Sunday, March 16, 2014

निवडणुकांचा सिझन सुरु झाला की पक्षकार्यकर्त्यांचे अनेक रंगीबेरंगी किस्से ऐकायला मिळतात,आणि त्याने मनोरंजनही खूप होतं.काही वर्षांपूर्वी आमच्या सौ.निवडणुकीला उभ्या होत्या.आमची ती पहिलीच निवडणूक होती. 
आमच्या गावातच प्रचार कार्यालय आणि त्याच्या बाजुलाच जेवणावळीचा मंडप उभारला होता.तिथे रोज रात्री मांसाहाराच्या पंगती उठायच्या.विशेष म्हणजे रोजची जेवणासाठीची उपस्थिती ही दिवसभर प्रचारासाठी फिरणाऱ्या कार्यकर्त्यांच्या चौपट असायची.मग आमचे प्रचारप्रमुख वाडीवाडीतल्या प्रमुख कार्यकर्त्याकडून रिपोर्टिंग घ्यायचे ते मात्र फार रंजक असायचे.
ही वाडी "प्याक" ती वाडी "प्याक"…… अमक्याला "म्यानेज" केला तमक्याला "फोडला" आणि बरंच काही…… त्यांच्या सांगण्यावरून मिळणाऱ्या मताची बेरीज केली तर बहुतेक वेळा ती एकूण मतदारसंख्येच्या बाहेर जायची. (मग मनात यायचे की,साला हे आपल्या विरोधी लढणारे उमेदवार घरी बसून ***** कि काय?
असंच एका कार्यकर्त्याला त्याच्या वाडीत मिटिंग लावायला सांगितली.वाडी छोटी होती त्यामुळे साधारण तिसेक माणसे अपेक्षित होती.संध्याकाळी वेळेपेक्षा थोडे उशिराच आम्ही पोहोचलो. आणि पाहतो तर खळ्यात नुसती ताडपत्री आणि दोन पाण्याने भरलेले तांबे आणि पडवीतल्या कॉटवर घोरत पडलेले एक जख्ख म्हातारे गृहस्थ असाच काहीसा "सेट" होता.
पुढे पहिली घंटा …. दुसरी घंटा झाली तरी त्याच्या घरातली माणसे सुद्धा खळ्यात उतरली नाहीत,
इतकं असूनही तो मुरब्बी कार्यकर्ता काही ना काही थापा जोडताच होता.सरते शेवटी आम्ही निघताना तो म्हणाला
"काय काळजी करू नका,माझी तीस मता "जाग्यार"आसत,सगळी एकटाकी तुमकाच पडतली"
तेवढ्यात आमच्यातला एकजण त्या कॉटकडे हात दाखवत वैतागून म्हणाला
"बाकी काय असला तरी तुझा ह्या याक मत मात्र खरोखरच "जाग्यार"हा, नक्कीच ता निवडणुकीच्या आधीच मतदार यादीतसून बाहेर पडतला"

Tuesday, March 4, 2014

"मूग गिळून गप्प बसणे"

"मूग गिळून गप्प बसणे"
पूर्वीच्या काळी भिक्षूक भिक्षा मागायला बाहेर पडत त्यांना फक्त पाचच घरात भिक्षा मागायची परवानगी असायची.पाच घरात जरी काही मिळाले नाही तरीसुद्धा सहाव्या घरी जाऊ नये असा दंडक असायचा,परिणामी एखाद्या दिवशी पाच घरात काही मिळाले नाही तर उपाशीपोटी राहण्याची वेळ बिचारयांवर येत असे. अश्यावेळी हि मंडळी थोडेसे भाजलेले मूग सोबत ठेवायची आणि ते खाऊन त्यावर पाणी पिऊन झोपी जायची. यावरूनच पुढे "मूग गिळून गप्प बसणे" असा वाक्प्रचार रूढ झाला असावा.
आज हे आठवण्याचे कारण म्हणजे गेल्या दोन दिवसात मी केलेल्या पाच कार्यालयांच्या वाऱ्या……
साधारणपणे "सरकारी ठेकेदार"म्हटल्यावर "बदनाम" त्यामुळे समाजाचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन फार वाईट असतो.सरकारी कामात भ्रष्टाचार करणे,बोगस,दर्जाहीन कामे करणे,सरकारचा पैसा खोऱ्याने ओढून घरी नेणे या सारख्या अनेक अंधश्रद्धा त्याच्याविषयी असतात.या सगळ्या समजुतीत काही टक्क्यांचे तथ्य असले तरी उरलेल्या ठेकेदारांची स्थिती मात्र फारच अवघड असते.
त्या बिचाऱ्याला प्रत्यक्षातली धंद्यातली स्पर्धा आणि राजकीय हस्तक्षेपाच्या कचाट्यातून काम मिळवणे,त्यानंतर बँकांच्या तुंबड्या भरत पैसा उभा करणे,कामाच्या ठिकाणच्या स्थानिक दहशतवादाला सामोरे जात आणि संबंधित "साहेब" लोकांच्या कलेने काम पूर्ण करणे,तद्नंतर कार्यालयातल्या "बाबू" लोकांचे पाय धरत बिल काढणे,(या बाबू प्रकारात मंत्रालयातून निधी उपलब्ध करून देणाऱ्या टेबल पासून प्रत्यक्ष चेक हातात मिळेपर्यंतची सगळी मंडळी येतात.) अश्या नाना कळा त्याला सोसाव्या लागतात.
आम्ही सुद्धा "सरकारी ठेकेदार"याच जातकुळीतले, सध्या मार्च जवळ आल्याने बिलांची तयारी सुरु झालीय,ज्या कार्यालयांकडून "बिल"मिळणे अपेक्षित आहे अश्या पाच कार्यालयांना गेल्या दोन दिवसात धडक देऊन पाहिली पण कुठूनच काही सकारात्मक प्रतिसाद आला नाही. त्यामुळे पुढचा महिना "मुग गिळून गप्प बसण्याचा"आहे की काय अशी शंका येऊ लागलीय,कारण पैसे आपलेच असले तरी "भिक्षा" मागावी या नम्रतेने "बिलासाठी"याचना करावी लागतेय अलीकडे काहीठिकाणी ……

"सूत्र"…… निवेदनाचे…….

"सूत्र"…… निवेदनाचे……. 
"निवेदन किवा सूत्रसंचालन ही एक चांगली कला आहे आणि सध्या ही कला "करिअर"साठी एक पर्याय म्हणून पुढे आलेली आहे.परंतु हे सर्व "कार्पोरेट" जगतासाठी किवा मोठ्या कार्यक्रमांसाठी ठीक आहे. इथे स्थानिक पातळीवरील छोट्या मोठ्या कार्यक्रमात या 'निवेदकाला' किवा 'सूत्रधाराला' कोणकोणती "सुत्रे" सांभाळावी लागतात आणि आयोजक त्याचा कसा यांत्रिकपणे उपयोग करून घेतात,याचा एक किस्सा परवा आमचे मित्र बंड्या जोशी यांनी एका कार्यक्रमात ऐकवला.
दोन पुढाऱ्यांच्या किवा वक्त्यांच्या कंटाळवाण्या भाषणादरम्यान त्याचाच धागा पकडून निवेदक एखाद्या कवितेतल्या दोन सुंदर रचना ऐकवतो न ऐकवतो,तेवढ्यात नेमकी त्याच्याकडे आयोजकांची चिठ्ठी येते.
"एम एच …. नंबरच्या जीप मुळे वाहतुकीला अडथळा येत आहे.कृपया चालक किवा मालक यांनी ती बाजूला घ्यावी"
किवा एखादा भूक तहान विसरण्यासंदर्भातला शेर ऐकवतो आणि लगेचच चिठ्ठी येते
"सभागृहाच्या डाव्या बाजूला शाकाहारी आणि मांसाहारी जेवण्याची व्यवस्था आहे,कृपया सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा"
अश्या अनेक सूचना खरंतर त्याच्या कामाचा भाग नसतानाही त्याला माईक वरून द्याव्या लागतात.अश्या नुसत्या सूचनाच नाहीत,तर त्याबरोबर टेबलावरील पुष्पहार,शाली उचलणे त्याच्या घड्या घालणे,फोटोग्राफरच्या सूचनेनुसार समोरच्या फ्लॉवर पॉट,पाण्याचे तांबे,बाटल्या यांच्या जागा बदलणे.कधीकधी तर लटलटणाऱ्या पोडीयम खाली सोडा बाटलीचे बुच किवा पुठ्ठा घालणे आणि माईक स्ट्याण्ड हलवणे ही कामे तर अपरिहार्यपणे करावी लागतात.यातून जेव्हा आणि जसा "वेळ मिळेल" तेव्हा निवेदन करून "वेळ मारून न्यायची"असा एकंदर प्रकार.
कार्यकर्ता म्हणून स्टेजशी माझेही नाते फार जवळचे असल्याने मलाही भागात बऱ्याचदा सूत्रसंचालकाची जबाबदारी निभाऊन न्यावी लागते. असेच एका सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात मी निवेदक होतो.व्यासपीठावर बरीच नेतेमंडळी होती,त्यात एक नवनियुक्त महिला लोकप्रतिनिधी होत्या ज्या बहुदा पहिल्यांदाच व्यासपीठावर बसल्या असाव्यात.त्यांच्या पदरात एक तान्हे बाळ आणि एक नवरा असे दोन जीव होते,जे त्यांनी सोबत आणून व्यासपिठासमोरच्या पहिल्या रांगेत बसवले होते.कार्यक्रम सुरु झाला.
कार्यक्रम आणि निवेदन ऐन बहरात आल्यावर त्या तान्हुल्याने अगदी तालासुरात रडणे सुरु केले.काहीकेल्या बिचाऱ्या दमलेल्या बाबाला ते बाळ गप्प होईना.कार्यक्रमात व्यत्यय नको म्हणून मी मग त्यालाही व्यासपीठावर आणून त्याच्या आईकडे सुपूर्द केले.कार्यक्रम थोडासा पुढे सरकला. थोड्यावेळाने त्याची पुन्हा रडारड…मग व्यासपीठाच्या खाली बाबाकडे……
पुन्हा आई …पुन्हा बाबा ……
आणि मध्ये मी म्हणजे वाहतुकीचे साधन…… यातून जेव्हा जेव्हा वेळ मिळाला तेव्हा निवेदन …

"एक दुजे के लिये"…

"एक दुजे के लिये"…
"पती-पत्नी" या नात्याला आपल्याकडे अनन्यसाधारण असे महत्व आहे. एकंदर नातेसंबंधांचा विचार करता हे नाते खूप "विचार"करायला लावणारे आहे.
तसा लग्नानंतरच्या प्रत्येक क्षणाक्षणाला या नात्याचा "कस"लागत असतो आणि त्यातूनच हे नाते"दृढ"होत जाते,पण या नात्याची खरी ताकद लक्षात येते आणि हे नाते अधिक घट्ट होते ती दोघांपैकी एकजण आजारी असताना असे अनुभवातून मला वाटते.
दोघांमध्ये जेव्हा एक "स्लीपिंग पार्टनर"(आजारी)असतो तेव्हा साहजिकच दुसऱ्याची जबाबदारी सेवासुश्रुषा करण्याची आणि त्याला मानसिक आधार देण्याची असते,या दरम्यान कुणाकडूनही कोणत्याही स्वार्थाची भावना नसते.अश्यावेळी कुठल्याही कारणावरून कुणाचा अहंकार दुखावला जात नाही कारण आजारी व्यक्तीला आपल्यामुळे समोरच्याला त्रास होत असल्याची अपराधी भावना असते,आणि समोरच्याला हा आपला धर्मच आहे याची जाणीव असते.कधी नव्हे तितका वेळ एकमेकांसाठी दिल्याने कुटुंबासहित बऱ्याच विषयांवर एकमेकाची मते जाणून/समजून घेता येतात,आणि आपसूकच त्यांचा आदर केला जातो.
खूप विषयांवर चर्चा झाल्याने एकमेकाला आपला पार्टनर एका वेगळ्या नजरेतून पूर्णपणे उमजतो आणि जसा असेल तसा तो परिपूर्ण वाटतो.आणि त्रासाचा असलेला हा काळही सुखाचा वाटतो.

"क्षण भाग्याचा"…….

"क्षण भाग्याचा"……. 


आयुष्यात कधीकधी असे काही क्षण येतात की जे अनुभवल्यावर "भाग्य" काय असते ते समजते.माझ्याही आयुष्यात कालचा दिवस असाच भाग्याचा म्हणावा असा आला.त्याला निमित्त होते "श्री गुरुवेनमः" या तरुण भारतच्या सदराच्या समारोप सोहळ्याचे…
लाखो वाचकांनी पसंती दिलेल्या आणि गुरुशिष्य नात्याची वीण अधिक घट्ट करणाऱ्या "श्री गुरुवेनमः" या सदराच्या समारोप सोहळ्याच्या निमित्ताने आयोजकांनी हजारो गुरुशिष्याना एकाच छताखाली भेटण्याची आणि अविनाश धर्माधिकारी सरांसह अनेक मान्यवरांचे विचार ऐकण्याची संधी प्राप्त करून दिली.
या कार्यक्रमात जिल्ह्यातील मान्यवर वक्त्यांबरोबर माझ्या सारख्या एका सामान्य वाचकालासुद्धा आपले मनोगत मांडण्याची संधी मिळाली.ज्यांच्या कर्तृत्वापुढे नतमस्तक व्हावे असे श्री धर्माधिकारी सर, तरुण भारत परिवाराचे मामा ठाकूर,जडणघडणचे संपादक श्री सागर देशपांडे,खामकर सर,प्रमोदजी जठार आणि समोर उच्चविद्याविभूषित,अनुभवसंपन्न असा हजारोंचा जनसमुदाय यांच्यासमोर मनोगत व्यक्त करण्याचे धाडस आणि योग या सदराचे संयोजक आणि आवृत्तीप्रमुख श्री विजय शेट्टी यांच्यामुळेच प्राप्त झाला,आणि एका सुंदर हृदयस्पर्शी सोहळ्याचा साक्षीदार/भागीदार होता आले.जीवनात असे भाग्याचे क्षण मिळवून दिल्याबद्दल संपूर्ण तरुण भारत परिवाराला धन्यवाद आणि अनेक शुभेच्छाही……

"टोकन"…….

"टोकन"……. 

साधारण नव्याण्णव - दोन हजार सालातली गोष्ट…. त्यादरम्यान आमचे राजापूर येथे टेलिफोन इमारतीच्या बांधकामाचे काम सुरु होते.साईटवर आमचे नेहमीचे बेळगावी कामगार होतेच,परंतु कामाचा आवाका थोडा मोठा आणि मुदत कमी असल्याने स्थानिक गवंडी कामगारांचा शोध सुरु होता.असाच एके दिवशी "रवी"नावाचा मुकादम आला आणि त्याने गवंडी कामगार पुरवण्याची हमी घेतली. घासाघीस करून कामाचे दरही ठरले,आणि रोख दहा हजार रुपयांचा एडवांस घेऊन उद्यापासून कामगार आणण्याच्या बोलीवर तो निघूनही गेला.साईटवर सुपरवायझरला आवश्यक त्या सूचना देऊन मीही घरी आलो.
सगळे वार कॅलेंडरप्रमाणे उजाडत होते पण रवी मुकादमचा उद्या काही केल्या उजाडेना.आठ दिवस संपले…. पंधरवडा उलटला, पण संजय आणि कामगारांचा पत्ता नव्हता.त्याचे घर आम्ही पाहिले नव्हते आणि त्यावेळी मोबाईल नसल्याने त्याला शोधणेही अवघड होऊन बसले.
बऱ्याच प्रयत्नाने आमच्या सुपरवायझरने एकदा त्याला गाठले आणि माझ्याशी घरच्या फोनवर बोलणे करून दिले. मला निशब्द करणारी त्याची अस्खलित थापांची दोन चार कारणे ऐकून दोन दिवसात कामगार किवा पैसे परत करण्याच्या अटीवर आमचे संभाषण संपले.
पुन्हा तोच प्रकार,आता तर सुपरवायझरला भेटूनही तो दाद देईना.
दर आठवड्याला बाजाराच्या दिवशी माझे साईटवर जाणे असायचे. पुढे महिनाभराने असाच एका बाजाराच्या दिवशी माझे त्याच्याकडे लक्ष नसतानाही तो स्वतःहून माझ्या गाडीजवळ आला. आणि अत्यंत दिलगिरीच्या सुरात म्हणाला
"साहेब,खरंतर तुम्ही दिलेले सगळे पैसे मी कामगारांना दिले पण त्यां हरामखोरांनी फसवले,तरीही माझी नैतिक जबाबदारी म्हणून आधी मी तुमची माफी मागतो आणि सगळे पैसे आताच परत करतो"
यावर त्याच्यावरचा राग जाऊन मला त्याची दया आली. मनात आले, "दोन तीन हजार कमी दिलेस तरी चालतील" असं त्याला सांगून टाकावं,पण नाही बोललो.आता माझं पूर्ण लक्ष त्याचा हात त्याच्या प्यांटच्या खिशात कधी जातो याच्याकडे लागलं.
तेवढ्यात त्याने खिशातून राजापूर अर्बन बँकेचे १५ नंबर असलेले "टोकन"(त्याच्या भाषेत टोपन) काढले आणि म्हणाला,साहेब आज बाजार असल्याने बँकेत गर्दी आहे. मी हे "टोपन" घेऊन आलोय,तासाभरात पेमेंट मिळेल.तुम्ही साईटवर थांबा मी पैसे घेऊन येतो.
संध्याकाळी खरा सूर्य मावळला तरी हा "रवी"काही उगवला नाही.
मी कंटाळून घरी निघण्याच्या तयारीत असतानाच समोरचे सॉ मिल मालक आले. इच्छा नसतानाही त्यांना हा किस्सा सांगायला सुरवात केली,हसत हसतच त्यांनी माझे बोलणे मध्येच थांबवले,आणि मला विचारले "तुम्हांला त्याने राजापूर अर्बन बँकेचे १५ नंबरचे टोकन दाखवले कि नाही"…मी काय तो प्रकार समजलो.
पुन्हा कधी तो रवी भेटला नाही पण रवीचे "टोकन" पाहणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या चार पाच मंडळींची भेट मात्र झाली.

"तो राजहंस एक"…….

"तो राजहंस एक"……. 

"जरा कापी तो देखो इसकी,बिलकुल उसीकी सुरत जैसी है … धत…. गधा कही का" 
असं म्हणत हिंदीच्या सिंग सरांनी अख्ख्या वर्गासमोर त्याची वही भिरकावली.एका वाक्यातच सरांनी त्याचा अजागळपणा आणि हिंदी विषयातल्या चुका या दोन्ही बाबींचा उद्धार केला होता, त्यामुळे वर्गातील मुलांचे हसणे स्वाभाविकच होते,आणि बालसुलभ वृत्तीने सर्वांनी ते पार पाडले.तो मात्र पुरता खजील झाला.गेल्याच आठवड्यात इंग्रजीच्या चौधरी बाईनी सुद्धा यापेक्षा थोडा कमी असेल पण असाच प्रकार केला होता.गेल्या महिन्या दोन महिन्यात. वर्गातल्या मुलांना आणि शेजारीपाजारी लोकांना टिंगल टवाळीला तोच एक हक्काचं गिऱ्हाईक होता,
इथे चूक लोकांचीही नव्हती अन त्याचीही.…… चूक होतो प्राप्त परिस्थितीची…
मालवणी मुलखातल्या एका खेडेगावातून सातवी पर्यंतचे शिक्षण घेऊन तो मुंबईत आला होता आपल्या काकांकडे.खरतरं गावातल्या शाळेतला तो हुशार विद्यार्थी होता.पण मुंबईनगरीत आल्यावर मात्र त्याला बुजल्यासारखे झाले होते.हिंदी मराठी या दोन्ही भाषा मालवणी अंगाने बोलण्याची त्याची सवय सगळीकडे चेष्टेचा विषय ठरत होती.इथल्या मुलांच्या तुलनेत आपल्याकडे काहीतरी कमी असल्याच्या भावनेने त्याचा पूर्वीचा आत्मविश्वास आणि हुशारी कुठल्या कुठे गायब झाली होती.आणि इतक्या लहान वयात परक्यांकडे राहून या सगळ्या परिस्थितीशी जमवून घेणे त्याला फार अवघड जात होते.काकांची परिस्थिती सुद्धा यथातथाच होती त्यामुळे त्याचे वास्तव्य तसे चाळ कम झोपडपट्टी परिसरातच होते.
त्याचे काका त्यादरम्यान दत्ता सामंतांचे कार्यकर्ते असल्याने त्यांच्या ओळखीने याला आठवीसाठी प्रवेश मात्र चांगल्या शाळेत मिळाला होता.पण हीच चांगली शाळा आता त्याला सोडून द्यावीशी वाटत होती.कारण याच शाळेच्या टाय बुटातल्या युनिफॉर्ममध्ये त्याला फारच घुसमटल्यासारखे वाटत होते.दोन महिने झाले तरी वर्गातल्या मुलांमध्ये त्याला मिसळता आले नव्हते.
"एका तळ्यात होती"…… हे गाणे त्याला त्यावेळी माहित नसावे,पण अवस्था मात्र नक्कीच तशीच झाली होती.त्यादिवशीच्या प्रकाराने त्याने शाळा सोडून परत गावाकडे जायचे ठरवले पण सांगणार कोणाला आणि ऐकणार कोण? असा प्रश्न होताच ……
दोन चार दिवस असेच अस्वस्थतेत गेले. बालबुद्धीने सगळ्या शक्यतांवर विचार करून पहिला पण दहावीपर्यंत या इथेच शिकावे लागेल या पलीकडचा पर्याय काही सापडला नाही.
एक एक दिवस पुढे सरकत होता. आपण नक्की कुठे कमी पडतो यावर विचार सुरु झाला.आपण हुशार तर आहोतच फक्त आपले चालणे बोलणे आणि स्वतःहून इतरात मिसळणे याकडे लक्ष द्यायची गरज होती. हळूहळू तेही जमायला लागले.आता अख्ख्या वर्गातील मुलांपेक्षा आपल्यात काहीतरी न्यून आहे हा त्याच्या मनातला विचार बाजूला सरू लागला.
म्हणता म्हणता सहामाई परीक्षा सुरु झाल्या आणि संपल्या सुद्धा…मुंबईतली पहिली दिवाळी सुद्धा त्याने मनसोक्त एन्जॉय केली.चाळीतल्या वार्षिक सत्यनारायण महापूजेच्या कार्यक्रमात थोडेफार निवेदन सुद्धा केले.आता एक होतकरू मुलगा म्हणून चाळीतल्या लोकांचे प्रेम त्याला मिळू लागले.
एव्हाना शाळा सुरु झाल्या आणि निकालाचा दिवस उजाडला. हातात मिळालेल्या मार्कशीटवर आज त्याचाही विश्वास बसत नव्हता की, वर्गातल्या पंचावन्न मुलांमध्ये आपण तिसऱ्या क्रमांकाने पास झालो.
त्यादिवशी जवळपास सर्वच विषयाच्या शिक्षकांनी त्याचे कौतुक केले.घरी काका-काकूलाही आनंद झाला.निकालाने बरीच किमया झाली होती. आता वर्गातल्या सर्वच विद्यार्थ्यानी त्याच्याशी मैत्री करायला सुरवात केली.आणि शिक्षकमंडळी सुद्धा विशेष लक्ष देऊ लागली. पुढे त्याचा क्रमांक तीनच्या खाली कधी आला नाहीच तर बोर्डाच्या दहावी परीक्षेत पहिला झाला.
मात्र हे सर्व घडण्यासाठी त्याचेच त्याला कळावे लागले की "……तो राजहंस एक"…….