Friday, June 27, 2014

कबीर

मनुष्य बलवान नाही होत,समय होत बलवान… 
भिल्लन लुटी गोपिका सारी,वही अर्जुन वही बाण…! संत कबीर 

आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचा काहीसा अपेक्षित आणि बराचसा अनपेक्षित निकाल जाहीर झाला आणि कबिरांचा हा दोहा मला आठवला,जो मी वपुंच्या साहित्यात वाचला होता. आधी हा दोहा स्पष्ट करतो मग आपण याचा आणि निकालाचा संबंध पाहू.
अर्जुन आणि कृष्णाचं नातं आपणा सर्वांनाच ज्ञात आहे.कृष्ण अर्जुनाचा सारथी,सखा, मार्गदर्शक असा सर्वकाही होता.महाभारतानंतरच्या काळात बरेच दिवस कृष्ण-अर्जुन भेट झाली नव्हती.दरम्यानच्या काळात कृष्णाच्या अंगावर जखम होऊन तो आजारी असल्याचे अर्जुनाला समजते त्यामुळे तो कृष्णभेटी साठी निघायचे ठरवतो. इकडे अर्जुन भेटीला निघतो आणि वाटेत त्याला नारदमुनींची भेट होते.नारदमुनिना पुढे काय होणार याचा अंदाज असल्याने ते अर्जुनाला कृष्णभेटीला न जाण्याचा सल्ला देतात पण त्या मागील कारण सांगत नाहीत.
आपला मित्र त्रासात असताना त्याची भेट टाळणे अर्जुनाला कृतघ्नपणाचे वाटते. तो नारदमुनींकडे भेटीचा हट्ट धरतो.मधला मार्ग म्हणून दोघांनीही एकमेकांना आलिंगन न देता,अजिबात स्पर्श न करता भेटण्याचा सल्ला नारदमुनी अर्जुनाला देतात. अर्जुन पुढे रवाना होतो.
दोन्ही मित्रांची दृष्टीभेट होताच कृष्ण,अर्जुनाला आलिंगन द्यायला बाहू पसरतो.अर्जुन थातुरमातुर वचनाची करणे देऊन अलिंगनच नव्हे तर त्याचा स्पर्श सुद्धा टाळतो. अर्थात हे सर्व पूर्वनियोजित असल्याने कृष्णाला माहीतच असते.
"अर्जुना, इतक्या दूरवरून आलास आणि आपण हस्तांदोलनही करू शकत नाही याचे दु:ख वाटते तेव्हा तुझ्या भातातल्या बाणाने किमान माझ्या जखमेला स्पर्श तरी कर" असे आर्जव कृष्ण करतो, आणि मित्राप्रेमात अर्जुन तशी कृती करतो…त्याच्या बाणाचा जखमेला स्पर्श होतो.
कृष्णाने दृष्टांकडून काही गोपिकांची सुटका केलेली असते आणि त्या सर्वजणींना जाताजाता त्यांच्या घरी पोहोचवण्याची जबाबदारी कृष्ण अर्जुनावर सोपवतो.अर्जुन गोपिकांसह रथातून जायला निघतो.वाटेत एका अरण्यात भिल्ल त्यांच्या रथावर हल्ला करतात आणि गोपिकांना पळवून नेण्याचा प्रयत्न करतात.अर्जुन त्यांच्याशी युद्ध सुरु करतो. अर्जुन आपल्या धनुष्यातून बाण सोडतो,पण प्रत्येक वेळी त्याने सोडलेली अस्त्रे निकामी होऊन परत येतात,या प्रकाराने अर्जुन चक्रावतो. पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो पण भिल्ल वरचढ ठरतात आणि गोपिका पळवून नेतात.
म्हणजे महाभारतातला तोच महायोद्धा अर्जुन त्याचा तोच बाण भिल्लांपासून गोपिकांच रक्षण करू शकत नाही……
कारण एकच मनुष्य ताकदवान नसतो तर वेळ खरी ताकदवान असते……
या कथेप्रमाणेच राणे साहेबांनी आपल्या "नारायण अस्त्राने"आजवर अनेक निवडणुका एकतर्फी खिशात घातल्या.कोकणचा आवाज राज्याच्या इतर भागात पोहोचेल इतका कणखर केला. सरकारला अनेकदा निधीसाठी वेठीस धरले. कोकणात खऱ्या अर्थाने विकासाची गंगोत्री आणण्यास पुढाकार घेतला. लोकांनी सुद्धा गेली वीस पंचवीस वर्षे त्यांच्यावर खूप प्रेम केले. पण गेल्या काही वर्षात बऱ्याच गोष्टी लोकांना विश्वासात न घेता एकतर्फी वाटाव्यात अश्या घडत गेल्या. पक्ष वाढला,विजय मिळत गेला,कार्यकर्त्यांना सन्मानाची पदे मिळत गेली,कार्यकर्ते सधन झाले,आणि खोट्या प्रतिष्ठेत वावरू लागले जनतेशी असलेली त्यांची नाळ तुटायला सुरवात झाली.खरंतर राणे साहेबांनी ही बाब वेळीच ओळखून आवश्यक ते बदल करायला हवे होते. पण दुर्दैवाने तसे घडले नाही. जनतेच्या भावना अर्जुनाच्या बाणाने कृष्णाच्या जखमेसारख्या दुखावत गेल्या आणि याच दोह्याचा प्रत्यय राणे साहेबांना घ्यावा लागला.
असा अनपेक्षित निकाल येण्यामागे केवळ "मोदींची लाट"एवढंच कारण पुरेसे नाही तर इथल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या कार्यपद्धतीच्या विरोधी लाट हे महत्वाचे कारण आहे असे म्हणायला हरकत नाही
ही संत मंडळी या केवळ दोन दोन ओळीतून फार मोठे दृष्टांत देवून गेली आहेत. गरज आहे ती कार्यकर्ता आणि नेत्यांनी हे लक्षात घ्यायची आणि आचरणात आणायची. "पुढच्यास ठेच मागचा शहाणा"ही म्हण मुखोद्गत करून यापुढील राज्यकर्त्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आचरण करावे ही अपेक्षा, अन्यथा …. "समय बलवान" असणार आहेच. 

No comments:

Post a Comment