Wednesday, September 17, 2014

"बाबल्याचो ठराव"

"बाबल्याचो ठराव"


काल पंधरा ऑगस्ट रोजी शासकी
य नियमाप्रमाणे आमची हक्काची ग्रामसभा होती.पर्यावरण निधीतून प्रत्येक कुटुंबाला वस्तू वाटप असल्याने पंचायतीचे सभागृह वेळेआधीच तुडुंब भरले होते.एकही सभा न चुकवणारा आमचा "बाबल्या" सुद्धा जातीनिशी पहिल्या रांगेत हजर होता.प्रोसिडिंग वरचे विषय हळूहळू पुढे सरकत होते.प्रत्येकाला आपापली भेट वस्तू घेऊन घर गाठायची घाई असल्याने सभेच्या विषयांवर फारशी चर्चा रंगत नव्हती.
गेल्यावर्षी पर्यावरण निधीतून झाडांचे वाटप झाले होते.तसेच पंचायतीच्या पंधरा टक्के राखीव निधीतून कोंबडीच्या पिल्लांचे वाटप झाले होते.सरतेशेवटी या वर्षात ग्रामपंचायतीच्या पंधरा टक्के निधीतून काय वाटप करायचे यावर चर्चा सुरु झाली.बहुतेकांनी कोंबडीच्या पिल्लांचाच पर्याय योग्य असल्याचे सांगितले.तेवढ्यात परवाच्या सत्काराने खूष असलेला "बाबल्या" उभा राहिला आणि ठराव मांडतात त्या आवेशात म्हणाला.....
"सरपंचानु गेल्या वर्षी कोंबडी वाटलात,यंदा बकरे वाटा.वर्षागणिक थोडीतरी प्रगती नको पंचायतीची".....
बाबल्या रॉक्स ..सरपंच शौक्स .......

"बाबल्याचा जनगण"

"बाबल्याचा जनगण"


वेळ संध्याकाळची,आमच्या गावातल्या चौकात गप्पा मारत बसण्याची.............
आज नेहमीपेक्षा थोडे कमीच म्हणजे सात आठ जण जमलेले होते.गप्पांचा विषय होता परवा संपन्न झालेला "स्वातंत्र्यदिन" सोहळा.आम्ही जिल्ह्याच्या मुख्यालयाशेजारी रहात असल्याने स्वातंत्र्यदिनाचा भव्यदिव्य सोहळा आम्हांला पाहता आणि अनुभवता येतो.विशेष म्हणजे मंत्र्यांच्या भाषणातून आम्हांला आमचा जीडीपी आणि आमचे दरडोई उत्पन्न सुद्धा समजते.त्यामुळे या सोहळ्याचे कवित्व पुढचे आठ दिवस सुरु राहते.आज तसाच विषय सुरु होता,एवढ्यात कोणाच्यातरी मोटरसायकल वरून आमच्या बाबल्याचे आगमन झाले.बाबल्याची स्वतःची मोटरसायकल नाही परंतु जास्तीत जास्त वेळ तो कोणाची तरी मागची सीट अडवून असतो.ज्याप्रमाणे रमीच्या डावात एक पान असे असते की जे आपल्याला लागत नाही पण खाली टाकले तर दुसऱ्याला लागण्याची व त्याचा डाव पुरा होण्याची शक्यता असते अगदी तसाच "बाबल्या" हा विषय असल्याने जो तो नेहमी त्याला सांभाळत असतो.
आल्याआल्याच बाबल्या चर्चेत सहभागी झाला.पांढरा सदरा घालून,झेंड्याचा बिल्ला लावून परवा आपण किती ध्वजवंदनाला उपस्थित होतो त्याचे रसभरीत वर्णन सांगू लागला.इतक्यात आमच्यापैकी एकाला त्याची गम्मत करण्याची हुक्की आली.अशी बाबल्याची चेष्टा करण्याचा बरेचजण प्रयत्न करतात आणि शेवटी त्यांची "आ बैल मुझे मार"अवस्था होते.तरीही का कुणास ठावूक नेहमीचे गिऱ्हाईक "बाबल्या"च असतो.
तो मित्र बाबल्याला म्हणाला..."बाबल्या,मेल्या इतकी मोठेपणा सांगतहस झेंडावंदनाची पण तुका साधा "राष्ट्रगीत"तरी म्हनाक येता काय ?".....
"येता म्हणजे..? पुरा पाठ हा...म्हणाव....?"असं म्हणून बाबल्या "झेंडा उंचा रहे हमारा"च्या दोन ओळी म्हणतो.तेवढ्यात कोणीतरी ते "ध्वजगीत"असल्याचे सांगून त्याला थांबवतो.
पहिल्याला बाबल्याचा कधी नव्हे तो पाडाव करण्याची आयती संधी आल्यासारखी वाटते ...तो म्हणतो "अरे राष्ट्रगीत म्हणजे "जनगण" म्हन ...आणि पुरा म्हनत आसशीत तर आपली शंभर रुपयाची पैज".....बाबल्या पैज जिंकण्याची शक्यताच नव्हती,कारण बऱ्याच भारतीयांप्रमाणे त्यालाही ते फक्त समूह्गीतात म्हणता येत असे.
हा जरी बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असला तरी या घडीला मात्र त्याचा एकट्याचा होता,पण हार मानेल तर तो बाबल्या कसला....सगळ्या हसणाऱ्या मंडळींकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत बाबल्या डाफरला. " देशाच्या इतक्या पवित्र आणि मानाच्या राष्ट्रगीतावर ह्यो मेलो पैज लावता आणि ती पन शंभर रुपड्यांची ...आणि मेल्यानु तुमी हसतास,लाज नाय वाटत तुमका"...."देशात ह्या चल्ला काय ?..कोन झेंडो जाळता,कोन उलटो फडकवता,कोन हातात घेवक लाजता तर कोन कपाळाक गुंडाळता..ते मेले सगळे देशद्रोहीच ...आणि तेंच्याबरोबर तुमी ....पैजी खेळनारे...आग लागो तुमच्या तोंडाक"...
एका दमात एवढे बोलून,सर्वांना देशद्रोहाच्या खटल्यात अडकवून ज्याच्या मोटारसायकलवरून तो आला होता त्याच्याबरोबर पसार झाला.इकडे त्याच्या बोलल्याने "सावधान" मध्ये असलेल्या मंडळीनी "बाबल्या"च्या इरसालपणाला मनातल्या मनात एक "स्यालूट" ठोकला आणि "विश्राम" होत घराचा रस्ता धरला.

"बाबल्याची राणी".....

"बाबल्याची राणी".....


गेल्या आठवडाभरात बाबल्याच्या मदतीने आवाटातली झाडून सगळी घरे "झाडून"झाली,पण चतुर्थी दोन दिवसावर आली तरी बाबल्या आपले घर झाडायचे नावही काढेना.आज सकाळीच बाबल्याच्या बायकोने त्याला चांगलाच दम भरला.त्यामुळे मुकाट्याने झाडू घेऊन बाबल्या साफसफाईच्या मोहिमेवर रुजू झाला.बाबल्याचे जुने घर आणि त्याला जोडून घरकुल योजनेतल्या दोन खोल्या आज त्याला आवरायच्या होत्या.अख्ख्या दिवसाची आज इथेच "काशी" होणार या विचाराने तो तसा नाराजच होता.साफसफाईला सुरवात केली आणि अडगळीत असलेल्या बिनकामाच्या अनेक वस्तूंचा ढीग जमा झाला.बायकोला मनातल्या मनात शिव्या देत त्याने सगळ्या बिनकामाच्या जुन्यापुराण्या वस्तू एका टोपलीत भरल्या आणि बाहेर टाकणार तेवढ्यात बाबल्याची लक्ष्मी हजर आली,आणि टोपलीतल्या वस्तू पाहून बाबल्यावर करवादली. "तुमका सामायन यवस्थित लावूक सांगलय,भंगारात घालूक नाय"
आता मात्र बाबल्याची सटकली..
"अगो मायझया,कित्या ह्या रोंबाट भरून ठेवलंस?...अडचन नुसती"
"...आणि भुतूर हा काय तर जुनो स्टो तेचे पीनी,ग्यासाची जुनी लायटरा,फुटके कोप बशये,पारो गेलेलो आरसो.... तुझे फाटके साडये नी परकर असाच ना"
"आसांदे,तुमी ठेवा थयच....सगळा उपयेगाचा हा ता"....इति सौ.बाबल.
"अगो,तू काय सोताक इंग्लंडची राणी समाजतसं की काय ? म्हणजे पुढे तू मेल्यार तू वापरलेल्या ह्या वस्तूंचो लिलाव करून तुझी नातवा पतवंडा खूप पैसो कमावतीत असा तुका वाटता ?.....
याचा नेहमीप्रमाणे घरात काम करण्याचा मूड नाही हे ओळखून बायकोने त्याच्या हातातला झाडू हिसकावून घेतला आणि दाराकडे बोट करून "तुमी खयते जावा मी कामाचा बघतंय" अशी सूचक खुण केली....पडत्या फळाची आज्ञा समजून बाबल्यानेही मघाशी दोन वेळा कामात असल्याने कट केलेला मित्राचा नंबर डायल केला तो थेट आजच्या "श्रावण समाप्ती"मोहिमेत समाविष्ट होण्यासाठीच .....

"मारुती"..

"मारुती".....


एका माणसाची "मारुती"कंपनीची गाडी आमच्या गावाजवळ रस्त्यात बिघडते,तो मेक्यानिकच्या शोधात असताना त्याची भेट आमच्या "बाबल्या"शी होते.
गाडी मालक-इथे कोणी "मारुती"चे काम करणारा मिळेल का? 
बाबल्या -(जरा विचार करून)..होय मिळात...
गाडी मालक -चला प्लिज भेट घालून द्या.
बाबल्या त्याला एका घराकडे घेऊन जातो.त्याच्या अंगणातूनच त्याला हाक मारतो.
"बबन्या "मारुती"चा काम करुचा हा..तुझी हत्यारा घेऊन भायेर ये"
तो सद्गृहस्थ खूष होत "बबन्या" घराबाहेर येण्याची वाट पाहू लागतो.
दहा मिनिटांनी लाल चड्डी घातलेला उघडाबंब "बबन्या" आपले दोन्ही गाल फुगवत, एका हाताने शेपटी पकडत आणि दुसऱ्या हातात भलीमोठी "गदा"घेऊन बाहेर येतो.
बाबल्या रॉक्स....गाडी मालक शौक्स.....

"बाबल्याच्या बायलेचो गाऊन"..

"बाबल्याच्या बायलेचो गाऊन"......


यंदा चतुर्थीच्या खरेदीला कधी नव्हे ती बाबल्याची बायको कुडाळला गेली.सोबत तिची मुंबईवरून आलेली जाऊबाई होती.तिच्या आग्रहात्सव बाबल्याच्या बायकोने घरी वापरायला दोन "नाईट गाऊन" घेतले. सासूच्या धाकामुळे इच्छा असूनही लग्नानंतर ती साडीच वापरत होती,त्यामुळे जाऊबाईच्या धीराने घेतलेल्या "गाऊन" विषयी तिला प्रचंड उत्सुकता होती.घरी आल्यावर तो रंगीबेरंगी "गाऊन" परिधान करून लाजत लाजतच बाबल्या समोर येत म्हणाली...
"ओ मिया कसा दिसतंय ?"
इतक्या वर्षात पहिल्यांदाच तिला गाऊनमध्ये पाहून बाबल्याने आश्चर्याने विचारले
"ही कोणाची म्याक्शी घातलस?"........
"कोणाची कित्या ? मिया इकत आणलंय कुडाळसून" इति.बा.बा.
यावर काही अभिप्राय द्यायचा सोडून बाबल्याने विचारले....
"किती रुपये गो ?".....
"दुकानदारनीन तीनशे साठ रुपयाचे दोन सांगल्यान ...कमी करून तीनशे चाळीसाक आणलंय"
"तीनशे चाळीसाक ?.....
अगो इतक्या पैशात तर आमचा नुसता "गाऊन"च नाय तर "नाचून" सुद्धा झाला आसता"......(बाबल्या हाताचा अंगठा वर तोंडाकडे नेत समर्पक अशी खुण करत म्हणाला)
"बाबल्या जोमात .....म्याक्शीवाली कोमात"

गणपतीचो बाजार

कोकणात "गणपती बाप्पा"यायची वेळ झाली की अनेक कामे समोर येतात.त्यातलेच एक अत्यंत महत्वाचे काम म्हणजे "चतुर्थीचा"बाजार भरणे.आमच्या घरी आज हे काम प्रायोरिटीवर होते.सकाळी सकाळीच आमच्या मातोश्री आणि सौभाग्यवतीनी (कधी नव्हे ते एकमताने)बाजाराचे टिपण तयार करून माझ्या हातात दिले.मी वाटसअप वरून ते आमच्या वाण्याकडे पाठवले.अपेक्षेप्रमाणे तासाभराने त्याचा फोन आला,मी गाडी काढली आणि बाजाराच्या पिशव्या घरी आणल्या.....
येता येता मन मात्र पंचवीस तीस वर्षापूर्वीच्या चतुर्थीच्या बाजाराच्या आठवणी आठवू लागले.
कोकणात चतुर्थीच्या खर्चासाठी चाकरमान्यांच्या मनीऑर्डरची वाट पाहण्याचे ते दिवस होते.घर परसदाराची साफसफाई झाली,मातीच्या भिंतीना "रेवा" काढला की घरातली जाणती महिला मंडळी बाजाराची यादी तयार करत.गणपती सणाचे दिवस आणि पुढे येणारा म्हाळवस या दरम्यानच्या काळासाठी गरजेच्या तितक्या नेमक्या वस्तूची ती यादी असायची.साधारण दरांचे अंदाज बांधून बजेटनुसार त्यात फेरफार करून अंतिम यादी तयार होत असे.मग सोयीच्या वेळेनुसार ती आपल्या नेहमीच्या उधारीवाल्या वाण्याकडे जात असे.मागील बाकी असल्याने दुकानदार आज काय काय ऐकवतोय याचीही धाकधूक मनात असायचीच.मग एखाद्याची दोन चार दिवसात येणारी मनीऑर्डर किवा भातकापणी नंतर व्यवहार "क्लिअर"करण्याच्या हमीवर बाजाराची टोपली किवा पिशवी भरत असे.सगळा मामला उधारीचा असल्याने कुठेही,कोणत्याही वस्तूबाबत "ब्रान्ड"ची अपेक्षा नसायची.याउपर कोणत्यातरी चाकरमान्याकडून भेट म्हणून येणाऱ्या असल्याने यादीत न लिहिलेल्या (उदा.बिनवासाची अगरबत्ती,कापूस,धूप,कापूर यासारख्या) वस्तूही दुकानदाराकडून घ्याव्या लागायच्या,त्यामुळे बाजाराचा हा विषय म्हणजे मोठे "दिव्य"असायचे.आणि या दिव्व्यातून खेड्यातल्या जवळपास सर्वांनाच जावे लागत होते.
आता कोकणात खूप "श्रीमंती" आली आहे असे नाही,परंतु पूर्वीसारखी "ऋण काढून सण साजरा करण्याची"अवस्था अपवाद वगळता नक्कीच नाही,आणि बाप्पाच्या कृपेने ती कधीच आणि कुठेही असू नये......
"गणपती बाप्पा .....मोरया"

भजनांची मजा

त्याकाळच्या भजनांची,
मजा आता ऱ्हवाक नाय....
तीस चाळीस जणांचो हाली,
मेळच खंय दिसाक नाय....
कपाळार पेटी घेतलेलो,
झीलगो खय दिसाक नाय....
गाडयेची सोय झाल्याशिवाय,
भजन खयच पोचत नाय...
कडक बुंदीच्या लाडवांका,
कोणच्याच पोटात जागा नाय....
वडे समोसे उसळपावाशिवाय,
दुसरी खयचीच ऑर्डर नाय....
रात्री उशिरा भजन ऐकाची,
घरातल्यांका सुदा आवड नाय....
उशिरान भजन येता म्हटल्यार,
जो तो घेता पोटात पाय....
मनासारखी हत्यारा इली,
पण आधी सारखो कोरस नाय....
करूची म्हणान करतत झाला,
बहुतेकांक तेतूर आता अजिबातच रस नाय .....
(प्रभाकर सावंत)
(शहरीकरणाचा वारा लागलेल्या गावांमध्ये आज अशी स्थिती दिसते.त्यामुळे तिथे ठराविक मंडळींची आवड आणि त्यासाठीची धडपड यानिमित्ताने दहा दिवस पाहायला मिळते.काही गावांमध्ये अपवादाने आजही जुने वातावरण असू शकते.)

चार्जिंग

रेल्वे प्रवासात आपल्या बर्थ जवळ चार्जिंगसाठी प्लग असणे,
त्यात करंट असणे,
त्यामध्ये आपल्या चार्जरची पिन घट्ट बसणे...
आणि आजूबाजूच्या बर्थवाल्यांनी कधीतरी आपल्याला "पिन" लावायची संधी देणे....
या सर्व गोष्टी जुळून यायला खूप मोठ्ठ नशीब लागतं.....
आणि असं जेव्हा होतं तेव्हा नुसता मोबाईलच नाही तर स्वतःलाही "चार्ज" झाल्यासारखे वाटते......
फिलिंग चार्जड.......

"बल्ले बल्ले"....

"बल्ले बल्ले"....

आयत्यावेळी आमचा एक मेंबर गळपटला आणि त्याच्याजागी आमच्या "बाबल्या"ची वर्णी लागली.हॉटेल्स,तिथे फिरण्यासाठीची गाडी आधीच बुक झाली होती,आता प्रश्न होता तो फक्त त्याच्या विमान तिकिटाचा.तो मग सर्वांनी शेअर करायचं ठरवलं आणि बाबल्याने तयारी सुरु केली.
आधी ठरल्याप्रमाणे आम्ही सर्वजण कोल्हापूरमार्गे महालक्ष्मीने मुंबईला निघालो आणि बाबल्या सात दिवसांचे वाडीतले गणपती विसर्जन आटपून कोकणकन्या गाडीने सकाळी मुंबईत पोहोचला.दादरला कैलास लस्सी जवळच्या ब्रिजखाली "बाबल्या"नामक असामीची माझ्या मित्रपरीवाराशी गळाभेट झाली.पहिल्याच भेटीत त्याने चिटकवलेल्या एक दोन "मालवणी डायलॉग"मुळे आमच्या कोल्हापूर आणि रत्नागिरीकर मंडळीना हा "नाद खुळा" आयटम भलताच आवडला.आणि गेल्या अनेक ट्रीपमधला "केंद्रबिंदू" माझ्याकडून बाबल्याकडे सरकला.
तिथल्या हॉटेलवर फ्रेश होऊन आम्ही एअरपोर्टकडे निघालो.मागच्या एका ट्रिपचा विमान चुकण्याचा अनुभव हल्ली आम्हांला वेळेआधीच एअरपोर्टवर पोहचवतो.आजही तसच झालं,चक्क दोन तास आधी आम्ही टर्मिनलवर होतो.टिंगलटवाळीत एक तास कसा निघून गेला ते कळलच नाही,मग आम्ही "चेकइन" साठी गेटपर्यंत गेलो.तिथे तिकीट आणि ओळखपत्र दाखवेपर्यंत आमच्या मागे रांगेत असणारा बाबल्या अचानक गायब झाला.त्याचा फोनही लागेना.आम्ही पुन्हा मागे येऊन थांबलो तितक्यात घामाघूम झालेला बाबल्या धावतपळत पोहोचला.त्याला काही विचारण्याइतका वेळ आतातरी नव्हता.त्याला घेऊन आम्ही चेकइन झालो.ओळखपत्र दाखवताना मात्र त्याने कमालच केली.सरपंचाच्या रहिवाशी दाखल्यापासून,पोलीसपाटील,रेशनकार्ड,पासबुक,निवडणूक आणि शेवटी आधारकार्ड अशी जंत्रीच(ह्यातला व्हया ता बघा या हिशोबाने) सिक्युरिटीच्या हातात दिली."आयत्यायेळेक लफडा नको"हे त्याचे त्यावरचे स्पष्टीकरण.
आत जरा निवांत असताना मी मघाचा विषय काढला.
"अरे बाबल्या मघाशी असा अचानक कुठे गेला होतास ?"
"अवो,येताना दाढयेचा ब्लेड हाडूक इसारलय,ता गावता काय बगुक गेललय,पण भंगला जवळ खय दुकानच गावाक नाय.ह्या विमानतळाचा काय खरा नाय वो,आपल्याहारी कसा यस्टीतसून हात भायर काढलो तरी होया ता गावता"....
"अरे ब्लेड काय तिथेही घेता येईल, नाहीतर "सलून" मध्ये दाढी करता येईल.त्यासाठी इतकी धावपळ कशाला"....मी
"बरे माका येडो करतास,आपण जातव पंजाबात,थय सगळे सरदारजी,थय कित्या कोन दाढी करता?....मग सलुना तरी कित्या आसतली?" ......
बाबल्या रॉक्स....मित्रमंडळ शॉक्स......

वात्रटिका

आजच्या तरुण भारत,सिंधुदुर्ग आवृत्तीमध्ये प्रकाशित वात्रटिका....
"घराणेशाही"
घराणेशाहीच्या आरोपात आता,
उरले नाही काहीच तथ्य....
आरोपी ते आरोपी पण,
"फिर्यादी" तरी कुठे पाळतात पथ्य.....
"दीपक"
दहशतरूपी अंधकार मिटवण्यासाठी,
सर्वांनी पेटवलेला "दीपक"....
आता मात्र विझवू पाहतायेत,
मिळून सारे "कीटक".....
"निकाल"
मार्चमधली नापास मंडळी,
ऑक्टोंबरला "पास"होतात म्हणे....
पण आता "निकाल" कसा लावायचा,
ते मात्र "मतदार"राजाच जाणे.....
"वाटणी"
छोटा भाऊ,मोठा भाऊ,
वाटणी हवी समान....
मोदी लाटेत तरल्याने,
झाले सारे बेभान....
अशी संधी पुन्हा नाही,
कामाला लागा गुमान ....
आशेवर आहे जनता,
तिचा ठेवा थोडा मान ....
(प्रभाकर सावंत,सिंधुदुर्गनगरी)

बाबल्याची "गोळी"...

बाबल्याची "गोळी".....

आमच्या ट्रिपचा बहुदा चौथा आणि गणपतीचा अकरावा दिवस होता.त्यादिवशी आम्ही अमृतसरहून सिमल्याला निघणार होतो.सकाळची आवरावर सुरु होती.आदल्या दिवशी सुवर्णमंदिर आणि वाघा बॉर्डरचा प्रोग्राम झाला होता त्यामुळे सगळेजण तसे दमलेलेच होते,तरी पुढचा प्रवास मोठा असल्याने आमची विनातक्रार तयारी सुरु होती.
एरव्ही सकाळी सहाला उठून आंघोळ इत्यादी आवरून बसणारा "बाबल्या"मात्र आज आठ वाजले तरी अंथरूण सोडत नव्हता.मी बाबल्याला हाक मारून लवकर तयारी करायला सांगितली.काहीश्या नाविलाजाने बाबल्या उठला आणि आवरायला निघाला.पण तो नेहमीसारखा उत्साही दिसत नव्हता.त्याची एकंदर जीवनशैली पाहता कालच्या फिरण्याच्या,जेवणाच्या किवा एकाद्या "चपटी"च्या त्रासाने तो दमणारा किवा त्रासणारा मुळीच नव्हता,म्हणून थोड्याश्या काळजीने मी त्याला विचारले.
"काय रे बाबल्या,आज काय तब्येत बिब्येत बरी नाय की काय ?"
"होय हो सायबानो,आज कपाळ धरला हा आणि पोटातसुदा मळमळता...उठान सारख्या वाटतच नाय" आंघोळीला निघालेला बाबल्या पुन्हा बेडवर बसत म्हणाला.
काल तर आपण साधी दालखिचडीच खाल्ली तरी त्याला त्रास झाला म्हणून मी त्याला विचारले,
"काल आजून काय अरबट चरबट खाल्लस काय रे ?"
"बाकी काय नाय, कायम खातंय ते गोळये खाल्लंय फक्त" बाबल्या...
"तू आणि गोळये?… ते रे कित्या? आणि कधीपासून खातस बाबा ?" मी
"हालीच..कोलते डॉक्टरानी दिल्यानी ब्लड प्रेशर कमी करुचे" बाबल्याचा खुलासा..
तेवढ्यात माझ्या एका मित्राने त्याचे गोळ्यांचे पाकीट पाहिले,त्यावर "प्रायमोलट एन" असे लिहिले होते, त्या मित्राला थोडीशी मेडिकलची माहिती असल्याने त्या गोळ्या स्त्रियांशी संबंधित असल्याची शंका आली,त्याने फोनवरून त्याच्या स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर भावाला डिटेल्स विचारले,तेव्हा लक्षात आले की बाबल्याने गडबडीत भलत्याच गोळ्या आणल्या आणि तीन दिवस खाल्ल्या सुद्धा.
मी बाबल्याला त्याच्या घरी फोन लावून दिला आणि चौकशी करायला सांगितली.
बाबल्याची बायको बहुदा ह्याच्या फोनचीच वाट पहात होती त्यामुळे एका रिंगमध्येच फोन पोचला आणि ती समोरून कडाडली.
"शिरा पडली तुमच्या तोंडार…. फिराक जावचा आसला काय इतके भूरावतास कित्या?"
"अगो हय माका बरा नाय आणि तू थयसुन चीडतस कित्या …. असा झाला तरी काय?" साळसूद बाबल्या….
"झाला काय म्हणान माका इचारतास?…अहो खोरनातले माझे गोळये घेवन गेलास आणि तुमचे हयच ठेवलास" बा. बा.
"तुझे आणि कसले गो गोळये?"….
"कसले ते इलास काय सांगतंय… मी पण मेल्यान दोन दिवस ते न बगता खालय आणि गणपती घरात आसताना घराच्या "भायेर"बसलंय ……
आता मात्र अदलाबदलीने झालेली "गडबड" समजून घेण्याची बाबल्याची "पाळी"होती.
त्यातूनही सहीसलामत सावरून बाबल्या म्हणाला "अगो कित्या नको ते गोळये खातस,आता जमानो बदाललो हा...असला काय पाळीत ऱ्हवाची गरज नाय"
आम्ही फक्त दोघांचा संवाद ऐकून बाबल्याच्या समंजसपणाचे कौतुक करण्याचे काम केले.

"बाबल्या"ची वाय फाय सेवा".....

"बाबल्या"ची वाय फाय सेवा"......

कणकवलीत राणेंची,सावंतवाडीत तेलींची आणि वेंगुर्ल्यात गावडे यांची "वाय-फाय"सेवा सुरु झाली आणि त्यावेळेपासून बाबल्याच्या डोक्यात वाय फाय चा किडा वळवळू लागला.मुळात इंटरनेट या विषयीत बाबल्या पूर्ण अनभिज्ञ होता पण कोणत्याही नवीन गोष्टीची त्याला प्रचंड जिज्ञासा आहे.त्यामुळे नेहमीप्रमाणे या सर्व प्रकाराविषयी त्याने माझ्याकडून लगेच माहिती घेतली.(अर्थात मला आहे तेवढी) माझ्या दृष्टीने वायफायचा तो विषय तिथेच संपला पण बाबल्याच्या सुपीक डोक्यात एका वेगळ्या कल्पनेने आकार घेतला.
बाबल्याचे सामायिक घर आहे आणि मोठा परिवार आहे पण सर्व मंडळी कामधंद्यानिमित्त मुंबई निवासी.चतुर्थी आणि मे महिन्याच्या सुट्टीत फक्त घर गोकुळ असते,बाकी शुकशुकाट.त्या घरातल्याच एका खोलीत हल्लीच बाबल्याने एक ब्याचलर भाडेकरू ठेवला आहे.चांगल्या हुद्द्यावर असल्याने त्याच्याकडे वायफाय सुविधा असलेले ब्रॉडब्यांड"कनेक्शन आहे,ज्याचा प्लान अनलिमिटेड सदरातला आहे.ही बातमी बाबल्याला समजली.
माझ्याकडून घेतलेल्या माहितीच्या आधारे बाबल्याने भाडेकरूसोबत सेटिंग केले आणि चतुर्थीच्या काळात एक महिन्यासाठी ते आपल्या घरात वापरायला देण्याचे कबुल करून घेतले ज्याचे महिना बिल रुपये पाचशे पंचेचाळीस भाड्याच्या रकमेतून वळते करून घ्यायचे दोघांच्या एमओयु मध्ये ठरले.करार झाला आणि बाबल्याने ही गोष्ट आपल्या चाकरमान्यांकडे जाहीर करून टाकली,की यंदा चतुर्थीत सर्वांना माझ्याकडून मोफत वायफाय सेवा मिळणार.याचा परिणाम असा झाला की यंदाच्या चतुर्थीत त्याच्या घरी येणारया चाकरमानी मंडळीची संख्या त्यांच्या मुलाबाळांच्या येण्याने दुप्पट झाली.इकडे चाकरमानी मंडळी गावी आल्याआल्या बाबल्याने आपल्या नावाचा "पासवर्ड" सर्वांना देऊन टाकला आणि सर्व मंडळी खूष होऊन फेसबुक वाटसअप मध्ये गढून गेली.
पुढे बाबल्याच्या मोफत वायफाय सेवेची चर्चा आमच्या गावभर पसरली.संध्याकाळच्या आरतीला यायला कुरबुर करणारी पोरेटोरे आता बाबल्याकडे सकाळ संध्याकाळ आरतीला हजेरी लाऊ लागली.एक दोन आरत्या म्हणून त्यांना अपेक्षित असलेली"तसली भजने"डाऊनलोड करू लागली.बरीचशी अप्लिकेशन "अपडेट" करू लागली.
एकंदरीत एरव्ही सामसूमीत जाणारा बाबल्याचा "गणेशोत्सव"यंदा दणक्यात आणि त्याच्या कौतुकात संपन्न झाला तो केवळ मोफत वायफाय सेवा देण्याच्या फक्त ५४५ रुपयांच्या बाबल्याच्या आयडीयेनेच ......