Friday, June 27, 2014

"गड्या अपुला गाव बरा"……

"गड्या अपुला गाव बरा"…… 
परवा मुंबईत गेलो होतो तेव्हा एक मित्र म्हणाला "प्रभाकर,तू पुण्या मुंबईत असतास तर यापेक्षा डेव्हलप झाला असतास" त्याच्या लेखी असणाऱ्या त्या "डेव्हलपमेंट"च्या व्याखेने मनातल्या मनात हसू आलं आणि बावीस वर्षापुवीचा निर्णय आठवला… जो माझ्यादृष्टीने बरोबर होता आणि अजूनही आहे… 
माझे माध्यमिक आणि अभियांत्रिकी शिक्षण तसे शहरात पूर्ण झाले. पुढे शहरातच नोकरीची संधी मिळाली,पण मन रमले नाही. सल्ला घ्यावा असं समोर कुणीही नव्हतं,मग मागचा पुढचा काहीही विचार न करता थेट गावाकडे आलो.स्वत:चा व्यवसाय सुरु केला,सुदैवाने फार मोठा नाही पण सगळ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडतील अश्या बेताने व्यवसाय सुद्धा बहरला.
जेव्हा कधी व्यावसायिक अडचणी आल्या तेव्हा मात्र शहरात स्थायीक असलेल्या मित्रांचा हेवा वाटू लागायचा आणि आपण शहरात असतो तर असं झालं असतं वैगरे वैगरे कल्पना मनात घर करायच्या,पण त्या तेवढ्यापुरत्याच,त्यांनी कधी फारसं अस्वस्थ होण्याची वेळ आली नाही.
इथे व्यवसायाला अडचणी आणि मर्यादा होत्याच पण काम करण्यासाठी इतर आवडती क्षेत्र मात्र खूप होती ज्यांच्यावर शहरात कदाचित मर्यादा पडल्या असत्या. धार्मिक,सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय,साहित्यिक अश्या अनेक क्षेत्रात इथे खूप संधी मिळाल्या. आणि खऱ्या अर्थाने आनंदात जगता आले.
परंपरेने चालत आलेल्या शेती व्यवसायाचा वारसा आई बाबांमुळे पुढे चालू आहेच,शेतातले घर,गुरढोरांचा गोठा,अंगण,परसदार याबरोबरच स्वतःच्या शेतात पिकवलेला तांदूळ, कडधान्ये,ताज्याताज्या भाज्या,दुधदुभतं आणि थोडीफार आंबा,काजू आणि नारळाची बागायती या सर्व गोष्टी मनापासून एन्जॉय करता आल्या त्या केवळ गावात वास्तव्य केल्यामुळेच. यामुळे शहरात राहून काय उजेड पाडला असता याला काहीच अर्थ उरत नाही.
सोयीसुविधांच्या बाबतीत सुद्धा खेडी आता मागे राहिली नाहीत,आता बाजारातली प्रत्येक गोष्ट जीवनावश्यक झाली आहे आणि ती छोट्या छोट्या खेड्यातही उपलब्ध होत आहे त्यामुळे गैरसोयीचा प्रश्नही निकाली निघतो.
म्हणूनच आजच्या माझ्या तरुण मित्रांना आवर्जून सांगावेसे वाटते की शक्यतो शहराचा आग्रह सोडा आणि इथे संधी निर्माण करा.त्यासाठी जाणीवपूर्वक अभ्यासक्रम निवडा. आर्थिक स्तर आणि राहणीमानात थोडेसे उन्नीस बीस होईल पण इथे जगण्याचा आनंद मात्र शंभर टक्के मिळेल….
आम्ही वीस बावीस वर्षापूर्वी निर्णय घेतला तो चुकल्याचे अजिबात वाटत नाही…… तेव्हा तुम्हीही ……

1 comment: