहतो ती मतदानाची रांग,
इतकंच काय पण शहरात मेलो तर चितेसाठीही रांग…. 
सवयच झाली रांगेची …रांग … रांग … आणि नुसती रांग 
घटका,दोन घटका मौजमस्ती साठी आलोय…. 
पण रांग मोडून "पोझ" देण्याचं धारिष्ट्यसुद्धा गमावलय …
बुधवारच्या सकाळी घरचा टेलिफोन वाजला की हल्ली माझी धड धड वाढायला सुरवात होते. तसा तो आजही वाजलाच… दोन खोल्यांच्या पलीकडे स्वयंपाक घरात काम करणाऱ्या आमच्या सौभाग्यवतीचे कान अर्थातच "या"फोनच्या रिंगकडेच असावेत,परिणामी काही सेकंदातच रिंगचा तो कर्कश आवाज दोन व्यक्तींच्या संभाषणात परावर्तीत झाला.आता इथे घडणाऱ्या  संभाषणाचा संबंध थेट माझ्या आठवडाभराच्या रोजनिशीवर पडणार असल्याने माझे अस्वस्थ होणे क्रमप्राप्त होते.तब्बल अर्ध्या तासाने हे संभाषण "घरात खूप कामं पडलीत" या नोटवर संपलं.सौंच्या चेहऱ्यावर आजतरी कुठल्याही चिंतेची "गस्त" नव्हती. त्यामुळे पुढचा आठवडा विनावाद जाईल अशी शक्यता निर्माण झाली.  
नेमकं काय घडतं दर बुधवारी?….  
ज्योतिषशास्त्राच्या अतिरेकी नादाला लागलेली एक महिला दुर्दैवाने आमच्या सौंची जिवलग मैत्रीण आहे. ही बया दर बुधवारी सकाळी तरुण भारतची "खजाना" पुरवणी उघडते. त्यातले "ग्रह तुमचे अंदाज आमचा" हे सदर वाचते,नुसते वाचतच नाही तर बहुदा मुखोद्गत करते आणि त्यात लिहिल्याप्रमाणे आचरण ठेवणे किती मस्ट आहे, याची घरोघरी पारायणे करते. त्या "घरोघरी" आमचे घर क्रमांक एकवर आहे,याचा वेगळा उल्लेख करणे गरजेचे नसावे.
अर्थात या सदरातून बरीच धार्मिक माहिती शास्त्रोक्त स्वरुपात मिळत असल्याने आमचा कोणाचाच त्याला आक्षेप नाही, आक्षेप आहे तो त्याचा अतिरेक करण्याचा,परंतु त्यामध्ये सुचवल्याप्रमाणे विविध मंदिरांना(तेही अगदी नियोजित मुहूर्तावर) द्यायच्या भेटीगाठी,व्रतवैकल्ये,उपासतपास यासह खाण्या-पिण्यावरची बंधने आणि एकूणच त्याचा केला जाणारा गाजावाजा यामुळे आमची तर त्या आठवड्याची रोजनिशीच बहुतेक वेळा बदलून जाते.वर पुढचा बुधवार काय घेऊन येईल ते टेन्शन वेगळेच.   
खरंतर वर्तमानपत्रातील राशीभविष्य वाचणे हा बहुतेक जणांचा असतो तसा माझाही छंद आहे. पण तो वाचण्यापुरताच मर्यादित आहे. कारण दिवसभरात पावलोपावली ठेचाळणाऱ्या आमच्या सारख्या सामान्य माणसाला हे दोन ओळीतले आणि चार वाक्यांचे दिनमान कुठे म्हणून सावरणार ?…
पण अगदीच  मजेने घ्यायचं म्हटलं तर याचा उपयोग सुद्धा करता येतो. समजा घरच्या मंडळींचा बाहेर जाण्याचा "मूड"असेल आणि राशीत "दुर्घटना व अपघाताची शक्यता" असे काहीतरी असेल तर ते वर्तमानपत्र "पुढे" करून आपल्याला बिनधास्त "मागे" सरता येते.त्यातूनही हे ग्रह सुद्धा कोणाच्या राशीत कधी कसे येतील याचा नेम नाही तसंच ते एकटे आले तर ठीक पण बऱ्याचदा "युती"करूनच येतात. आणि चुकून एखाद्याला भाग्योदय तर बऱ्याच जणांना शत्रुपिडा देऊनच येतात.  (काही पक्षांच्या नेत्यांच्या राशीत मात्र या ग्रह"युती"वर गेली पंधरा वर्षे "आघाडी"मात करतेय हा भाग वेगळा )
दुसरं असं की,कधीतरी स्टेपनी नसलेली गाडी घेऊन आपण एकटे बाहेर जातो खिळा लागून गाडी पंक्चर होते आणि "अकारण मनस्ताप होईल" हे भाकीत तंतोतंत खरे करून देते. दुसऱ्या दिवशी मात्र "आज आवक बरी राहील" यात नक्कीची प्रिंटींग मिस्टेक होऊन "जा" चा "आ" झाल्याचा प्रत्यय येतो. राशीभविष्यातून आरोग्यासंबंधी नेहमी "नेत्र विकार संभवतात"किवां "सर्दीची पडशाची"वर्दी मिळते.रक्तदाब,मधुमेह अश्या प्रकारचे डीटेलिंग नसतंच परिणामी स्टोअर रूम मधली एखादी शिंक सुद्धा अचूक भाविष्यावणीचा दुजोरा देऊन जाते. "संततीकडून चांगली बातमी" (अर्थात निकालाची)कळायला ती हुशार तर असावीच लागतील. एखादा योग "वास्तुकर्ज कमी"करणारा असेल तर बहुदा तो त्या महिन्याचा ई एम आय  गेल्यानंतरचाच असू शकतो."सामाजिक क्षेत्रात नावलौकिक" व "लिखाणाला प्रसिद्धी"हे हल्ली खंर होतंय ते फेसबुकवर स्वतःच टाकलेल्या पोस्टमुळे. सरते शेवटी "कष्टाने जे कमवाल त्याने सुख समाधान येईल" हे वाक्य मात्र प्रत्येकाच्या राशीत एकदम फिट बसते. त्यामुळे राशिभविष्य हे वाचण्यापुरते मर्यादित ठेवावे जगण्यासाठी नाही. 

Sunday, October 6, 2013

"गावपण"

"गावपण" इसरान आमी, घातलव विकासाचो घाट ...
पायार धोंडो मारून सोताच्या,लावलव सगळी वाट ...

डायनिंग टेबला इली घरात, रव्हले पुजेपुरते पाट ....
सोरकुल,मडके वांगडा संपलो,उभ्या पंगतींचो थाट ....

ग्यासची गाडी गावात इल्यार,धरली चुलीनी वाट ...
मसनीत कपडे धुतल्यापासून, दुखना नाय पाट....

बजेटमधे बसले फ्रीज,आणि फुटान गेले माट .... 
एसी पंखे दिसले थयसुन,मेल्या वाऱ्याकच लागली नाट.... 

बाईर पंप जोडल्यापासून,शाप गंजान गेलो राट .....
कसलो सडो आणि कसली रांगोळी,उठाकच वाजतत आट.... 

पाटो वरवंटो मागरात पडलोहा,मिक्सरा बा तूच कायता वाट.... 
घिरटी जाती गेली काळाआड,आता गिरणी सतराशे साट ....

व्हायन-मुसाळ लग्नापुरता,ताव भाड्यान देता भट .....
हातात आमच्या कायच रव्हाक नाय,पण तेकाच म्हनतव "वट"  ....

कधी टीवी,कधी मोबाइल,पोरा घेवन बसतत नेट....
वर्षान कधीतरी होता त्येंची,झालीतर रानावनाशी भेट...  

"गावपण"इसरान आमी, घातलव विकासाचो घाट .....
पायार धोंडो मारून सोताच्या,लावलव सगळी वाट ....

(प्रभाकर सावंत)
  ०७/१०/२०१३ 

Tuesday, October 1, 2013

" गरज जेष्ठ नागरिकांच्या सन्मानाची"……

" गरज जेष्ठ नागरिकांच्या सन्मानाची"…… 
कुठल्यातरी प्रांतात तिथल्या प्रथेनुसार लग्नासाठी वराकडची मंडळी वधूच्या गावी जात.वधूच्या गावाच्या सीमेवर त्यांचे भव्य स्वागत होत असे. त्या नंतर वधुकडची मंडळी वराला जवळजवळ आपल्या ताब्यातच घेत असत आणि सोबत आलेल्या वऱ्हाडी मंडळीना वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून हैराण करून सोडत. अश्याच एका लग्नासाठी "वर" निघाला असता त्याच्यासोबत वऱ्हाडी म्हणून फक्त तरुण मंडळीनी जायचे ठरवले. वयस्कर माणसे आपल्याला मनाप्रमाणे मौजमस्ती करू देत नसल्याने त्यांनी सगळ्याच जेष्ठ मंडळीना निरनिराळी कारणे सांगून न येण्याची विनंती केली. जाणत्या माणसाना नक्की माहित होते की,वधूकडची मंडळी ह्या तरुण मंडळीना सळो की पळो करून सोडतील आणि या लग्न सोहळयात विनाकारण वाद होतील.पण त्यांचा नाविलाज होता. 
वरासहित सगळी युवा फौज समानसुमान बांधून जायला निघाली. सोबत कुणीही जाणती माणसे नसल्याने अर्थातच सर्वांची मजामस्ती जोशात सुरु होती. इकडे गावाच्या सीमेवर वधूकडील मंडळीनी त्यांच्या जोरदार स्वागताची तयारी केली होती. सर्वच पाहुणेमंडळी तरुणतुर्क दिसल्याने वधूकडील मंडळींचा त्यांची गंमत करण्याचा हुरूप आणखीनच दुणावला. झालं,वराकडील मंडळीवर स्वागतालाच पहिला बॉम्ब पडला.
"तुमची एकूण पन्नास मंडळी आहेत आणि तुमच्यासाठी हे खास पन्नास बकरे आहेत. या सर्वांचं मटण करून खायचं आणि मगच सीमेच्या आत यायचं"........."काही लागलं सवरलं तर आम्ही आहोतच सेवेला"
या एकाच अटीवर तरुण मंडळी बरीच चक्रावून गेली. प्रत्येकाने खूप विचार करून पाहीला पण प्रत्येकी एक बकरा खायचा म्हणजे कसं शक्य आहे.असली कसली विचित्र अट.हे अशक्य आहे वैगरे वैगरे सुरु झालं. समोरचा वधूपक्ष मात्र आपल्या भूमिकेवर ठाम होता.बराच वेळ गेला, तोडगा तर निघाला नाहीच, उलट भांडणाला सुरवात झाली. वाद विकोपाला गेले आणि वराकडील मंडळी वरासहीत परतीला लागली.
तेवढ्यात एक साठीपार व्यक्ती पुढे आली जी वराकडील होती आणि गुपचूप सामानाच्या पेटाऱ्यातून लपून आली होती. त्यांनी वधूपक्षाचा पन्नास बकऱ्याचे जेवण जेवण्याचा प्रस्ताव मान्य केला. ती व्यक्ती म्हणाली
"आमची पन्नास मंडळी आहेत,आम्हाला पन्नास बकरे द्या,आम्ही रोज एक बकरा कापून सर्वांसाठी जेवण करू. पन्नास संपले कि सीमेच्या आत प्रवेश करू,तोपर्यंत बसा आमच्या सेवेसाठी काही लागलं सवरलं बघायला या इथेच"
वधुकडच्या मंडळीना हा तोडगा पुरता तोंडघशी पाडणारा होता त्यामुळे अर्थातच तिढा सुटला,लग्न झाले. आणि जुन्या-जाणत्या,अनुभवी माणसांची समाजरचनेत खूप गरज असते हे ही अधोरेखित झाले.
आज ही कधीतरी आजीकडून ऐकलेली गोष्ट आठवण्याचे कारण म्हणजे आजचा "जेष्ठ नागरिक दिन".
मित्रहो आपल्याला अश्या बऱ्याच बाबीत या अनुभव संपन्न जुन्याजाणत्यांची फार गरज आहे.आजच्या लहान मुलांना त्यांच्या संस्काराची गरज आहे,त्यांच्या आशीर्वादाची गरज आहे, त्यामुळे त्यांचा यथोचित आदर सन्मान होणे हि काळाची गरज आहे. चला तर मग स्वतःच्या घरापासूनच सुरवात करूया जेष्ठांना सुखी-आनंदी ठेवण्याची,त्यांची काळजी घेण्याची …….