Wednesday, September 17, 2014

बाबल्याची "गोळी"...

बाबल्याची "गोळी".....

आमच्या ट्रिपचा बहुदा चौथा आणि गणपतीचा अकरावा दिवस होता.त्यादिवशी आम्ही अमृतसरहून सिमल्याला निघणार होतो.सकाळची आवरावर सुरु होती.आदल्या दिवशी सुवर्णमंदिर आणि वाघा बॉर्डरचा प्रोग्राम झाला होता त्यामुळे सगळेजण तसे दमलेलेच होते,तरी पुढचा प्रवास मोठा असल्याने आमची विनातक्रार तयारी सुरु होती.
एरव्ही सकाळी सहाला उठून आंघोळ इत्यादी आवरून बसणारा "बाबल्या"मात्र आज आठ वाजले तरी अंथरूण सोडत नव्हता.मी बाबल्याला हाक मारून लवकर तयारी करायला सांगितली.काहीश्या नाविलाजाने बाबल्या उठला आणि आवरायला निघाला.पण तो नेहमीसारखा उत्साही दिसत नव्हता.त्याची एकंदर जीवनशैली पाहता कालच्या फिरण्याच्या,जेवणाच्या किवा एकाद्या "चपटी"च्या त्रासाने तो दमणारा किवा त्रासणारा मुळीच नव्हता,म्हणून थोड्याश्या काळजीने मी त्याला विचारले.
"काय रे बाबल्या,आज काय तब्येत बिब्येत बरी नाय की काय ?"
"होय हो सायबानो,आज कपाळ धरला हा आणि पोटातसुदा मळमळता...उठान सारख्या वाटतच नाय" आंघोळीला निघालेला बाबल्या पुन्हा बेडवर बसत म्हणाला.
काल तर आपण साधी दालखिचडीच खाल्ली तरी त्याला त्रास झाला म्हणून मी त्याला विचारले,
"काल आजून काय अरबट चरबट खाल्लस काय रे ?"
"बाकी काय नाय, कायम खातंय ते गोळये खाल्लंय फक्त" बाबल्या...
"तू आणि गोळये?… ते रे कित्या? आणि कधीपासून खातस बाबा ?" मी
"हालीच..कोलते डॉक्टरानी दिल्यानी ब्लड प्रेशर कमी करुचे" बाबल्याचा खुलासा..
तेवढ्यात माझ्या एका मित्राने त्याचे गोळ्यांचे पाकीट पाहिले,त्यावर "प्रायमोलट एन" असे लिहिले होते, त्या मित्राला थोडीशी मेडिकलची माहिती असल्याने त्या गोळ्या स्त्रियांशी संबंधित असल्याची शंका आली,त्याने फोनवरून त्याच्या स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर भावाला डिटेल्स विचारले,तेव्हा लक्षात आले की बाबल्याने गडबडीत भलत्याच गोळ्या आणल्या आणि तीन दिवस खाल्ल्या सुद्धा.
मी बाबल्याला त्याच्या घरी फोन लावून दिला आणि चौकशी करायला सांगितली.
बाबल्याची बायको बहुदा ह्याच्या फोनचीच वाट पहात होती त्यामुळे एका रिंगमध्येच फोन पोचला आणि ती समोरून कडाडली.
"शिरा पडली तुमच्या तोंडार…. फिराक जावचा आसला काय इतके भूरावतास कित्या?"
"अगो हय माका बरा नाय आणि तू थयसुन चीडतस कित्या …. असा झाला तरी काय?" साळसूद बाबल्या….
"झाला काय म्हणान माका इचारतास?…अहो खोरनातले माझे गोळये घेवन गेलास आणि तुमचे हयच ठेवलास" बा. बा.
"तुझे आणि कसले गो गोळये?"….
"कसले ते इलास काय सांगतंय… मी पण मेल्यान दोन दिवस ते न बगता खालय आणि गणपती घरात आसताना घराच्या "भायेर"बसलंय ……
आता मात्र अदलाबदलीने झालेली "गडबड" समजून घेण्याची बाबल्याची "पाळी"होती.
त्यातूनही सहीसलामत सावरून बाबल्या म्हणाला "अगो कित्या नको ते गोळये खातस,आता जमानो बदाललो हा...असला काय पाळीत ऱ्हवाची गरज नाय"
आम्ही फक्त दोघांचा संवाद ऐकून बाबल्याच्या समंजसपणाचे कौतुक करण्याचे काम केले.

No comments:

Post a Comment