Thursday, September 19, 2013

"पुंडलिक वरदे"……

"पुंडलिक वरदे"…
काल एक "अचानक भजन मंडळ"चक्क आमच्या घरी अवतरलं, अर्थात चतुर्थीच्या काळात घरी भजन येणे यात काही विशेष नाही, पण आज घरी आलेली सगळी भजन मंडळी मात्र व्हीव्हीआयपी होती,आणि अश्या प्रकारच्या मंडळींचं भजन मंडळ असू शकते यावर माझा काय कोणाचाही विश्वासही बसणार नाही.
आमच्या तोंडाचा "आ" मिटेपर्यंत ही मंडळी, पेटी( हार्मोनिअम),पखवाज,तबला,टाळ या जथ्थ्यासह गणपतीसमोरच्या सतरंज्यांवर दाटीवाटीने बसली सुद्धा….
ताबडतोब राजनभाईनी पेटी उघडली आणि तबला लावण्यासाठी सूर दाबून धरले,त्या सुरांवर खाली समोरासमोर बसलेल्या प्रमोददादानी पखवाज तर दीपकभाईनी तबला डगा "लावून"घेतला. प्रमोददादांच्या बाजूलाच बसलेल्या संदेशभाईनी "चक्की" घेतली. भजन मंडळीतल्या सर्वांशीच "बरे"असल्याने बहुदा त्यांच्यावर  "तालरक्षकाची" जबाबदारी पडली असावी.मध्येच प्रमोददादांच्या पखवाज वादनाला संदेशभाई कडून अपेक्षित "ताल" मिळाला नाही तर त्यांचा "तोल" जाऊ नये म्हणून अतुलजीनी सुद्धा एक छोटी "चक्की" हातात ठेवली होती. वैभवजी आणि जीजी या सर्वांबरोबर बाकी जुनिअर मंडळींच्या हातात काश्याच्या टाळांच्या दोऱ्या होत्या.
इतक्यात शुभ्र पांढऱ्या वेषात डोक्यावर गांधी टोपी घालून आपल्या मोठ्या दादानी "बुवा" म्हणून पेटीचा ताबा घेतला.आणि मघापासून "बुवा"वाटत होते ते त्यांचे पट्टशिष्य असलेले राजनभाई खाली सतीशभाईंच्या शेजारी जाऊन बसले. बुवांनी त्यांच्या नेहमीच्या सवयीने सगळ्यां मंडळीवर एकदा हसतहसत नजर फिरवली आणि एक सुंदर आलाप मारून भजन सुरु करण्याचा "कौल" घेतला…
"तन मन धन माझे … राघवा रूप तुझे" ….प्रार्थना संपली.
शिवशंकरा गौरीहरा …. महादेवा डमरूधरा…. गणही घुमला.मधेच रूपाचा अभंगही रंगला. 
पुढे गजर सुरु झाला….  "तोंडवली- वायंगणी…. समुद्राचं निळ पाणी"….
सरळ सरळ इथेही "समुद्रविश्वाचा" गजर होतोय हे पाहून जीजी आणि वैभवजींची चुळबुळ सुरु झाली.पण पखवाजवरून गजराला मात्र चांगली साथ मिळत होती,ते पाहून त्यांनीही टाळाचा ठेका धरला  तेवढ्यात विजयराव आणि विनायकराव हे दोन चाकरमानी उपस्थित झाले.तसही सगळ्याच भजनात चाकरमानी थोडे लेटच असतात.विजयरावांनी उभ्या उभ्याच कोण कुणापासून किती अंतरावर बसले आहे याचा "सर्व्हे" केला,आणि अतुलजी आणि प्रमोददादांच्या मध्ये जाऊन बसले.विनायकराव वैभवभाईना खेटले. तितक्यात कोणीतरी विजयरावांकडे टाळ दिला. सतत उद्योगी माणूस,त्यामुळे कधी टाळ कुटायची सवय नसल्याने खरतरं त्यांचा "ताल" चुकत होता पण ते माझ्या भजनात मुद्दामहून ताल चुकवतात असा "बुवांचा"समज झाला.पण त्यांनी तो दाखवला नाही.
होता होता पूर्वार्धाचा गजर संपला. बुवांनी मोठ्या उत्साहाने गौळण सुरु केली,हिंदी गाण्यावरच्या चालीतली गौळण आणि त्यात दह्या-दुधाचा आपला आवडता विषय असल्याने कलाप्रेमी पखवाजवाले कमालीचे ठेक्यात होते पण मध्येच कोल्हापूर फ़ेम"गोकुळ"शब्द आला आणि त्याचं अवसानच गळालं. तिकडे तबला-डग्याची साथ बरी होती पण पुढे गौळण "मथुरा" बाजार सोडून "मडुरा" जंक्शनला गेली आणि त्यातला "वाट अडविणारा कान्हा" आपल्यालाच उद्देशून आहे हे समजल्यावर त्यांचीही चौपट थंडावली. पुढच्या अभंगात कुठेतरी "वाणी" शब्द आला तेव्हा मात्र चारही भाईनी (राजन,प्रमोद दीपक संदेश) एकमेकाकडे पाहून स्मितहास्याने मनातल्या मनात 
"श्रीश्रीश्री" म्हणत माना डोलावल्या,आणि आपल्याकडे सुद्धा भविष्यात असे काही घडेल का? ह्या विचारात सतीशभाई मात्र एकटेच गढून गेले,मध्येच "मायनिंग" पासून अनेकांच्या "जॉयनिंग"चे संदर्भ गाण्या गाण्यातून ऐकायला मिळाले.शेवटी गजर घुमला… 
"श्री गजानना,आलो तुझ्या दर्शना … सद्बुद्धि दे,दे साऱ्या नेतेगणा"… भजन संपलं,
आनंद याचाच की सर्वांनी भजनाचे पावित्र जपत,कुठेही कसलाही संदर्भ न जोडता भजन एन्जॉय केलं.
न बोलावता भजन आल्याने "सुपारी"चा प्रश्नच नव्हता. मात्र आयत्या वेळी उरल्यासुरल्या करंज्यावरच वेळ मारून नेली.त्यानंतर गरमागरम चहा वाटतानाच कोणीतरी जोराचा "चटका"दिला आणि लक्षात आलं "आयला आपण भजनात चक्क झोपलो होतो तर"…… 

No comments:

Post a Comment