Monday, August 26, 2013

एक होता ऑगस्ट


 एक होता ऑगस्ट
लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीने सुरवात होणारा ऑगस्ट यंदा सणासुदीसह अनेक अरिष्टांचा "कॉम्बो प्याक" घेऊनच आला. क्रांतीदिन,स्वातंत्रदिन या राष्ट्रीय सणाबरोबर हिंदुना नागपंचमी,गोकुळाष्टमी,मुस्लीम बांधवाना रमजान तर पारसी समाजाला पतेतीचा आनंद देऊन गेला.
श्रावणमासी हर्ष मानसी ……. अश्या वर्णनाचा, व्रत वैकल्यांचा श्रावण सुरु झाला तोच मुळी सीमेवर पाच जवानांना शहीद करून.... रमजान सारख्या पवित्र महिन्याच्या अखेरीस पाकिस्तानने "संधी" साधून शस्त्रसंधीचे (किती गोंडस शब्द) उल्लंघन केले,आणि आमचे पाच शूरवीर धारातीर्थी पडले. त्यानंतर आलेला स्वातंत्रदिन जवानांना केवळ श्रद्धांजली वाहून आणि पाकिस्तानला पोकळ धमक्या देऊन साजरा झाला. या दिवशीच्या भाषणांमध्ये हा मुद्दा कमी आणि सत्ताधारी-विरोधकांचा कलगीतुराच जास्त रंगला. आणि दरम्यानच्या नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर खऱ्या नागापेक्षा राजकारण्यांचेच विषारी फुत्कार लोकांनी झेलले. सामान्य जनतेमध्ये मात्र शहीदाप्रती अनेक कार्यक्रमातून आत्मीयता दिसून आली.
नंतरच्या नारळी पौर्णिमेने मच्छिमार बांधवांचा "सिझन" सुरु करून दिला.त्यामुळे मत्स्याहारीना थोडा "दराचा"दिलासा मिळाला. त्याच दिवशीचा "रक्षाबंधनाचा"सोहळा समस्त भाऊरायाना बहिणीप्रतीच्या कर्तव्याची "वार्षिक" आठवण करून गेला. मात्र हातातल्या राखीचा रंग उडण्याआधीच मुंबईत कोणा एका बहिणीवर कोणाच्या तरी भावांनी "पाशवी बलात्कार" केला. जंगलातला वणवा आता गावात आला, घरात यायला फारसा वेळ लागणार नाही हे जनतेच्या आता लक्षात येऊ लागलय, जनता रस्त्यावर उतरली,त्याची बातमी झाली.......पुढे काय?
डॉक्टर दाभोलकरांचे मारेकरी हे भोंदू बाबा किवा जादूटोण्यावाले असावेत असा अंदाज आहे, पण डॉक्टरना मारताना साल्यानी आपल्या अघोरी विद्या किवा जादू टोण्याचा वापर न करता "पोलादी शस्त्र" वापरण्याची काय गरज होती? इतक्या शांत डोक्यावर गोळी झाडण्याचा विचार नक्की येतो तरी कुठून ? 
या हत्येचा शोक करणारी राजकीय मंडळी म्हणतात "दाभोलकरांसारख्या माणसाची हत्या होईल याची जरा जरी कल्पना असती तर खबरदारी घेतली असती"…आता कुणाचं कधी काय होईल? याचा सरकारला "प्रश्नकुंडली" मांडून अंदाज द्यायला साळगावकर सुद्धा उरले नाहीत. साहित्य,ज्योतिष आणि व्यवसाय या तिन्ही आघाड्यांवर भरारी घेतलेले ज्योतिर्भास्कर आता यापुढे आशीर्वादासाठी आपल्यात असणार नाहीत. पत्र्याच्या  झोपडीपासून ते मोठाल्या बंगल्याच्या भिंतीवर स्वताची खास जागा राखून ठेवणारे "कालनिर्णय" पोरकं करणारा हाच तो महिना 
बाकी शहरातल्या खड्ड्यांवर महिनाभरात अनेक चर्चासत्र रंगलीत,आमदारांची "टोल'वा-टोलवी चित्रफितीत पाहता आली. सरकारने अन्नसुरक्षेतुन "मतसुरक्षेची" चांगलीच तजवीज करुन घेतली,तेलंगनाचे
 "रणांगण" काहीसे शांत होत चाललय  मात्र "स्वतंत्र विदर्भाचा" गर्भ जोमाने वाढू पाहतोय,रस्त्यावरचे भीषण अपघात,आमिष दाखवून बलात्कार,चोऱ्या- दरोडे,एकतर्फी प्रेमातले हल्ले नैराश्यातून आत्महत्या या दैनंदिन घडामोडी झाल्याने त्या  हल्ली बातमीसाठी मोठा विषय ठरत नाहीत. या महिन्यात क्रिकेटज्वर जवळपास अजिबात नसल्याने क्रीडापानावर फारकाळ कोणाची नजर स्थिरावली नाही.
कांद्याचा वाढलेला दर आणि रुपयाचा घसरलेला दर साठ-पासष्टीला पोहोचला.सेन्सेक्सने आपटी खाल्याचे वाचले पण आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. मात्र नागपंचमीच्या दरम्यान आकडेबहाद्दुराना हुलकावणी दिलेल्या पंज्याने (पंचमीला ५ चा आकडा फीट असतो असे म्हणतात ) पुढे कधीतरी जोडीने येउन भरपाई करून दिल्याची खबर आहे. सोन्याला सुद्धा या महिन्यात चांगले दिवस आले. या महिन्यात चुकल्या-चुकल्या सारखे वाटते,कारण एकही घोटाळा उघडकीस आला नाही. कदाचित प्रसार माध्यमांना वेळ नसल्याने सध्या "वेटिंग"वर असावा अशी अपेक्षा.
काही असलं तरी  महिनाच्या अखेरीस असणारा "गोपाळकाला" मात्र नक्कीच सुखकारक असेल. जनतेच्या आशा-आकांक्षांचे मनोरे न ढासळता गगनचुंबी होतील आणि सुखाची हंडी फोडून सर्वानाच "सुखाची चव "चाखता येईल

No comments:

Post a Comment