Wednesday, September 17, 2014

गणपतीचो बाजार

कोकणात "गणपती बाप्पा"यायची वेळ झाली की अनेक कामे समोर येतात.त्यातलेच एक अत्यंत महत्वाचे काम म्हणजे "चतुर्थीचा"बाजार भरणे.आमच्या घरी आज हे काम प्रायोरिटीवर होते.सकाळी सकाळीच आमच्या मातोश्री आणि सौभाग्यवतीनी (कधी नव्हे ते एकमताने)बाजाराचे टिपण तयार करून माझ्या हातात दिले.मी वाटसअप वरून ते आमच्या वाण्याकडे पाठवले.अपेक्षेप्रमाणे तासाभराने त्याचा फोन आला,मी गाडी काढली आणि बाजाराच्या पिशव्या घरी आणल्या.....
येता येता मन मात्र पंचवीस तीस वर्षापूर्वीच्या चतुर्थीच्या बाजाराच्या आठवणी आठवू लागले.
कोकणात चतुर्थीच्या खर्चासाठी चाकरमान्यांच्या मनीऑर्डरची वाट पाहण्याचे ते दिवस होते.घर परसदाराची साफसफाई झाली,मातीच्या भिंतीना "रेवा" काढला की घरातली जाणती महिला मंडळी बाजाराची यादी तयार करत.गणपती सणाचे दिवस आणि पुढे येणारा म्हाळवस या दरम्यानच्या काळासाठी गरजेच्या तितक्या नेमक्या वस्तूची ती यादी असायची.साधारण दरांचे अंदाज बांधून बजेटनुसार त्यात फेरफार करून अंतिम यादी तयार होत असे.मग सोयीच्या वेळेनुसार ती आपल्या नेहमीच्या उधारीवाल्या वाण्याकडे जात असे.मागील बाकी असल्याने दुकानदार आज काय काय ऐकवतोय याचीही धाकधूक मनात असायचीच.मग एखाद्याची दोन चार दिवसात येणारी मनीऑर्डर किवा भातकापणी नंतर व्यवहार "क्लिअर"करण्याच्या हमीवर बाजाराची टोपली किवा पिशवी भरत असे.सगळा मामला उधारीचा असल्याने कुठेही,कोणत्याही वस्तूबाबत "ब्रान्ड"ची अपेक्षा नसायची.याउपर कोणत्यातरी चाकरमान्याकडून भेट म्हणून येणाऱ्या असल्याने यादीत न लिहिलेल्या (उदा.बिनवासाची अगरबत्ती,कापूस,धूप,कापूर यासारख्या) वस्तूही दुकानदाराकडून घ्याव्या लागायच्या,त्यामुळे बाजाराचा हा विषय म्हणजे मोठे "दिव्य"असायचे.आणि या दिव्व्यातून खेड्यातल्या जवळपास सर्वांनाच जावे लागत होते.
आता कोकणात खूप "श्रीमंती" आली आहे असे नाही,परंतु पूर्वीसारखी "ऋण काढून सण साजरा करण्याची"अवस्था अपवाद वगळता नक्कीच नाही,आणि बाप्पाच्या कृपेने ती कधीच आणि कुठेही असू नये......
"गणपती बाप्पा .....मोरया"

No comments:

Post a Comment