Friday, June 27, 2014

"अब की बार …

"अब की बार …… 
........मोदी सरकार"

देशभरातल्या जनमनावर,
आता मोदींची आहे छाप…. 
त्यांचा पाठलाग करताना,
काँग्रेसलाही लागलीय धाप…
नमोंच्या या झंझावातात,
पुरा हरवून गेलाय आप…
नेहमीच्या उपद्रवी पक्षांना,
चांगलाच बसलाय चाप…
चांगल्या संख्याबळाने,
एनडीए ओलांडणार सत्तेचे माप…

बाप्पा मतदाता


आता तरी देवा मला पावशील का?
मत कुणा द्यायचं ते सांगशील का?

काँग्रेस ची राहिली नाही जुनी तळमळ,
भ्रष्टाचारात बुडली त्यांची सारी पिलावळ… 
पुन्हा संधी देऊन चांगले वागतील का?
गरीबाला दोन घास मिळतील का?

दिले निवडून जरी अमुचे मोदी,
बोलतात तसे वागतील कारे पदोपदी…. 
यंदा तरी म्याजिक फिगर गाठतील का?
फिलगुड ज्याला म्हणतात ते दावतील का?

अशा दाखवून आप दूर पळतो
आमआदमी कडून त्याला मार मिळतो….
आता तरी संयमाने वागतील का?
सत्तेत येउन पन्नास दिवस थांबतील का?

"सुट्टी उन्हाळ्याची"……

"सुट्टी उन्हाळ्याची"…… 
उन्हाळी सुट्ट्या सुरु झाल्या की मोठ्या शहरांप्रमाणे आमच्या कोकणातही हल्ली मुलांसाठी वेगवेगळी शिबिरे सुरु होतात. मग आमचे पालकही दहा पंधरा दिवसांच्या त्या शिबिरांमध्ये आपल्या लाडक्यांना "शिबिरार्थी" म्हणून दाखल करतात आणि मुलांप्रती मोठे कर्तव्य पार पाडल्याच्या आनंदात असतात. जी मुले शिबिरांमध्ये जात नाहीत ती फारतर काका मामांकडे जातात कीवा मोबाईल गेम आणि टीव्ही समोर रमतात.(आमचीही मुले याला अपवाद नाहीत) खरंतर कोकणच्या दृष्टीने ही उन्हाळी सुट्टी म्हणजे मुलांना निसर्गाशी मैत्री करण्याची सुसंधी देणारी असते.
काही वर्षांपुर्वीपर्यंत मुले या सुट्टीचा मनमुराद आनंद घेत असत. मात्र दुर्दैवाने आता ती स्थिती राहिली नाही.राहतो त्या वाडीत एखादी दाट झाडी पाहून तिथे स्वतः एखादी झोपडी उभारायची, त्यात दिवसभर वेगवेगळे खेळ खेळायचे,एखाद्याच्या वडीलांची जुनी पुरानी सायकल आणून पाळीपाळीने सगळ्यांनी रपेट मारायची,मध्येच जवळच्या आंब्यावर दगड मारून पिकलेले आंबे पाडायचे.पिकलेल्या आंब्यांसोबत पडलेल्या कच्च्या कैऱ्यांची मस्त "खिरमट"बनवायची.त्यासाठी लागणारे मीठ आणि गुळ घरातून गपचूप आणायचे,प्रसंगी घरातून ओरडून घ्यायचे. संध्याकाळच्या वेळी करवंदीच्या काट्याकुट्यात फिरायचे आणि यथेच्छ करवंद खायची. त्यावेळी पायात घुसलेला काटा दुसऱ्या काट्याने अलगद काढायचा.
मोठ्यांची नजर चुकवून जांभळीच्या झाडावर चढायचे कीवा पडलेली जांभळे गोळा करून मीठ लावून खायची या धावपळीत कपड्याची निळी रंगपंचमी ओघाने यायचीच त्याची मज्जा आणि वेगळीच,अश्याप्रकारेच चारांच्या बिया वेचून आणायच्या त्या फोडून बरणीत भरून पुढची बेगमी करायची,
आंब्या काजूच्या डीन्काने हात खराब करायचे,त्या डीन्काची चेहऱ्यावर,हातापायावर एखादी खुण राहील याची सुद्धा तजवीज या उपद्यापातून करायची,पाणी आटत आलेल्या एखाद्या डबक्यातल्या चिखलातून मित्रांबरोबर मासे पकडायचे आणि पानातून आपला वाटा घेऊन घरी मोठ्या रुबाबात यायचे. असे नानाविध प्रकार त्यावेळी चालत असत आणि मुलांना निसर्गाशी एकरूप होता येत असे.
आता खरोखरच हे सर्व शिकण्यासाठी किवा अनुभवण्यासाठी या प्रकारचे एखादे "शिबीर"आयोजित करावे लागेल की काय अशी शंका येते.


"वाढदिवस"……

"वाढदिवस"…… 
मित्रानो,आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद पोहोचले,त्यासाठी सर्वांना धन्यवाद…!
माझा यावर्षीचा "वाढदिवस" फारच अविस्मरणीय म्हणावा असा साजरा झाला. मे महिन्यातला वाढदिवस असल्याने शाळा कॉलेजात कधी साजरा करता आला नव्हता,पण योगायोगाने यावर्षी आदल्याच दिवशी आमच्या दहावी ब्याचचे मुंबईत गेट टुगेदर होते त्याठिकाणी वर्गमित्रांनी धूमधडाक्यात वाढदिवस सेलेब्रेट केला.त्याचप्रमाणे गावात सुद्धा मित्रमंडळीनी सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत "केक"कापण्याचा कार्यक्रम पार पाडला आणि हृद्दय सत्कार केला.या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी खूप मोठं 'सरप्राईज' अश्या होत्या सोबत आपणा सर्वांच्या शुभेच्छा….
बेचाळीसाव्या वर्षातले पदार्पण अश्या तऱ्हेने खूप सुखावह झाले…….
धन्यवाद ….!



"गड्या अपुला गाव बरा"……

"गड्या अपुला गाव बरा"…… 
परवा मुंबईत गेलो होतो तेव्हा एक मित्र म्हणाला "प्रभाकर,तू पुण्या मुंबईत असतास तर यापेक्षा डेव्हलप झाला असतास" त्याच्या लेखी असणाऱ्या त्या "डेव्हलपमेंट"च्या व्याखेने मनातल्या मनात हसू आलं आणि बावीस वर्षापुवीचा निर्णय आठवला… जो माझ्यादृष्टीने बरोबर होता आणि अजूनही आहे… 
माझे माध्यमिक आणि अभियांत्रिकी शिक्षण तसे शहरात पूर्ण झाले. पुढे शहरातच नोकरीची संधी मिळाली,पण मन रमले नाही. सल्ला घ्यावा असं समोर कुणीही नव्हतं,मग मागचा पुढचा काहीही विचार न करता थेट गावाकडे आलो.स्वत:चा व्यवसाय सुरु केला,सुदैवाने फार मोठा नाही पण सगळ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडतील अश्या बेताने व्यवसाय सुद्धा बहरला.
जेव्हा कधी व्यावसायिक अडचणी आल्या तेव्हा मात्र शहरात स्थायीक असलेल्या मित्रांचा हेवा वाटू लागायचा आणि आपण शहरात असतो तर असं झालं असतं वैगरे वैगरे कल्पना मनात घर करायच्या,पण त्या तेवढ्यापुरत्याच,त्यांनी कधी फारसं अस्वस्थ होण्याची वेळ आली नाही.
इथे व्यवसायाला अडचणी आणि मर्यादा होत्याच पण काम करण्यासाठी इतर आवडती क्षेत्र मात्र खूप होती ज्यांच्यावर शहरात कदाचित मर्यादा पडल्या असत्या. धार्मिक,सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय,साहित्यिक अश्या अनेक क्षेत्रात इथे खूप संधी मिळाल्या. आणि खऱ्या अर्थाने आनंदात जगता आले.
परंपरेने चालत आलेल्या शेती व्यवसायाचा वारसा आई बाबांमुळे पुढे चालू आहेच,शेतातले घर,गुरढोरांचा गोठा,अंगण,परसदार याबरोबरच स्वतःच्या शेतात पिकवलेला तांदूळ, कडधान्ये,ताज्याताज्या भाज्या,दुधदुभतं आणि थोडीफार आंबा,काजू आणि नारळाची बागायती या सर्व गोष्टी मनापासून एन्जॉय करता आल्या त्या केवळ गावात वास्तव्य केल्यामुळेच. यामुळे शहरात राहून काय उजेड पाडला असता याला काहीच अर्थ उरत नाही.
सोयीसुविधांच्या बाबतीत सुद्धा खेडी आता मागे राहिली नाहीत,आता बाजारातली प्रत्येक गोष्ट जीवनावश्यक झाली आहे आणि ती छोट्या छोट्या खेड्यातही उपलब्ध होत आहे त्यामुळे गैरसोयीचा प्रश्नही निकाली निघतो.
म्हणूनच आजच्या माझ्या तरुण मित्रांना आवर्जून सांगावेसे वाटते की शक्यतो शहराचा आग्रह सोडा आणि इथे संधी निर्माण करा.त्यासाठी जाणीवपूर्वक अभ्यासक्रम निवडा. आर्थिक स्तर आणि राहणीमानात थोडेसे उन्नीस बीस होईल पण इथे जगण्याचा आनंद मात्र शंभर टक्के मिळेल….
आम्ही वीस बावीस वर्षापूर्वी निर्णय घेतला तो चुकल्याचे अजिबात वाटत नाही…… तेव्हा तुम्हीही ……

कबीर

मनुष्य बलवान नाही होत,समय होत बलवान… 
भिल्लन लुटी गोपिका सारी,वही अर्जुन वही बाण…! संत कबीर 

आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचा काहीसा अपेक्षित आणि बराचसा अनपेक्षित निकाल जाहीर झाला आणि कबिरांचा हा दोहा मला आठवला,जो मी वपुंच्या साहित्यात वाचला होता. आधी हा दोहा स्पष्ट करतो मग आपण याचा आणि निकालाचा संबंध पाहू.
अर्जुन आणि कृष्णाचं नातं आपणा सर्वांनाच ज्ञात आहे.कृष्ण अर्जुनाचा सारथी,सखा, मार्गदर्शक असा सर्वकाही होता.महाभारतानंतरच्या काळात बरेच दिवस कृष्ण-अर्जुन भेट झाली नव्हती.दरम्यानच्या काळात कृष्णाच्या अंगावर जखम होऊन तो आजारी असल्याचे अर्जुनाला समजते त्यामुळे तो कृष्णभेटी साठी निघायचे ठरवतो. इकडे अर्जुन भेटीला निघतो आणि वाटेत त्याला नारदमुनींची भेट होते.नारदमुनिना पुढे काय होणार याचा अंदाज असल्याने ते अर्जुनाला कृष्णभेटीला न जाण्याचा सल्ला देतात पण त्या मागील कारण सांगत नाहीत.
आपला मित्र त्रासात असताना त्याची भेट टाळणे अर्जुनाला कृतघ्नपणाचे वाटते. तो नारदमुनींकडे भेटीचा हट्ट धरतो.मधला मार्ग म्हणून दोघांनीही एकमेकांना आलिंगन न देता,अजिबात स्पर्श न करता भेटण्याचा सल्ला नारदमुनी अर्जुनाला देतात. अर्जुन पुढे रवाना होतो.
दोन्ही मित्रांची दृष्टीभेट होताच कृष्ण,अर्जुनाला आलिंगन द्यायला बाहू पसरतो.अर्जुन थातुरमातुर वचनाची करणे देऊन अलिंगनच नव्हे तर त्याचा स्पर्श सुद्धा टाळतो. अर्थात हे सर्व पूर्वनियोजित असल्याने कृष्णाला माहीतच असते.
"अर्जुना, इतक्या दूरवरून आलास आणि आपण हस्तांदोलनही करू शकत नाही याचे दु:ख वाटते तेव्हा तुझ्या भातातल्या बाणाने किमान माझ्या जखमेला स्पर्श तरी कर" असे आर्जव कृष्ण करतो, आणि मित्राप्रेमात अर्जुन तशी कृती करतो…त्याच्या बाणाचा जखमेला स्पर्श होतो.
कृष्णाने दृष्टांकडून काही गोपिकांची सुटका केलेली असते आणि त्या सर्वजणींना जाताजाता त्यांच्या घरी पोहोचवण्याची जबाबदारी कृष्ण अर्जुनावर सोपवतो.अर्जुन गोपिकांसह रथातून जायला निघतो.वाटेत एका अरण्यात भिल्ल त्यांच्या रथावर हल्ला करतात आणि गोपिकांना पळवून नेण्याचा प्रयत्न करतात.अर्जुन त्यांच्याशी युद्ध सुरु करतो. अर्जुन आपल्या धनुष्यातून बाण सोडतो,पण प्रत्येक वेळी त्याने सोडलेली अस्त्रे निकामी होऊन परत येतात,या प्रकाराने अर्जुन चक्रावतो. पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो पण भिल्ल वरचढ ठरतात आणि गोपिका पळवून नेतात.
म्हणजे महाभारतातला तोच महायोद्धा अर्जुन त्याचा तोच बाण भिल्लांपासून गोपिकांच रक्षण करू शकत नाही……
कारण एकच मनुष्य ताकदवान नसतो तर वेळ खरी ताकदवान असते……
या कथेप्रमाणेच राणे साहेबांनी आपल्या "नारायण अस्त्राने"आजवर अनेक निवडणुका एकतर्फी खिशात घातल्या.कोकणचा आवाज राज्याच्या इतर भागात पोहोचेल इतका कणखर केला. सरकारला अनेकदा निधीसाठी वेठीस धरले. कोकणात खऱ्या अर्थाने विकासाची गंगोत्री आणण्यास पुढाकार घेतला. लोकांनी सुद्धा गेली वीस पंचवीस वर्षे त्यांच्यावर खूप प्रेम केले. पण गेल्या काही वर्षात बऱ्याच गोष्टी लोकांना विश्वासात न घेता एकतर्फी वाटाव्यात अश्या घडत गेल्या. पक्ष वाढला,विजय मिळत गेला,कार्यकर्त्यांना सन्मानाची पदे मिळत गेली,कार्यकर्ते सधन झाले,आणि खोट्या प्रतिष्ठेत वावरू लागले जनतेशी असलेली त्यांची नाळ तुटायला सुरवात झाली.खरंतर राणे साहेबांनी ही बाब वेळीच ओळखून आवश्यक ते बदल करायला हवे होते. पण दुर्दैवाने तसे घडले नाही. जनतेच्या भावना अर्जुनाच्या बाणाने कृष्णाच्या जखमेसारख्या दुखावत गेल्या आणि याच दोह्याचा प्रत्यय राणे साहेबांना घ्यावा लागला.
असा अनपेक्षित निकाल येण्यामागे केवळ "मोदींची लाट"एवढंच कारण पुरेसे नाही तर इथल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या कार्यपद्धतीच्या विरोधी लाट हे महत्वाचे कारण आहे असे म्हणायला हरकत नाही
ही संत मंडळी या केवळ दोन दोन ओळीतून फार मोठे दृष्टांत देवून गेली आहेत. गरज आहे ती कार्यकर्ता आणि नेत्यांनी हे लक्षात घ्यायची आणि आचरणात आणायची. "पुढच्यास ठेच मागचा शहाणा"ही म्हण मुखोद्गत करून यापुढील राज्यकर्त्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आचरण करावे ही अपेक्षा, अन्यथा …. "समय बलवान" असणार आहेच. 

"इरादा पक्का …… वर्षातून एकदातरी कासारटक्का"……

"इरादा पक्का …… वर्षातून एकदातरी कासारटक्का"…… 



सिंधुदुर्ग जिल्ह्यातील "कासारटक्का" हे खरंतर एक "जागृत देवस्थान"म्हणावे असे ठिकाण आहे. कुडाळ मालवण रस्त्यावर चौके 

गावाच्यानजीकच्या एका ओढ्यावर हे छोटेसे मंदिर असून इथला "बैरागी कासारटक्का" हा नवसाला पावणारा आणि राखणीला धावणारा म्हणून 

प्रसिद्ध आहे.फारपुर्वी पासून जिल्ह्यातले व्यावसायिक प्रतिवर्षी शक्यतो पावसाळ्यात श्रावण महिन्याच्या अगोदर आपल्या मित्रमंडळीसोबत तिथे 

कोंबडा किवा बकऱ्याचा बळी देऊन सहभोजनाचा आनंद घेतात. काहीजण "रखवाली" म्हणून तर काहीजण "नवसफेड" म्हणून देवाला भक्ष्य अर्पण 

करतात. विशेष म्हणजे या देवस्थानाला मटणासोबत "दारू"सुद्धा वर्ज्य नसून तो देवाच्या नैवेद्याचा एक अविभाज्य घटक आहे.

काळानुरूप त्याची व्याप्ती वाढत असून या ठिकाणच्या जवळच असलेल्या "धामापूर" या पर्यटन ठीकाणापर्यंत या वनभोजनाच्या पंक्ती पाहायला 

मिळतात.

धामापूर तळ्याकाठचा निसर्गरम्य परिसर पर्यटन विभागाने विकसित केलेला असल्याने आता संपूर्ण वर्षभर इथे वनभोजनासाठी अनेक कुटुंबे 

आणि मित्रमंडळी यांच्या मोठमोठ्या ग्रुपची वर्दळ दिसून येते.यात अलीकडच्या काळात चाकरमानी मंडळींची संख्या लक्षणीय दिसून येते.सगळ्या 

लवाजम्यासह सकाळी या ठिकाणी जायचे. नवसाचा किवा राखणीचा कोंबडा नाहीतर बकरा देवापुढे मानवायाचा, मनातले नवससायास गाऱ्हाणे 

रूपाने देवापुढे सांगायचे,तळ्याकाठी मस्त जेवण बनवायचे, अर्थात पूर्ण मांसाहारी.मग गप्पा गोष्टी,चेष्टामस्करी यात रमत वनभोजनाचा आनंद 

लुटायचा आणि संध्याकाळी ताजेतवाने होत घरी परतायचे.असा इथला एकंदर दिनक्रम असतो. बुधवार,शुक्रवार आणि रविवार हे त्यासाठीचे खास 

दिवस.…

"नवस" वैगरे गोष्टी ज्याच्या त्याच्या मानण्यावर असल्यातरी वर्षातून एखाद्या दिवशी वनभोजनाचा आणि सहभोजनाचा आनंद घेण्यासाठी या 

निसर्गरम्य ठिकाणाला भेट द्यायला हरकत नाही.…… 

"फोडणी"….

"फोडणी"…. 
आज आमच्या चिरंजीवांचा बारावीचा निकाल आहे.आमच्याच पावलावर पाऊल ठेवत स्थापत्य अभियांत्रिकीला प्रवेश घ्यायचा असे त्यांनी नक्की केले.आजच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर काल घरात कॉलेज फी,हॉस्टेल खर्च,गरज पडल्यास डोनेशन या सर्वांचे ढोबळ अंदाजपत्रक अनुभवी लोकांच्या मदतीने तयार केले.अर्थात एकंदर आकडा आवाक्याबाहेरचा असल्याने, अनावश्यक खर्च टाळून दैनंदिन खर्चात कपात करण्याचे आवाहन आम्ही स्वतःच्या मनासह आमच्या सौ. ना अगदी आवर्जून केले.आश्चर्य म्हणजे त्यांनीही ते खूपच मनावर घेतले,आणि त्याचा प्रत्यय आज सकाळीसकाळी मला आला.
रोजच्या "पोळी-भाजी" नाश्त्याच्या ऐवजी आज चक्क डायनिंग टेबलवर रात्री उरलेल्या भाताला "फोडणी"दिलेली डिश होती.(अर्थातच कमीतकमी तेलात)….
आता कळत नाही "अच्छे दिन आयेंगे"…… की,"ऐसे दिन आयेंगे"……

"वटपौर्णिमा"

"वटपौर्णिमा"


वटपौर्णीमेचं वाण,

आज वडाला मोठा मान,
सात जन्म सोबतीची देवादिकांना आण, 
दिवसभराच्या उपवासाचा सावित्रींवर ताण,
किमानपक्षी याची तरी तमाम सत्यवानानी ठेवावी जाण.......

"आठवणींची शाळा"

"आठवणींची शाळा"
आम्ही मित्रांनी एकदा ठरवले,आठवणींची भरवावी शाळा …. 
आणि बघता बघता अख्खा,सातवीचा वर्ग झाला गोळा….
बारा मुलगे चार मुली मिळून,तेव्हाचा पट अवघा सोळा…. 
एक मित्र सोडून गेला,उरलेल्या पंधरांचाच भरला मेळा…. 
वनभोजनाची टूम निघाली,वर्गणी म्हणून काजू झाले गोळा….
तागडीवर नीट लक्ष देवूनही,हातावर पडले रुपये दोनशे सोळा….
एवढ्याने वनभोजन होणार कसे,सर्वांच्या पोटात उठला गोळा….
मग कुणी तांदूळ,कुणी पीठ,पातेलं,कढई तर कोणी आणला पळा….
वर्गणीचे पैसे देवून मग,उरलेला बाजार भरला सगळा….
सामानसुमान घेऊन सर्वांनी,गाठला तळयाखालचा मळा….
मुली म्हणाल्या,चूल पेटवून मुलांनो,भात तितका वाळा….
मग हवं तर आधीसारखं,पण न भांडता,विटी दांडूने खेळा……
मुलीनो,हवंतर "ओबामा" वर बोला,पण सासवांचे विषय टाळा……
एखादीने गाणं छानसं म्हणा,जिचा खरंच चांगला गळा ….
वरण झाले पातळ,पर्याय म्हणून वरचे पाणी गाळा……
वडे राहिले कच्चे,त्यांना पुन्हा कढईत सोडून तळा….
पुरणार नाहीत वाटतात,थोडंस आणखी पीठ मळा…
खूप झाली चेष्टामस्करी,एकमेकांचा चुकवून डोळा….
तीस वर्षानंतरही सर्वांमध्ये दिसला,पूर्वीचाच लळा…
असा घेतला एक दिवस,अख्ख्या वर्गाने "श्वास" मोकळा……
आणि तिथेच सापडला तो हरवलेला पूर्वीचा "आनंद"वेगळा…. 

"पावस"

"पावस"
मेल्या पावसाक यंदा,
झालाहा तरी काय ?…… 
दुसरा नक्षत्र संपत इला तरी,
बांडूक आजून आरडाक नाय…
चढणेक मासे चढाक नाय…. 
कोके सुद्धा उमळाक नाय….
मेल्या पावसाक यंदा,
झाला हा तरी काय ?……
छत्री खयं उघडाक नाय …
कांबळी,इरली भिजाक नाय…
भाताच्या लावणेक पाणी नाय….
मेल्या पावसाक यंदा,
झाला हा तरी काय ?…
गुदस्तासारखो यंदा कुडकुडो नाय.....
झापाखालचा तलाग कोणी मारूक नाय .....
कुळदाच्या निस्त्याकाक आजून चवच नाय...
मिरगाचे कुर्ले खय नाटीक नाय....
मेल्या पावसाक यंदा,
झालाहा तरी काय ?...


(प्रभाकर सावंत,सिंधुदुर्गनगरी)
२६ जून २०१४ 

"निसर्ग वाचवा....पदरी पुण्य साचवा"

"निसर्ग वाचवा....पदरी पुण्य साचवा" 
काल मी लिहिलेल्या "मेल्या पावसाक यंदा,झालाहा तरी काय ?"या कवितेला दोनशेहून अधिक लोकांचा प्रतिसाद मिळाला,विशेष म्हणजे शंभरहून अधिक मित्रांनी ती कविता "शेअर"केली,याचाच अर्थ असा निघतो की ती नुसती "कविता"नाही तर आजची खरी "व्यथा"आहे.
पर्यावरणाचे संतुलन राखण्याचा विषय आपण सर्वजण फारच "लाईटली"घेतो.पण आता अलीकडच्या बऱ्याच उदाहरणावरून या विषयातला "सिरिअसनेस" सर्वसामान्यांना समजेल इतका स्पष्ट होऊ लागला आहे.तेव्हा चला "निसर्गाला" कुठलाही "संसर्ग"होऊ न देण्याची आपली जबाबदारी आपण जबाबदारीने पार पाडूया ..........
"निसर्ग वाचवा....पदरी पुण्य साचवा"

(प्रभाकर सावंत)